Mukta Vhayachay Mala - 3 in Marathi Motivational Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मुक्त व्हायचंय मला - भाग ३

Featured Books
Categories
Share

मुक्त व्हायचंय मला - भाग ३

मुक्त व्हायचंय मला भाग ३

रघूवीर आणि मालतीचं लग्न साध्या पद्धतीनं पार पडलं. लग्नात रघूवीर कडचे फार कमी लोक होते. मालतीकडच्यांना खूप आश्चर्य वाटलं.

लग्न संपन्न झालं. वरात निघाली.रघूवीर नेमाडेंच्या घरी वरात आली. मालतीचा गृहप्रवेश झाला. मालतीनं उखाणा घेतला.रघूवीरच्या काकूंनी पण उखाणा घेतला.

रघूवीरने मालतीचे नाव बदलले नाही.

पूर्ण लग्नात मालतीला रघूवीरचा ओझरता स्पर्शही झाला नाही. रघूवीरने तशी काळजी घेतली असावी बहुधा.

मालती काहीच बोलत नव्हती पण सगळं निरीक्षण करत होती.

मालती तिला सांगीतलेल्या खोलीत गेली. छोटीशी खोली होती पण जरा छान  रंग दिलेली होती त्यामुळे बरी वाटते होती. हे घर रघूवीरच्या काकांचं होतं.

रघूवीर खोलीत शिरला तशी पलंगावर बसलेली मालती उठून उभी राहिली.तो खोलीत शिरल्यावर त्याला बघून मालतीने उभं राहून रघूवीरला मान दिला यामुळे त्याचा अहंकार सुखावला. एक हलकीशी हास्याची लकेर त्याच्या चेह-यावर उमटली.तो पलंगावर जाऊन बसला.

मालतीला असं वाटलं की  रघूवीर तिलाही बस म्हणेल पण असं काही तो म्हणाला नाही. खरतर मालतीचे पाय दुखत होते.पण नवीनवरी असलेली मालती रघूवीरने  बस म्हटलं नाही तर आपण कसं बसायचं म्हणून तीही पलंगावर बसली नाही.

" आज आपलं लग्नं झालं.आपण नवराबायको झालोत. तुझी अशी कल्पना असेल की नवीन लग्न झालं म्हणून मी तुझं कौतुक करीन,तुला गजरा वगैरे आणीन,तुला बाहेर घेऊन जाईन तर अश्या रोमॅंटिक कल्पना तू आपल्या मनात बाळगून नको. याने तुलाच त्रास होईल.

दुसरी गोष्ट तू नोकरी चालू ठेव आजकाल पैसा लागतो.पण पगार झाल्यावर तुझा सगळा पगार माझ्या हातात द्यायचा. तुला कबूल नसेल तरी द्यायचा. तुला ऑफीसमध्ये जायला आणि यायला जेवढे पैसे लागतात तेवढे तुला देत जाईन. बसला उशीर झाला म्हणून ऑटो किंवा टॅक्सीचे येण्याचा विचार सुद्धा मनात आणायचा नाही.

ऑफीस मधील कलीगना चहा किंवा इतर पार्टी द्यायची नाही. तसं कबूलही करायचं नाही. वाढदिवसाला कोणाला प्रेझेंट द्यायला पैसे मागायचे नाहीत.

घरात भाजी आणायची असेल तेव्हा तुला जास्तीचे पैसे देत जाईन." रघूवीर चं बोलणं मधेच तोडत मालतीने विचारलं

" मी नोकरी करते मग माझा पैसा माझ्याजवळ असायला हवा. तुमचा पगार तर तुम्हाला मिळणारच आहे." मालती

" वर तोंड करून प्रश्न विचारायचे नाहीत.मी जे सांगतो ते ऐकायचं. आपल्या संसारात माझाच हुकूम चालेल. बाई जरी नोकरी करणारी असली तरी तिला काडीची अक्कल नसते. सरकार तुमच्यासारख्या बेअक्कल लोकांना फुकट पगार देऊन पोसतो. तेव्हा लक्षात ठेवायचं मी नोकरी करते ही टिमकी सारखी वाजवायची नाही."

इतकं कडक आणि हृदयशून्य बोलणं ऐकून मालतीची संसार करण्याचीच इच्छाच गेली. तिच्या लक्षात आलं की आपण एका पाषाण हृदयी माणसाबरोबर लग्न करण्याचा विचार केला तो चुकला. आता आयुष्यभर आपल्यालाच त्याची झळ पोचणार आहे.

नवथर दांपत्याचं वागणं आपल्याला आयुष्यात दिसणार नाही. लग्न झालं आहे म्हणून रघूवीर आपला नवरा आहे बाकी आयुष्यभर आपण एकटेच आहोत.

संसाराचं सूख काय असतं ते आपल्याला कळणार नाही. तशी अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल.रघूवीरसारखा हृदय शून्य माणूस प्रेम कसा करू शकेल? प्रेमाला हवी नजाकत. जी रघूवीर जवळ असणं कदापी शक्य नाही.

आपण पैसा कमावतो आहे पण त्यावर आपला हक्क नाही.हे मालतीला कळून चुकलं होतं.

"लग्नाआधी काही बचत केली असशील तर तीही मला दे." रघूवीर म्हणाला. तेव्हा मालती खोटं बोलली,

आपलं काही सेविंग्ज आहे हे मालतीने सांगीतलं नाही.

रघूवीरला शंका असते की मालतीचं काही सेविंग्ज असतील पण मग त्याला वाटलं हळूहळू सांगेल.

***

नवपरीणीत दांपत्या प्रमाणे  रघूवीर आणि मालती यांचा संसार नव्हता. मालतीला रघूवीरची बंधन नकोशी वाटायला लागली.पण इलाज नव्हता.

मालतीला आपल्या आयुष्याची चौकट कशी असणार आहे हे कळलं.त्या चौकटीत राहून आपल्याला जगायला हवं. कारण दुसरा पर्याय मालती कडे नव्हता._____________________________क्रमशः मुक्त व्हायचंय मलालेखिका.. मीनाक्षी वैद्य.