Nikita raje Chitnis - 15 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | निकिता राजे चिटणीस - भाग १५

Featured Books
Categories
Share

निकिता राजे चिटणीस - भाग १५

निकिता राजे  चिटणीस

भाग १५

भाग १४ वरून  पुढे वाचा ....

नितीन

घरी जातांना बरोबर निकिता येणार होती. पण नाही आली. म्हणाली “मला माझी भूमिका नीट पार पाडू द्या. मालकांच्या बरोबर एक ट्रेनी मुलगी जातेय, हे बरोबर दिसणार नाही. तुम्ही जा, मी बस ने येईन किंवा रिक्षाने येईन तुम्ही काळजी करू नका. आता काय बोलणार?” तिच हे रूप फार नवीन होत. आईला विचारल पाहिजे. तिला कदाचित याची पूर्ण कल्पना असेल. घरी जातांना एका ठिकाणी पांच मिनिटांच काम होत ते आटपून निघालो आणि ट्रॅफिक जाम मध्ये अडकलो. घरी आलो तेंव्हा निकिता आली होती. बाबा आई आणि निकिता चहा घेत होत्या.

आईने मला पाहिल्यावर म्हंटलं “ये नितीन आधी चहा घे, थकला असशील बर वाटेल, मग फ्रेश हो.” मी म्हंटल “नको, आधी वॉश घेतो आणि येतो” आणि फ्रेश होऊन खाली आलो. टेबलावर तिघेही बसलेले होते. मी गेल्यावर सगळे गप्प झाले. आईनीच कोंडी फोडली. “राधा बाईंनी चहा गरम करून आणला आहे, घे, चहा घे. पोहे पण केलेत ते पण देते.”

मला काय बोलाव ते समजत नव्हत.

“बाबा हे सगळ काय प्रकरण आहे ? याची तुम्हाला कल्पना होती का ?”

“नाही. आजीबात नाही. पण तुला आठवतं का वाटवे मॅडम त्या दिवशी एक प्रोजेक्ट घेऊन आल्या होत्या आणि आपण ओके केल होत, तेंव्हा तूही होतासच. आज चोरघडे आणि वाघूळकर आले आणि टॅक्स रिफंड बद्दल बोलत होते तेंव्हाही तू होतासच. हे सर्व राजे नावाच्या मुली बद्दल चालल होत. ह्या मुलीच्या हुशारी बद्दल कौतुक वाटलं, म्हणून मी तिला बोलावून घेतल. आणि तेंव्हाच तू पण आलास आणि नंतर जे  काय घडल ते ही तुझ्या समोरच. राजे नावाचा उलगडा मलाही तेंव्हाच झाला. निकिता ने माहेरचं नाव लावलं आहे हे ही, मला तेंव्हाच कळलं.  सगळे बसले होते म्हणून मी जास्त ताणल नाही. घरी आल्यावरच मला समजलं की माहेरचं नाव लावून ट्रेनिंग ला जा, हे suggestion निकीता ला तुझ्या आईनेच दिलं आहे म्हणून. आता निकीतालाच सगळं स्पष्ट करायच आहे. तेंव्हा तीच आता डिटेल्स सांगेल.” अस म्हणून बाबांनी माझ्याकडे पाहील, मी पण संमती दर्शक मान डोलावली. आणि म्हंटल “आता निकिता तू बोल. नीट सर्व आम्हाला समजेल अस सांग.”

मग निकिता सुरू झाली. एकेक गोष्ट तपशीलवार, अगदी औरंगाबाद च्या ट्रीप मध्ये कार्तिक शी काय बोलण झाल इथ पासून आईशी काय काय चर्चा केली आणि आईच्या सल्ल्या वरून कामात कशी प्रगती केली, किती कसून प्रत्येक विषयाचा अभ्यास केला, ते आज काय झाल इथ पर्यन्त. म्हणाली की आमच्या समोर याव लागेल अस तिला पण वाटल नव्हत. ते सगळ अचानक तिच्या पण  अंगावरच आल.

आज धक्क्यावर धक्के बसत होते. एवढं सगळं निकिता करत होती आणि आम्हाला दोघांनाही त्याची साधी चाहूल पण लागली नाही. हे निकीताच कौशल्य, का बायकांना गृहीत धरल्यामुळे आमच घराकडे होणार दुर्लक्ष, काही कळेना. पण काही का असेना निकिता ने स्वत:ला सिद्ध केल हे नक्की.

“मग निकिता आता काय करायचं ठरवल आहे ?” मी विचारलं.

“बाबा सांगतील तस.” – निकिता.

“माझी आयडिया ही होती की त्या राजेलाच कन्सलटंट म्हणून नियुक्त करायचं  आणि वाटवे मॅडम ह्या प्रोजेक्ट वर लक्ष ठेवतील. पण राजे आता राजे राहिली नाहीये. प्रोजेक्ट ला मंजूरी दिलेलीच आहे. तेंव्हा निकिता तूच सांग कस करायच ते.” बाबा म्हणाले.

यावर बरीच चर्चा होऊन अस ठरल की प्रोजेक्ट वाटवे मॅडम करतील आणि निकिता त्यांची असिस्टंट म्हणून त्यांना मदत करेल. म्हणजे कोणाच्या डोळ्यात येणार नाही. कारण निकीता ची तशीच इच्छा होती. फायनल.

दुसऱ्या दिवसांपासून त्यांच काम सुरू झाल. निकिता बसनेच ये जा करणार होती. तिला खरं तर फॅक्टरी मध्येच काम होत. मी म्हंटल सुद्धा की एवढ्या दूर जाणार आहेस तर गाडी घेऊन जा, पण ती नको म्हणाली. हट्टीपणा दूसरा काय.

वाटवे मॅडम

दुसऱ्या दिवशी अविनाश सरांनी बोलावलं आणि सांगितल की निकीताच, सर्व काम करणार आहे पण प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून माझच नाव राहणार आहे. तिला काही अडचण आली तर तिला गाइड करा. पण ती तुमची असिस्टंट  आहे हे लक्षात ठेवा.

निकीता ने काम सुरू केल. सुरवातीला तिला अग तुग  करायला मला फार संकोच वाटायचा पण हळू हळू मैत्रीच झाली. अंजिकरांना काहीच कल्पना नव्हती त्यामुळे त्यांना काही फरक पडला नाही.

आता पर्यन्त ५० टक्केच लोकांशी संपर्क साधला होता. पूर्ण करायला जवळ जवळ दोन ते अडीच महीने गेले. नंतर सर्व डेटा संकलित करून निष्कर्ष काढायला अजून एक महिना. सर्व झाल्यावर मी अंजिकर आणि राजे बसलो.

दररोज एक तास एक्स्ट्रा बसून १५ दिवसात काही बाबी निश्चित केल्या.

औषधोपचार आणि मेडिकल emergency चा खर्च हे भूत सर्वांच्याच मानगुटीवर बसलेल असतं. त्यावर तोडगा म्हणून सर्व कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप इन्शुरेंस ची योजना. सर्व पैसे कंपनी भरणार. कर्मचाऱ्यांना एकही पैसा खर्च येणार नव्हता.

सर्वसाधारण औषधोपचारांसाठी दर महिन्याला काही रक्कम, आणि जेष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या साठी वेगळी तरतूद.

मुलांच्या शाळेचा संपूर्ण खर्च कंपनी उचलेल.

हे ठरल्यावर मग आर्थिक बाबी तपासून घेण्यासाठी चोरघडे होतेच. त्यांच्या बरोबर मीटिंग केली. त्यांनी सर्व समजून घेतल आणि म्हणाले की

“शाळेचा संपूर्ण खर्च ही बाब काही पटत नाही.”

“का ? खूपच खर्चाची गोष्ट आहे का ?” अंजिकरांनी विचारलं.

“नाही कल्पना अवास्तव आहे. कंपनी खर्च करणार म्हंटल्यांवर, सगळेच महागातल्या महाग शाळेत आपल्या मुलांना घालतील आणि तो लाखों रुपयांचा खर्च चांगलाच अंगलट येईल. त्यापेक्षा सर्वांच्या सध्याच्या शाळेचा साधारण खर्च काय आहे ते बघून त्या प्रमाणे प्रत्येक मुलाच्या मागे तेव्हढा खर्च उचलू. त्यातही बालवाडी, प्राथमिक आणि highschool असे तीन भाग करून त्याप्रमाणे देवू. मी तर अस म्हणेन की ८५  टक्के कंपनी आणि १५  टक्के कर्मचारी स्वत:, अशी विभागणी करावी म्हणजे त्यांचाही यात सहभाग असेल. ही योजना फक्त शाळे पर्यंतच मर्यादित ठेवा. कॉलेज याच्यात जोडू नका.” चोरघाड्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. चोरघडे जे म्हणाले त्यात तथ्य होत. आम्हालाही ते पटलं. मग आम्ही वाघूळकर सरांकडे गेलो. त्यांच म्हणणं जरा वेगळंच होत.

“आपण पहिल्या दोन बाबतीत काही बदल नको करूया. पण शाळेच्या बाबतीत सुद्धा, मला अस वाटत की विभागणी ७५ : २५ अशी असावी. सगळंच कंपनी च्या अंगावर टाकण्याच्या मुळे लोक आळशी होतील आणि ऐपतीच्या बाहेर खर्च करतील आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या, अशी परिस्थिती निर्माण होईल. तेंव्हा हे ७५ : २५ अस असाव अस मला वाटत.”

“आणखी एक मुद्दा तिन्ही गोष्टी एकाच वेळी देवू नयेत  अस मला वाटत.

आता दिवाळी तोंडावर आहे. तेंव्हा पहिली योजना जाहीर करू. शाळा सुरू होण्याच्या वेळेस दुसरी आणि पुढच्या दिवाळीला तिसरी. एकाच वेळेस जाहीर केल्या तर भलताच पायंडा पडेल आणि लोकांच्या अपेक्षा फार वाढून जातील. मग एखाद्या वेळेस कमी मिळाल तर unrest होण्याची संभावना पण नाकारू शकत नाही.” – वाघूळकर.

शेवटी मसुदा फायनल झाला. त्या दिवशी शनिवार होता आणि उशीर पण झाला होता. सोमवारी अविनाश आणि नितीन सरांची वेळ घेऊन त्यांच्या समोर ठेवायच ठरल. मधल्या काळात निकिता त्यांच्याशी बोलणार होती.

 

 

निकिता

सोमवारी बाबांच्या आणि नितीनच्या समोर वाटवे मॅडम नी मसुदा ठेवला. त्या आधी, मी घरी दोघांच्या समोर सर्व तपशील ठेवले. आमच्या मध्ये काय काय चर्चा झाली ते ही सविस्तर सांगितल. दोघांनीही संमती दाखवली. आई तर फारच खुश झाल्या. सोमवारी मसुदया वर शिक्का मोर्तब झाल. आणि दिवाळीला पहिली योजना जाहीर करायचं  ठरलं.

योजना जाहीर झाली. बोनस पण दिल्या गेला. लोक खुश होते. दिवाळी छान पार पडली. माझी पहिलीच दिवाळी असल्याने आम्ही सगळे एक दिवस औरंगाबाद ला जाऊन आलो. पुनः सगळ नेहमी सारखं सुरू झाल. माझ काम संपल्या मुळे नी थोडा ब्रेक घ्यायच ठरवल होत. त्यामुळे मी घरीच असायची. सगळ कस सुरळीत चालू होत.

त्या दिवशी नितीनला मुंबईला मीटिंग होती, म्हणून तो सकाळीच निघून गेला. नेहमीच्या वेळी बाबा तयार होऊन खाली आले येतांना ग्लुको मिटर आणल होत. आज गुरुवार असल्याने त्यांचा साखर चेक करायचा वार होता. ते रक्त पातळ होण्याच औषध घेत असल्यामुळे त्यांना चिकट पट्टी लावावी लागायची. ते काम माझ्याकडे होत. म्हणून त्यांनी चेक केल्यावर मी बोटाला पट्टी लावून टाकली आणि चहा आणायला आत गेले. आई त्यांच्या आराम खुर्ची वर बसून पेपर वाचत होत्या. त्यांना चहा देऊन, बाबांचा चहा आणि नाश्ता टेबला वर ठेवला.  बाबांच्या हातात पेपर होता. बाबांना म्हंटलं “बाबा चहा घेता न.” आणि मी माझा चहाचा कप घेऊन आईंच्या शेजारी जाऊन बसले. थोडा वेळ गेल्यावर आईंनाच काहीतरी विचित्र वाटल. त्या म्हणाल्या निकिता हे असे का बसले आहेत पेपर च पान पण उलटत नाहीये. आम्ही जवळ गेलो आणि मी तर किंचाळलीच बाबा बेशुद्ध होते. आणि एकदमच रडारड सुरू झाली. बाहेर रघुवीर होता तो धावतच आत आला. काय करावं तेच सुचेना. रघुवीरनेच अॅम्ब्युलन्स बोलावली. तातडीने हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो. पण तिथे डॉक्टरांनी सांगितल की पेशंट मृत्यू पावला आहे. बहुधा हार्ट अटॅक असावा. मी नितीन ला फोन लावला पण मला काही धड बोलता येणं शेवटी रघुवीरनेच सगळं सांगितलं. तो मुंबईच्या अर्ध्या वाटेवर होता. तो म्हणाला की मी परत फिरतोय पण यायला तास भर तरी लागेलच.

थोड्या वेळाने नितीनचे काका आणि चुलत भाउ निखिल आले. नितीननेच त्यांना फोन करून सांगितल की बाबा बेशुद्ध झाले आहेत आणि त्यांना हॉस्पिटल मध्ये नेलं आहे. आई आणि निकिता एकट्याच आहेत म्हणून ते दोघ आले होते. तासांभारानंतर नितीन आला. आमच्याशी बोलून डॉक्टरांना भेटायला गेला. मी आईंच्याजवळ बसले होते. तो बाहेर आल्यावर म्हणाला की डॉक्टर म्हणताहेत की heart failure असण्याची शक्यता आहे. पण मोठे डॉक्टर येऊन बघतील आणि मगच सर्टिफिकेट मिळेल.

मग आता ? आई नी विचारल.

आता काही नाही इथे बसायचं आणि वाट पाहायची. सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय पुढे काहीच करता येत नाही.

साधारण तास उलटला. वेळ जाता जात नव्हता. वॉर्ड बॉय आला आणि म्हणाला चिटणीस कोण आहेत ? त्यांना डॉक्टरांनी बोलावल आहे. नितीन, काका, आणि निखिल तिघेही आत गेले. आम्ही बाहेरच थांबलो. थोड्या वेळांनी तिघेही बाहेर आले. त्यांच्या कडे पाहिल आणि कसली तरी अशुभ पाल मनात चुकचुकली. तिघांचेही चेहरे पांढरे फटक पडले होते. कोणी काही बोलतच नव्हत. आणि नितीन रडायलाच लागला. तो काही बोलेच ना.

शेवटी काकांनीच सांगितल की बाबांचा मृत्यू नैसर्गिक नाही अस डॉक्टर म्हणताहेत त्यांच म्हणणं आहे की शरीर काळं निळं पडलं आहे त्यामुळे ही आता पोलिस केस झाली आहे. पोलिस येतील आणि तेच काय ते सांगतील. आम्ही काकांकडे बघतच राहिलो. डोक बधिर झाल होत. काही समाजण्या पालीकडचं होत हे सगळ. नितीन रडतच होता. आता आईंचा पण बांध फुटला. मला वेडच लागायच बाकी होत. थोड्या वेळाने पोलिस आलेत. वॉर्ड बॉय बोलवायला आला. नितीन थाऱ्यावर नव्हता मग काकाच गेले त्याच्याबरोबर. थोड्या वेळांनी  आले. न बोलता बसले. काही वेळानंतर म्हणाले की बॉडी पोस्ट मारटेम ला नेली आहे. आता इथे बसून उपयोग नाही.

मागोमागच पोलिसही आलेत.

“मी इंस्पेक्टर पाटील. चिटणीस साहेबांचा असा मृत्यू होईल, अस कधीच वाटल नव्हतं. मोठा सज्जन आणि दिलदार  माणूस. तुम्हाला या परिस्थितीत त्रास द्यायला अजिबात आवडत नाहीये पण एक गोष्ट अतिशय महत्वाची असल्याने सांगणे आवश्यक झाले आहे. बोलू का ?”

“बोला,”   काका

“घटनेच्या वेळी घरी कोण कोण होत ?” – पाटील.

“वहिनी, त्यांची सून निकिता आणि राधाबाई आणि रघुवीर, साहेबांचा ड्रायव्हर.” काकांनी माहिती दिली.

“तुम्ही कोण” – पाटील.

“मी जे मृत्यू पावले त्यांचा धाकटा भाऊ, हा निखिल माझा मुलगा आणि हा नितीन, साहेबांचा मुलगा आणि माझा पुतण्या.” काकाच बोलले.  

“राधाबाई  कोण” – पाटील  

“त्या त्यांच्याकडे काम करतात, राहतात ही तिथेच. बऱ्याच वर्षांपासून आहेत.”-काका

“त्या इथे दिसत नाहीत म्हणजे त्या घरी आहेत का ?” – पाटील.

“होय” – काका.  

“त्यांना ताबडतोब फोन लावा आणि सांगा, की कुठल्याही वस्तूला हात पण लावू नका. घर झाडू नका. कुठलीही आवरा आवर करू नका. आम्हाला घटनेच्या वेळी घर ज्या अवस्थेत होत त्याच अवस्थेत बघायचं आहे. आम्ही आता येतोच आहोत. सांगा त्यांना. आणि हो बॉडी बरोबर आमचा माणूस गेला आहे पोस्ट माऱ्टेम आटोपल्यावर तो आम्हाला फोन करेल आणि आम्ही तुम्हाला. मग तुम्ही जा आणि जी काय प्रोसीजर असेल ती करून बॉडी ताब्यात घ्या. इथे थांबून काही उपयोग नाही. परब, गवळी  चला.” पाटील म्हणाले.

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.