Don't turn your back on Marathi school either in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | मराठी शाळेकडेही पाठ फिरवू नका

Featured Books
Categories
Share

मराठी शाळेकडेही पाठ फिरवू नका

मराठी शाळेकडेही पाठ फिरवू नका

अलिकडील काळात मराठी शाळा या लयास गेलेल्या दिसत आहेत. काही जात असलेल्या दिसत आहेत. कारण त्या ठिकाणी योग्य ती पटसंख्याच दिसत नाही. काही काही शाळा अशाही आहेत की त्या शाळेत केवळ दोन विद्यार्थी दिसतात. शिवाय शिक्षक दोन. असे का? तर त्याचं उत्तर आहे आधी दोन शिक्षक सामावण्याएवढी त्या शाळेची पटसंख्या होती. आता ती कमी झाली. ती का कमी झाली? त्याचं कारण असतं कॉन्व्हेंटची शाळा. त्या कॉन्व्हेंटच्या शाळेनं असा फरक का पडला? खरंच कॉन्व्हेंट शाळेची गरज आहे का? जिल्हापरीषद शाळेत शिकवीत नाहीत काय? अन् शिकवीत नसतील तर ज्या काळात शाळा नव्हत्या, त्या काळात थोर पुरुष निर्माण झाले. कोणी कलेक्टर तर कोणी संशोधक बनले. कोणी डॉक्टर तर कोणी इंजीनिअर बनले. ते कसे बनले? ते जर त्याच मराठी जिल्हापरीषद शाळेतून बनले तर अलिकडील काळात कॉन्व्हेंटचा अट्टाहास का? अन् या कॉन्व्हेंट शाळेवरुन कॉन्व्हेंट व मराठी असा भेदभाव का?
सारेच प्रश्न. असे प्रश्न की त्या प्रश्नांच्या सरबत्तीनं डोकंच चक्रावेल. शिवाय विचार, करतांना खरंच जिल्हापरीषद शाळेत शिकवीत नाही असंच कोणालाही वाटेल. कारण त्या ठिकाणी पटसंख्याच कमी आहे.
अलिकडील काळात कॉन्व्हेंटची पटसंख्या वाढली. जरी अशा कॉन्व्हेंट शाळेत शुल्क जास्त असलं तरी त्या शाळेत इंग्रजी माध्यमाला प्राधान्य असल्यानं त्या शाळेची जाहीरात झाली. शिवाय पालक अशा शाळेत शिकवीत असतांना तो शाळेच्या अभ्यासावर अवलंबून राहिला नाही. त्या पालकानं कॉन्व्हेंट वर्ग शिकविण्याव्यतिरीक्त खाजगी शिकविण्या लावण्यावरही भर दिला.
पालक कॉन्व्हेंटच्या शाळेत आपल्या पाल्याचे नाव टाकतो. त्याला हेही माहीत असतं की कॉन्व्हेंट शाळेत शिकविणारे शिक्षक हे जास्त शिकलेले नसतात. तरीही तो आपल्या पाल्याला त्या शाळेत शिकवितो. त्याचं सर्वात महत्वपुर्ण कारण असतं दिखावूपणा. अलिकडील काळात स्वतःला उच्च समजण्याची स्पर्धाच जणू लागली आहे. सर्वसाधारण माणसं विचार करतात की जर अशा कॉन्व्हेंट शाळेत साधारण रिक्षेवाला आपली मुलं शिकवतो. मग मी तर त्यापेक्षा बराच चांगला आहे. मी का बरं मागे राहू. मीही माझ्या पाल्यांना कॉन्व्हेंटमध्ये शिकविणारच. मग त्याला जो पैसा लागेल. मी त्यासाठी काहीही करेल. त्यानंतर तो पालक ते शिक्षण त्या मुलाला येते की नाही येत, याचा विचार न करता आपल्या मुलाला कॉन्व्हेंटचं शिक्षण शिकवीत असतो. प्रसंगी त्यासाठी तो कष्ट करतो. त्याचे सुरुवातीचे कष्ट अतिशय इमानदारीचे असतात. तरीही पैसे पुरत नाही. कारण कॉन्व्हेंट शिक्षणाला जास्त पैसा लागतो. अन् जेव्हा अशा कॉन्व्हेंटच्या शिक्षणाला पैसे कमी पडतात. तेव्हा तोच व्यक्ती केवळ आणि केवळ आपल्या मुलांना कॉन्व्हेंट शिकविण्यासाठी वाममार्ग पसंत करतो. कारण त्याला विचार येतो की भविष्यात त्याचा मुलगा त्याला प्रश्न विचारेल की तू माझ्यासाठी काय केलं? इथूनच पैसे कमविण्यासाठी भ्रष्टाचार, चोऱ्या, लुबाडणूक, फसवेगिरी या गोष्टींचा जन्म होतो. ज्या गोष्टी आजच्या काळात वर्तमानाला योग्य वाटणाऱ्या नाहीत. माणसाच्या माणुसकीला शोभणाऱ्या नाहीत.
अलिकडील काळात आलेलं कॉन्व्हेंटचं शिक्षण. त्याला आज विशेष असंच महत्व प्राप्त झालेलं आहे. परंतु खऱ्या स्वरुपानं विचार केल्यास काल अशा स्वरुपाचं शिक्षण होतं काय? त्याचं उत्तर नाही असंच येईल. तरीही मुलं शिकलीत ना. ती शिकली आणि अतिशय चांगल्या स्वरुपानं शिकली. कालच्या काळात जिल्हापरीषद शाळेत शिकलेली मंडळी आजच्या काळात अधिकारी आहेत व ते अधिकारी म्हणून निवृत्तही झाली आहेत. शिवाय आपल्याला कदाचीत माहीत नसेल की म. गांधीजींनीही काल स्वराज्य मिळवीत असतांना १९४२ मध्ये इंग्रजांना चलनावर जेव्हा म्हटलं. त्याचवेळेस त्यांनी सर्वांना निक्षून सांगीतलं होतं की लोकांनी इंग्रजी शिक्षणाचा त्याग करावा. ते ऐकताच बऱ्याचशा इंग्रजी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, ज्यात बऱ्याचशा विद्यार्थीनीही होत्या. त्यांनी इंग्रजी महाविद्यालयाचा त्याग केला होता. ज्या वर्तनानं त्या विद्यार्थ्यांना कैदी झाली होती. असं इंग्रजी माध्यम व हे विदेशी लोकांची भाषा आपल्याच पुर्वज असलेल्या आपल्याच देशातील स्वातंत्र्यसंग्रामात लढलेल्या हुतात्म्यांनी त्यांगली आणि आपण त्यांचा अट्टाहास करतो आहोत. ठरवतो आहोत की आपल्या पाल्यानं इंग्रजी शिकावं. त्यासाठी काबाडकष्ट करतो आहोत. शिवाय प्रसंगी गैरकृत्यही. हे आपलं गैरकृत्य आपल्या पाल्यांना इंग्रजी शिकविण्यासाठी असतं.
आज ग्रामीण भागातूनही काही कॉन्व्हेंट शाळा मुलांचा जीव धोक्यात घालून कॉन्व्हेंटला आणत आहेत. शिवाय काही पालकही मुलांचा जीव धोक्यात घालून शहरात असलेल्या कॉन्व्हेंटला आणत आहेत. शिवाय ते गावात घराजवळ असलेल्या जिल्हापरीषद शाळेत टाकत नाहीत. अशातच होवू नये अशी घटना झाली व अपघात झालाच तर....... त, चिमुकल्यांचा जीव जावू शकतो. महत्वाचं सांगायचं झाल्यास जीव राहील तर सगळं मिळवलं. सर सलामत तर पगडी पचास. तरीही ते लक्षात न घेता पालक काळाच्या ओघात चालून वयाच्या अगदी तीन वर्षापासून मुलांना शाळेत पाठवतात. ज्यावेळेस त्या बाळाचे दुधाचे ओठही सुकलेले नसतात शिवाय जिल्हापरीषद शाळेकडून त्या पालकांना अपेक्षा असते की जास्त ओझं मुलांना नको. मुलांना गणवेश हवा. मुलांना मध्यान्ह जेवनही हवं. परंतु तेच पालक कॉन्व्हेंटला शिकवीत असतांना अशा अपेक्षा करीत नाहीत. उलट अतिरिक्त शुल्क नाईलाजानं विना तक्रारीनं भरतात. ही वास्तविकता आहे.
महत्वाची गोष्ट ही की काल ग्रामीण भागात भरपूर पटसंख्या असलेली जिल्हापरीषद शाळा आज बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शिवाय आजच्या काळात कॉन्व्हेंट शाळा शिकूनही काही मुलं कोणताच तीर मारतांना दिसत नाहीत. एखादाच मुलगा कॉन्व्हेंट शिकून पुढे जातो. मग एवढा कॉन्व्हेंट शिक्षणाचा अट्टाहास का? हं, शिकवाच्याच असतील तर आपल्याच देशातील भाषा शिकवाव्यात. आपल्या देशात काही कमी भाषा नाहीत. प्रत्येक राज्य व व्यक्तीपरत्वे भाषा आहेत. हिंदी ही सर्वसामान्य भाषा झाली. त्याव्यतिरिक्त कोष्टी, आदिवासी, मळ्याळम, तेलगू, छत्तीसगढी, मराठी, मणीपुरी, कोकणी, उर्दू, गोंडी, गुजराती, पंजाबी, सिंधी, कन्नड अशाही भाषा आहेत. ज्या भाषा आपआपल्या स्तरावर महान आहेत व त्या भाषा शिकण्यासारख्या आहेत. परंतु आपण त्या न शिकता ज्या भाषेतील लोकांनी आपल्याला गुलाम केलं. त्या भाषा शिकतो. सर म्हणणं आपल्याला फार आवडतं. कोणी सर म्हणतांना आपल्याला सन्मान वाटतो. जो की एक गुलामीदर्शक शब्द आहे. शिवाय एवढंच करीत नाहीत आपण. आपण आपला स्वाभिमान हरवून इंग्रजी शिकलो की पंख फुटल्यागत विदेशवारीसाठी सज्ज होतो. पैसा जास्त प्यारा होतो आपल्याला तेव्हा. त्यानंतर आपण विदेशात जातो व आपलं उर्वरीत आयुष्य ऐषआरामात घालवतो. अन् विसरतो तेव्हा ज्या देशात आपण शिकलो, त्या देशाला. ज्या देशानं आपल्याला शिकवलं नव्हे तर शिक्षण शिकण्यासाठी जागा दिली होती, पैसा दिला होता, त्या देशाला. ते ऋणही विसरतो आपण आणि गुलामी करीत असतो त्या भाषेची नव्हे तर त्या देशाची. ज्या देशानं आपली भाषा शिकण्यासाठी आपल्याच देशात आपल्याला बाध्य केलं होतं.
बाबांनो, इंग्रजी भाषा नक्कीच शिका. ती शिकायला मनाई नाही. परंतु ती मराठी माध्यमाच्या शाळेत शिका की ज्या शाळेत संस्कार आहेत. मराठीकडे पाठ फिरवू नका. जर तुम्ही सर्वजण अशीच पाठ फिरवाल तर उद्या मराठी शाळा चालणार नाहीत. ज्यातून गरीबांच्या मुलांना शिक्षण मिळत आहे तेही निःशुल्क. तुमच्या कॉन्व्हेंट प्रवेशानं जर मराठी शाळेत मुलंच नसतील वा दोनचारच मुलं असतील तर त्या शाळा चालविणं सरकारला तरी परवडेल काय? त्या परवडणार नाही व मराठी शाळा बंद होतील. अन् त्या शाळा बंद झाल्या तर उद्या ज्या मुलांच्या पालकांजवळ पैसे नसणार. ती मुलं नक्कीच शिक्षणापासून वंचीत राहतील यात शंका नाही. तेव्हा नक्कीच पालक म्हणून आजतरी विचार करणे गरजेचे आहे. मराठी शाळा बंद होण्यापुर्वी. कारण असे जर झाले नाही तर उद्या तो दिवस दूर नाही की ज्या रांगेत आपलीच मुलं राहतील विना पैशाच्या शाळेत शिकविण्यासाठी. हे तेवढंच खरं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०