Ramcharitmanas - 1 in Marathi Spiritual Stories by गिरीश books and stories PDF | रामचरित मानस - भाग १

Featured Books
Categories
Share

रामचरित मानस - भाग १

रामचरितमानस - एक भक्तिपूर्ण आरंभ
नमस्कार मित्रांनो!
आज आपण गोस्वामी तुलसीदासजींच्या अमृत रचना, श्री रामचरितमानस, या महाकाव्याच्या अद्भुत जगाचा प्रवास सुरू करणार आहोत.
चैत्र शुक्ल नवमी, हा दिवस भगवान श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. वेदांमध्येही असे म्हटले आहे की या दिवशी सर्व तीर्थे अयोध्येला येतात.
या शुभ दिवशी, आपण महादेव, श्री शिवजी, यांच्या चरणी शिर झुकवून, मनापासून भक्तीभावनेने, हे काव्य रसग्रहण करूया.
रामचरितमानस हे नाव ऐकताच मनात शांतीचा अनुभव येतो. जणू काही मनरूपी हत्ती विषयरूपी अग्नीत जळत असेल तर, हे रामचरितमानसरूपी सरोवर त्याला सुख देण्यासाठी धावून येते.
हे महाकाव्य ऋषी-मुनिंना प्रिय आहे. त्रिदोष, दुःख, दरिद्रता आणि कलीयुगातील पापांचा नाश करण्याची शक्ती यात आहे.
स्वतः भगवान श्री महादेवांनी या रचनेची कल्पना केली आणि पार्वतीदेवीला सांगितली.
त्यामुळेच याला "रामचरितमानस" हे नाव मिळाले, जे महादेवांच्या हृदयातून उगम पावले आहे.
आज आपण या अद्भुत रचनेचा प्रवास सुरू करत आहोत. रामकथा ऐकताना मन प्रसन्न होईल आणि आनंद मिळेल.
मी तुम्हाला रामचरितमानस कशी रचली गेली, त्याचा हेतू काय आहे आणि जगभरात कशी पसरली याची सर्व माहिती देणार आहे.
चांगल्या माणसांकडूनही चूक होते, पण ते ती सुधारतात. दुष्ट माणूस चांगल्या लोकांच्या संगतीत चांगले कर्म करू शकतो, पण त्याचा स्वभाव बदलत नाही. त्यामुळेच चांगली संगत महत्वाची आहे.
जगात जितकेही जीव आहेत, ते सर्व राममय आहेत. देव, दानव, मानव, पितृ, प्राणी, गंधर्व आणि किन्नर, सर्व जण वंदनीय आहेत.
भगवान रघुनाथजींच्या गुणांचे वर्णन करण्याची माझी इच्छा आहे, पण माझी बुद्धी मर्यादित आहे. हे चरित्र अथांग आहे.
संत आणि भक्त यांनी माझ्या धाडसाची क्षमा करावी आणि मनापासून प्रेमाने हे रसग्रहण करावे.
रामनाम -
रामनामाचा महिमा अपार आहे. संकटात असलेले भक्त नामजप करतात आणि त्यांची संकटे दूर होतात आणि ते सुखी होतात.
या जगात चार प्रकारचे भक्त असतात.
१ -धनाच्या ईच्छेने भक्ती करणारे २-संकटात असलेने भक्ती करणारे ३- देवाला जाणून घेण्याची इच्छा असल्यामुळे भक्ती करणारे
४- देव तत्व जाणून प्रेमाने भक्ति करणारे.
चारी प्रकारचे भक्त नामजप करत असतात पण ज्ञानी भक्त देवाला विशेष प्रिय असतात.
चारही युगात नामजप चालू आहे पण कली युगात मात्र नामाशिवाय अन्य उपाय नाही.
श्रीरामानी अहिल्येचे कल्याण केले , पण नामामुळे असंख्य दुष्टांचे मन पवित्र झाले.
श्रीरामानी अनेक राक्षसांचा संहार केला पण नामजप कली युगातील पाप नष्ट करणार आहे.
श्री रघुनाथजीनी शबरी ,जटायू सारख्याना मुक्ती दिली पण नामाने असंख्य दुष्टांचा उद्धार होतो. रामनाम श्रेष्ठ आहे.
श्रीरामचरितमानस - श्रीरामनाम महिमा
रामनाम हा असा मंत्र आहे ज्याचा साक्षात महादेव व पार्वतीदेवी जप करीत असतात.
राम ही अक्षरे म्हणजे नर-नारायणासारखी आहेत , ही सर्वांचे पालन करणारी व भक्तांचे रक्षण करणारी आहेत.
तुलसीदास म्हणतात जर तुला अंतर्बाह्य प्रकाश हवा असेल तर मुखरुपी दरवाजाच्या जीभरूपी उंबरठ्यावर वर रामनाम रूपी दिवा लावून बघ. संकटात असलेला जप करतो तेंव्हा त्याचे संकट दूर होते. धन प्राप्तीसाठी प्रार्थना करणारे, संकटमुक्ति साठी करणारे , जिज्ञासू व ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त असतात.
सत्ययुगात ध्यान, त्रेतायुगात यज्ञ, द्वापारयुगात पूजा, कलियुगात नामस्मरण महत्त्वाचे आहे. रामनाम नृसिंह भगवान आहेत, कलियुग हिरण्यकश्यपू आहे, नामस्मरण करणारा मनुष्य प्रल्हादा सारखा आहे. रामनाम रक्षण करणारे आहे.
आता आपण दुष्ट लोकांबाबत काय सांगतात ते पाहू. माणसाने क्षमाशील असले पाहिजे.
आता मी दुष्टांना नमस्कार करतो. ते आपल्या हितचिंतकासाठी पण उलट वागतात. दुसऱ्याचे नुकसान हा त्यांचा लाभ आणि आनंद असतो. ज्याप्रमाणे माशी तुपात पडून तुप खराब करते तसे दुष्ट लोक दुसऱ्याच्या कामात अडथळे आणून ते बिघडवतात. संतांचा वियोग मरणासमान असतो तर दुष्टांचा सहवास दुःखदायक असतो. सज्जन व दुष्ट दोन्ही या जगात जन्म घेतात पण कमळ व जळू सारखे त्यांचे गुण वेगळे असतात. कमळाचा स्पर्श सुखदायक असतो तर जळू चिकटली की रक्त पिते. अमृत व विष समुद्रमंथनातून मिळाले तसेच सज्जन व दुष्ट जगरूपी सागरात जन्म घेतात. अमृत जीव वाचवते तर वीष मारते.
सुख दुःख, पाप पुण्य, राक्षस देवता,
जीवन मृत्यू, माया ब्रह्म, श्रीमंत-गरीब,
राजा -भिकारी, स्वर्ग-नरक हे सर्व या सृष्टीत असतात. विधात्याने हे जग गुण दोषमय बनवले आहे. संत हंसाप्रमाणे दोषरुपी पाणी सोडून गुणरुपी दुध घेतात. विधात्याने विवेकबुद्धी दिली आहे ती गुण दोषाना समजून वागण्यासाठीच.