Reservation Benefits in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | आरक्षण लाभ

Featured Books
Categories
Share

आरक्षण लाभ

आरक्षणाचा लाभ तळागाळातील माणसांना मिळणे गरजेचे?

आज जाती आहेत व जातीवरुन वादंही आहेत. आजच्या तत्सम जाती स्वतःला कमजोर समजत नाहीत. आजच्या काही जाती ह्या अशाही आहेत की त्या जातींना आरक्षण हवं. स्वतःच्या समाजातील तळागाळातील लोकांना वर उचलण्यासाठी तर काही जातींना आरक्षण हवं. दुसऱ्या जातींना आरक्षण मिळतं. ते मिळायला नको म्हणून. ती आरक्षणाची सवलत नष्ट व्हावी म्हणून. तसं पाहिल्यास आज प्रत्येकच जातीत तळागाळातील लोकं आहेत की ज्यांना आरक्षण म्हणजे काय? याचा अर्थही समजत नाही. ते त्याचा लाभही घेत नाहीत. अज्ञानता असल्यामुळेच. तर ज्यांना आरक्षण मिळायलाच नको असे काही महाभाग आज आरक्षणाचा लाभ घेतांना दिसत आहे. ही वास्तविकता आहे. कारण संविधानात आरक्षणाची सवलत ही विशिष्ट जातींना सरसकट दिलेली आहे. ज्यात त्याच्या श्रीमंतांच्या कसोटीची वर्गवारी वापरलेली नाही. आज प्रत्येक जातीत असेही काही श्रीमंत लोकं आहेत की ज्यांची वर्षाची आवक करोडो रुपये आहे. परंतु तरीही ते त्यांच्या जातीला आरक्षण असल्यानं आरक्षणाचा लाभ घेत आहेत.
आरक्षण असावं. परंतु ते कोणाला? ते तळागाळातील लोकांना असावं. परंतु आता तळागाळातील लोकं ओळखायचे कसे? त्याचंही उत्तर अगदी सोपे आहे. ते म्हणजे त्यांचं आधारकार्ड. अलिकडील काळात आधारकार्ड हे आपल्या बँक खात्यासह प्रत्येक गोष्टीशी जोडलं आहे. ते शेती, प्लॉट, उद्योग शिवाय त्यानं दिवसभर काय काय केलं? या गोष्टीशीही जोडलं आहे. त्यातच त्या व्यक्तीजवळ पैसा किती प्रमाणात उपलब्ध आहे. पैसा उपलब्ध आहे किंवा नाही? याशीही जोडलं आहे. त्यावरुन नक्कीच शोधता येतं की आरक्षणाची गरज नेमकी कोणाला?
कालपरत्वे काही जाती अशाही होत्या की ज्या जातीतील सर्वांनाच आरक्षणाची गरज होती. कारण कालपर्यंत काही जातीतील लोकांना इतर जातीत मिसळता येत नव्हतं. त्या जाती सुधारणेच्या पलिकडे होत्या. शिवाय त्या जातींना सुधारणेच्या कक्षेत आणायचं होतं.
आरक्षण हे त्याच तत्सम जातींना दिलं. त्याचं कारण होतं, त्या जातीतील तळागाळातील माणसांना वर आणणं. यात त्यांचा केवळ आर्थिक विकास होणे एवढंच अपेक्षीत नव्हतं तर त्याचबरोबर त्यांचा सर्वांगीण विकास होणे अभिप्रेत होतं. सर्वांगीण विकास अर्थात राजकीय, सामाजीक, शैक्षणिक, बौद्धीक, मानसीक, कौटूंबीक अशा सर्व प्रकारचा. शैक्षणिक विकास म्हणजे त्यांना इतर समाजासोबत समानतेनं बसून त्यांच्याचएवढं वा त्यापेक्षाही जास्त शिकता यावं. बौद्धीक विकास म्हणजे त्यांना त्यांची बुद्धी स्वतंत्रपणे वापरता यावी. त्यावर कुणाचंच बंधन नसावं. त्यांना त्यांच्या बुद्धीचा हवा तसा वापर करता यावा. सामाजीक विकास म्हणजे त्यांना इतर समाजात वावरतांना मानाचे स्थान मिळावे. कौटूंबीक विकास म्हणजे इतरांच्या कुटूंबासोबत कोणत्याही बाबतीत आदान प्रदान करता यावं. मानसीक विकास म्हणजे त्यांना कोणत्याही बाबतीतून प्रताडीत करु नये आणि शेवटी राजकीय विकास म्हणजे राजकारणातही त्यांना यशस्वीरित्या इतरांच्या बरोबरीनं जाता येईल. हाच विचार करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात विशिष्ट जाती वर्गांना आरक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली. त्यानंतर त्यानुसार देशातील अशा विशिष्ट वर्गातील काही लोकं पुढे आलेत. परंतु त्यांनी केवळ आपलाच विकास केला. आपल्या नात्यातील इतर लोकांचा विचार केला नाही व विकासही केला नाही. त्यांना वर आणलं नाही. येवूही दिलं नाही. त्यांना तसंच ठेवलं. शिवाय त्यांनी तसंच राहावं, शिक्षण शिकू नये म्हणून त्यांना पिढीजात धंद्यातच गुंतवून ठेवलं. यासाठी त्यांनी तसंच आपल्याच या बिरादरीतील माणसांनी तसंच राहावं म्हणून त्यांच्यासाठी सरकारला टपऱ्या मागीतल्या. मात्र टपऱ्या मागणे याचा अर्थ विकास होणे नव्हता.
आरक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या बिरादरीतील सर्वांगीण विकास करीत असतांना त्यांना शिक्षण शिकायला लावणं गरजेचं होतं. टपऱ्या मागून त्यांना उद्योग धंद्यात गुंतवणं नव्हे. तसं पाहिल्यास लोकांनी आरक्षण मागून सर्वांगीण विकास केलाही. परंतु तो विकास केवळ आपली आर्थीकता वाढविण्यासाठी केला. शैक्षणिकता, राजकीय प्रगल्भता, बौद्धीकता वाढविण्यासाठी केला नाही. असे म्हणायला काहीच हरकत नाही. कारण मोजकेच काही लोकं शिकले. त्यांचाच सर्वांगीण विकास झाला. इतरांचा झाला नाही. त्यांना आरक्षण म्हणजे काय? तेही समजलेले नाही. ते समजायला तयार नाहीत. ते आज शिकायलाही तयार नाहीत. शिक्षण वाघिणीचं दूध आहे हे त्याना कळलेले नाही.
राजकीय विकासाचा विचार केल्यास ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेऊन स्वतःचा विकास केला. त्याच लोकांनी स्वतःचे राजकीय पक्ष स्थापन केले. त्यानंतर आरक्षणाचा मूळ उद्देश बाजूलाच ठेवला व लढत आहेत आपापसातच. राजकीय हक्कं प्राप्त करण्यासाठी. खरंच या वास्तविकतेतून असाही विचार येतोय की डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या आरक्षणाची परिपूर्ती झाली आहे काय? याचं उत्तर नाही असंच येतं. त्याचं कारण असं की आरक्षणाच्या माध्यमातून जे नेते बनले. त्यांनी राजकीय डाव साधला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. म्हणूनच आरक्षणाची परीपूर्ती झाली नाही.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आजही वेळ गेली नाही. आताही आरक्षणाचा लाभ घेवून वर आलेल्या लोकांनी स्वतः आरक्षणाचा लाभ घेण्याऐवजी आपल्याच बिरादरीतील आपल्याच बांधवांना वर उचलण्यासाठी प्रयत्न करावा. त्यांना आरक्षणाचा अर्थ समजावून सांगावा. त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा. तेव्हाच आरक्षणाची परीपुर्ती होईल व प्रत्येक तळागाळातील माणूस वर येईल व त्याचा विकास होईल यात शंका नाही. मात्र ते करण्यासाठी तेवढी हिंमत आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या लोकांमध्ये असणे गरजेचे आहे. तसंच आरक्षणाचा लाभ सर्वच तळागाळातील माणसांना मिळणे गरजेचे आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०