Kamini Traval - 27 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग २७

Featured Books
Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग २७

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २७

सकाळी सकाळी प्राचीला सरदेसाई काकांचा फोन येतो.

"हॅलो.बोला काका."

"प्राची तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. भय्या तयार झाला वहिनींना घरी येऊ द्यायला."

" काका खूप खूप धन्यवाद. तुम्ही केवढं मोठ्ठं काम केलंय माझं. आईं तर सारख्या अस्वस्थ आहेत.मी शंकरला आजच बोलावते. आईंना घेऊन जाईल तो."

"अगं चांगलं तासला भय्याला एवढा आजारी आहे पण हरामखोराची घमेंड जात नाही. तू आता काळ्जी करू नको. मी कालच त्याला सांगून टाकलंय की मी रोज येणार आहे म्हणून. सध्या रोज जाण्याचा माझा उद्देश हा आहे की मध्येच या प्राण्याचं काही बिनसलं तर वहिनींची पंचाईत होईल. आमचा मित्र आहे म्हणून सांगतो व्हिमझिकल स्वभावाचा आहे हा. मी पुरून उरतो म्हणून गप्प बसतो. तू आता बिनधास्त रहा.मी तुला मधुन मधून कळवत जाईन."

" हो ठीक आहे."

" चल ठेवतो फोन." सरदेसाई काकांनी फोन ठेवताच.तिने कामीनी बाईंना सांगितलं

" आई तुम्ही तुमची बॅग भरा.मी शंकरला फोन करते.तो गाडी घेऊन येईल.आत्ताच सरदेसाई काकांचा फोन आला होता.भय्यासाहेब तयार झालेत.""

" प्राची किती सगळ्यांची काळजी घेतेस? मागच्या जन्मीचे आपले काहीतरी ऋणानुबंध नक्कीच असतील.म्हणूनच तू आमच्या आयुष्यात आलीस." कामीनी बाईंनी प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवला.

***

भय्यासाहेब पलंगावर डोळे मिटून पडलेले असतात. त्यांना काल जयंत बोलला ते आठवत होतं.

"अरे भय्या आतातरी आपला अहंकार झटक.एवढा मोठा झटका मिळाला आहे. त्यातून तू सुदैवानी वाचला. आता तरी बायकोशी, मुलाशी,सुनेशी प्रेमाचे संबंध निर्माण कर. तू वहिनींना येऊ नको म्हटल्यामुळे त्या तिकडे अस्वस्थ आहेत. कसं तुझं मन इतकं दगड आहे?"

"काही अस्वस्थ नाही.इतकी माझी काळजी असती तर गेलीच नसती हे घर सोडून."

"आपण कसे वागलात वहिनींशी?कधी प्रेमानी बोललास त्यांच्याशी? त्या ऊपकाराखाली दबलेल्या राहील्या. ज्यांच्यावर उपकार केले ते वहिनीचे भाऊ बहिण आले का धावत तुझ्या या आजारपणात? तुझ्या व्यसनी मुलाशी प्राचीचं लग्नं लावलस हा केवढा मोठा धोका केलास तू प्राचीशी आणि तिच्या घरच्यांशी. तरी त्या मुलींनी जिद्दीनी हर्षवर्धनला व्यसनेच्या विळख्यातून बाहेर काढलं. व्यवसायाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना तिनी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू करून पुढे नेते आहे. काहीतर गूण बघ प्राचीमधले.
आता उतारवयात एकत्र रहा सगळे. त्या हर्षवर्धनला आतातरी बापाचं प्रेम दे.त्याच्या मनात तू प्रेमळ वडलांच्या रूपात नाहीसच. हा त्याचा दोष नाही. तुझा दोष आहे.तू सतत अहंकार, दडपशाही वृत्तीनी वागलास पण वहीनींनी कधी तोंडातुन चकार शब्द काढला नाही तुझ्याविरूद्ध इतक्या वर्षात. इतकी गुणी बायको मिळून सुद्धा तू करंटा निघालास. त्यांचं महत्व तुला कळलं नाही.

आता तरी जागा हो. प्राचीसुद्धा फार गुणी मुलगी आहे.तिला तू का सून करून घेतलीस हे आलंय माझ्या लक्षात.तुला लहानपणापासून ओळखतो मी. तुझा हेतू प्राचीनी सफल होऊ दिला नाही हे तुझं दु:ख आहे. तू फसवलं म्हणून ती घटस्फोट घेऊ शकली असती पण तिनी तसं न करता हर्षवर्धनमध्ये सुधारणा घडवून आणली. खरतर हे काम तू करायला हवं होतं. तुझा मुलगा आहे तो.
तुझं काळीज बाप म्हणून कधीतरी धडधडलं का रे हर्षवर्धनसाठी? माझ्या समोरच तू त्याचा अपमान केला आहेस.
तुझं सगळं विचीत्र वागणं विसरून अर्धांगीनी या नात्याने वहिनी इथे यायला धडपडतात आहे आणि तू नाही म्हणतोस. हा तर शुद्ध मूर्खपणा आहे.
वहिनी इथे आल्यावर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कर. नव्या नजरेनी त्यांच्याकडे बघ. इतक्या वर्षांचं राहिलेलं नव-याचं प्रेम त्यांना दे. तुझ्याकडे अगणित पैसा आहे. त्यांना घेऊन प्रवासाला जा. आयुष्यभर वहिनींना या चार भींतीच्या आत डांबून टाकलस. ज्या गोष्टी उत्साहाने तरुण वयात करायच्या त्या तू कधीच केल्या नाहीस त्या आता कर.
म्हातारपणी नवरा बायकोनी एकमेकांवर प्रेम करू नये असं लिहीलेले नाही. हात जोडतो मी तुझ्यापुढे तू अहंकार बाजूला ठेऊन वहिनींबरोबर नवीन आयुष्य सुरु कर.
मी तुझा जवळचा मित्र आहे म्हणून तुला एवढं बोललो. तुझी काळजी वाटते म्हणून बोललो. आजपर्यंत कधी बोललो नाही कदाचित आजही बोललो नसतो.पण प्राचीनी मला गळ घातली मी हे तुला सांगावं म्हणून. तिचा जीव तिच्या सासूसाठी कासावीस झाला होता. आजकाल एवढी समजूतदार, जीव लावणारी मुलगी सून म्हणून मिळत नाही. त्यातच जिची अशी फसवणूक झाली असेल तितर मुळीच असं वागणार नाही. आत्ता सांग मला तुझा निर्णय. तुझा नकार असेल तर आपली मैत्री संपली."

जयंत एवढं बोलून थांबले.एका दमात बोलल्यामुळे आणि बोलताना मनात भय्यासाहेबांबद्दल राग असल्याने जयंतीला धाप लागली होती.

भय्यासाहेब चक्क रडायला लागतात. जयंत हे शांतपणे बघत असतो. त्याच्या चुका कळल्यामुळे त्याला रडायला येतंय हे जयंतनी जाणलं.

ब-याच वेळानी भय्यासाहेब रडायचे थांबले.

"जयंता तू खरच अंजन घातलं माझ्या डोळ्यात .इतकी वर्ष मी फक्त माझ्या पुरतच जगलो. प्राचीला सून करून आणलं तेव्हा माझ्या मनात तिच्याबद्दल विकृत आकर्षण होतं.आता याची मला लाज वाटते."

"भय्या तुला काय वाटलं मला हे कळलं नाही.पण मी बोललो नाही. कारण आजपर्यंत तू माझा सल्ला कधी ऐकला? लहानपणापासून तुझं सगळंच विचीत्र होतं."

"जयंता तू म्हणतोस सगळे एकत्र रहा.पण मला आता प्राचीच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत नाही."

"तुला तुझी चूक कळली नं. बस्स तू सरळ तिची माफी माग. आता इथे पुन्हा तुझा अहंकार आडवा येऊ देऊ नको. प्राची फार समजूतदार मुलगी आहे. ती लगेच माफ करेल. आता तिच्याकडे वडलांच्या नजरेनी बघ.मग सगळं सुरळीत होईल. "

यावर भय्या साहेब म्हणाले,

"कामीनीला येऊ दे इकडे. मी आयुष्यभर तिला प्रेम दिलं नाही सतत माझ्या धाकाखाली ठेवलं. तिच्यात काय गूण आहेत बघायचा प्रयत्न नाही केला. मी माझ्याच मस्तीत राहिलो." भय्यासाहेब हुंदके देतच बोलले.

"ही मस्ती आता सोड.मी आत्ता प्राचीला फोन लावतो.तू बोल"

." मी?"

" हो. प्रत्यक्ष सांगण्यापेक्षा फोनवर बोलून तिची माफी माग ते सोपं जाईल.नंतर वहिनींशी बोल.""

" नको तूच घरी दोघींना निरोप दे.कामीनी इथे आली की तिची माफी मागीन."

" ठीक आहे. तुझी इच्छा. मी निघतो.पंडीत येणार आहे नं स्वयंपाकाला?"

" हो."
"चल निघतो."

असं म्हणून जयंत घराबाहेर पडला.त्याचा चेहरा खूप आनंदी होता कारण खूप मोठं मीशन तो जिंकला होता. एका कुटूंबाला एकत्र आणण्याचा त्याचा प्रयत्न अर्धा यशस्वी झाला होता. पुढलं आता सगळं आता छान होणार याची त्याला खात्री होती.

***

शंकर कामीनी बाईंना घेऊन घरी आला. कामीनी बाईंनी दबकतच घराची बेल वाजवली. भय्यासाहेबांसाठी जो केयर केअर ठेवलेला असतो तो दार उघडतो.

कामीनी बाई घाबरतच घरात शिरल्या. शंकर त्यांची बॅग आत आणतो. कामीनी बाई भय्यासाहेबांच्या खोलीत डोकावतात. भय्यासाहेब त्यांच्याकडे बघून हसतात. कामीनी बाई चक्रावतात. त्यांना वाटतं आजारांनी. यांचं डोकं फिरतं का? माझ्याकडे बघून हसतील कसे? आपल्यामागे कोणी आहे का? हे त्या मागे वळून बघतात. कोणीच नसतं.

" ये कामीनी""
भय्यासाहेब म्हणतात. आतातर कामीनी बाईंना आपलं डोकं फिरलय असं वाटायला लागतं भलते सलते भास होऊ लागलेत. भय्यासाहेब आपल्याकडे बघून हसतील आणि ये म्हणतील.

"कामीनी काय झालं? बरोबर आहे तुझं गोंधळणं. माझ्यातला हा बदल बघून तुला आश्चर्य वाटतंयनं? ये बस इथे." बाजूच्या खुर्चीकडे बोट दाखवून भय्यासाहेब म्हणाले.

कामीनी बाई दबकतच खुर्चीवर बसल्या.भय्यासाहेब पलंगावर उठून बसले तसे कामीनी बाईंनी त्यांच्याही नकळत आपली खुर्ची मागे सरकवली. त्यांची कृती बघून भय्यासाहेबांना हसायला आलं.

"कामीनी तुझं मला इतकं घाबरणं स्वाभाविक आहे. कारण आयुष्यभर मी तुझ्याशी कसाया सारखाच लागलो. फक्त स्वतःमध्येच मी मश्गूल असायचो. काल जयंता एवढा मला बोलला नसता नं तर मला माझी चूक कळली नसती.
जयंता ऐवजी दुस-या कोणी माझी कानऊघाडणी केली असती तर मी ऐकलं नसतं.जयंता माझा लहानपणाच्या मित्र आहे. त्याला माझी काळजी असते हे मला लहानपणापासूनच माहिती होतं.
मी खूप वाह्यात आणि नीच वृत्तींनी लागलो. तुझ्याशी, हर्षवर्धनशी, प्राचीवर तर माझी वाईट नजर होती. कामीनी अशी घाबरून खाली बघू नकोस.जयंताच्या बोलण्यानी चोवीस तासांत मी खूप बदललो.

तुझ्यात प्रेमीका कधी शोधली नाही आणि बाहेरच्या बायकांमध्ये ते सूख माझ्या नजरेतून मिळवत होतो. दुस-यांची मुलं मला गुणी वाटायची. हर्षवर्धनमधले गूण बघण्याचा प्रयत्न केला नाही.

प्राचीला तुझ्यातली माया दिसली. तुझ्या मनाचं सौंदर्य दिसलं. मलापण तिनी चांगलं जोखलं. कामीनी या उतरत्या वयात आलेल्या आजारपणामुळे मला स्वच्छ दिसू लागलं कारण ती दृष्टी मला जयंतानी दिली.ती दृष्टी आल्यावर आता वाटतंय मी अख्खा आयुष्य जवळ असलेलं अमृत दूर लोटून बाहेरच्या कचकड्याच्या जगात हे अमृत शोधत बसलो."

बोलता बोलता भय्यासाहेब कामीनी बाईंचा हात हातात घेतात. त्यांचा हात थरथरत असतो. डोळ्यातुन पाणी वाहत असतं.

परमेश्वराला धन्यवाद देऊन मनातच त्या म्हणतात.

" परमेश्वरा या आजाराच्या रूपांनी आणि जयंत भावजीच्या रूपाने येऊन माझी मदत केलीस. इतकी वर्ष ज्या माणसाच्या प्रेमाची मी भुकेली होते तो माझा माणूस आणि त्याचं प्रेम मला मिळवून दिलस.तुझी आयुष्यभर ऋणी राहीन.

"कामीनी रडू नको.तुझ्या सहवासातील मी बरा होईन. हर्षवर्धन आणि प्राचीला पण इथे आणू. प्राचीच्या नजरेला नजर मिळवण्याची माझ्यात हिम्मत नाही. हर्षवर्धनला पुर्वी जे बाबा म्हणून माझ्याकडून हवं होतं. ते सगळं मी देईन. फक्त तू मला आता दूर लोटू नको.माझी रहा."

भय्यासाहेबांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. इतक्या वर्षात डोळे पाणी गाळणंच विसरले होते.त्यांच्या डोळ्यांना राग,वाईट नजर याचीच सवय होती.

कामीनी बाई म्हणाल्या,

" मी कुठेही जाणार नाही तुम्हाला सोडून. इतकी वर्ष तुमच्या सहवासाची, प्रेमाची वाट बघीतली. आता मी मरेपर्यंत इथेच राहणार तुमच्या जवळ."

शंकर काहीतरी कामांनी आत येत होता तेव्हाच त्यांच्या कानावर भय्यासाहेब आणि कामीनी बाईंचं संभाषण पडलं.तो बाहेरच थबकला.आत मध्ये जसे दोघांचे डोळे झरत होते तसेच शंकरचेही डोळे पाझरत होते. गेली वीस वर्ष तो भय्यासाहेबांकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता.

त्या दोघांनी त्याला नोकरी मानलं नाही. म्हणूनच हर्षवर्धन, प्राची आणि कामीनी बाई या घरातुन गेल्या तेंव्हा त्याला फार वाईट वाटलं होतं.त्या दोघांचं संभाषण ऐकल्यावर बाई इकडे राह्यला येणार म्हणून आनंद झाला.तो डोळे पुसत तसाच माघारी वळला.

भय्यसाहेब रडतच बोलले

"कामीनी मला प्राचीची माफी मागायची आहे पण तिच्यासमोर जाऊन माफी मागू शकत नाही."

"मी लावते प्राचीला खूप शहाणी मुलगी आहे ती. करेल माफ तुम्हाला. तुमच्यावरचा राग इतकी मनात धरून बसली असती तर तुम्ही दवाखान्यात आहे कळल्यावर बंगलोरला पोचल्या पोचल्या लगेच निघाली नसती इकडे यायला."

"काय ! ती बंगलोरला गेली होती?"

" फक्त ती नाही. हर्षवर्धन आणि ती दोघं आपल्या संसाराची सुरुवात करायला म्हणून गेले होते. तिथे पोचल्याचा तिनी मला फोन केला नंतर शंकरचा मला फोन आला. मी,राधा,शशांक,प्राचीने वडिल आणि शंकर सगळे दवाखान्यात असताना प्राचीला तिच्या वडिलांनी कळवलं तुम्ही दवाखान्यात आहात म्हणून. लगेच दोघं निघाले. तुमचा राग तिच्या मनात असता तर कशाला आली असती."

"कामीनी मला प्रायश्चित्त घ्यायचंय. तुला भरपूर प्रेम द्यायचं आहे. आपल्या आयुष्याच्या नव्या डावाला सुरवात करायची आहे. हर्षवर्धनलापण प्रेम द्यायचं आहे."

कामीनी बाई प्राचीला फोन लावतात.

"हॅलो...आई काय झालं?सगळं ठीक आहे नं तिकडे?"

" हो .सगळं ठीक आहे. यांना तुझी माफी मागायची आहे.बोल त्यांच्याशी."

कामीनी बाईंनी फोन भय्यासासेबांच्या हातात दिला.
भय्यासाहेबांना दिर्घ श्वास घेउन बोलायला सुरुवात केली,

"प्राची आय ॲम साॅरी.मी खूप विचीत्र लागलो. तुमच्या तिघांशी. काल जयंता नी माझी कानउघाडणी केली नसती तर आजही मी तसाच लागलो असतो.तू मला माफ कर. तुझ्या सासूला आता खूप प्रेम देईन. तुझा माझ्या वरचा राग गेला की आणि हर्षवर्धनला मला भेटावसं वाटलं तरच तुम्ही इकडे या आपण एकत्र राहू…..ऐकतेस नं?"

" हो ऐकतेय . तुम्ही काळजी करु नका काही दिवस आईंना भरपूर वेळ द्या.आपल्या तब्येतीची काळजी घ्या.तोवर हर्षवर्धनचं मन वळवते. मग आम्ही तिकडे येउ.ठेऊ फोन?"

प्राचीने फोन ठेवला आणि विचार करू लागली एवढा बदल खरं असेल की खोटा? ऊद्या जयंतकाकांशी चर्चा करूनच ठरवू. हर्षवर्धन तिचा चेहरा न्याहाळत होता.

"कोणाचा फोन होता?"

"आईंचा खूप खूष आहेत. भय्यासाहेब बदलले."

हर्षवर्धन बोलत नाही पण त्याचा विश्वास बसत नाही.तो गप्पच राहतो.
,--------------------------------------------------------------
क्रमशः
लेखिका ...मीनाक्षी वैद्य.