Kamini Traval - 10 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग १०

Featured Books
Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग १०

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १०

मागील भागावरून पुढे.

हर्षवर्धनला रिहॅबसेंटरला ठेवल्यानंतर प्राची एक दिवस माहेरी गेली.आईबाबा खूष झाले तिला अचानक बघून.प्राचीनी दोघांना समोर बसवून हर्षवर्धनबद्दल सगळं सांगीतलं.ही गोष्ट ऐकल्यावर अशोक आणि वासंतीला फार धक्का बसला. अशोक म्हणाला " प्राची तू सारखी शंका काढत होतीस तेव्हा आम्ही तुझं ऐकायला हवं होतं.आता काय करायचं?" " परवा हर्षवर्धनला रिहॅब सेंटर मध्ये ठेवलंय.तो बरा झाला की आम्ही तिचं वेगळं राहू." " तिघं?"

"हो.मी ,हर्षवर्धन आणि आई.भय्यासाहेब फार नीच माणूस आहे.आई मात्र देवमाणूस आहेत.परीस्थितीमुळे त्या घरात आई अडकून पडल्या. भय्यासाहेब नीच म्हणजे इतके नीच आहेत की त्यांचं लक्ष माझ्यावर आहे." " काय?" अशोक वासंती दोघंही जोरात ओरडले. " अगं असं कसं होईल? तू त्यांची सून आहेस." वासंती चाचरत एवढंच बोलून शकली.


"आई विकृत माणसाला नातं कळत नाही.नात्यामधलं पावित्र्य कळत नाही. बाहेरच्या जगात ते वेगळ्या चेह-यानी वावरतात. मला त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. तुम्ही काळजी करू नका." प्राचीनं आईच्या हातावर हळुवारपणे थोपटलं.

"प्राची आम्ही तुला खूप मोठ्या संकटात टाकलं.तुझ्या तक्रारीला तेव्हाच लक्षपूर्वक ऐकलं असतं तर असं झालं नसतं." अशोक म्हणाले." बाबा जे घडून गेलं ते झालं आता त्यावर विचार करण्या ऐवजी आपल्याला आता पुढे काय करता येईल हे ठरवायला हवं."

" आई भय्यासाहेब घराच्या बाहेर जो मुखवटा घालून फिरतात त्याला आपण फसलो.आई बाबा तुमची यात पूर्णपणे चूक नाही. तुम्ही माझं भलं चिंतीत होता.पाठकांनी तुम्हाला जे सांगीतलं त्यावर तुम्ही विश्वास ठेवला कारण पाठक भय्यासाहेबांना तीस वर्षांपासून ओळखत आहेत. पाठकसुद्धा भय्यासाहेबांच्या मुखवट्याला फसले इतक्या वर्षांची मैत्री असूनसुद्धा.

तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला मी हे सांगण्यासाठीच आले. माझा आता खरा लढा सुरु झालाय." एवढं बोलून प्राची नी दीर्घ नि:श्वास सोडला.

"बेटा तुला कशाची गरज लागली तर सांग अगदी पैसे हवे असतील तरी." अशोक म्हणाले. " पैसे नको बाबा.मी नोकरी धरलीय. हर्षवर्धनचा सगळा खर्च भय्यासाहेबांकडून वसुल करीन. जेव्हा आम्ही वेगळं राहू तोपर्यंत ब-यापैकी पैसा माझ्याजवळ जमेल.तुम्ही माझी खूप काळजी करुन स्वतःची तब्येत खराब करू नका. आई हर्षवर्धनची आई ही माझी सासू नसून आईचं आहे.खूप प्रेमळ आहेत.सध्या खूप खूष आहेत कारण त्यांचा हर्षवर्धन आता बरा होणार आहे."


"प्राची बेटा तू जे करशील ते सांभाळून आणि पूर्ण विचार करून कर.आम्ही तुझ्याबरोबर आहोत." वासंती येणारा हुंदका आवरता बोलली.


"हर्षवर्धन बरा होऊन येईपर्यंत आम्ही त्या घरात राहणार. हर्षवर्धनसाठी सगळा खर्च भय्यासाहेबांनाच करायला लावते आहे. आजपर्यंत ते आपल्या कर्तव्यापासून अंग काढून घेत आले.आता मी तसं होऊ देणार नाही.त्यांना जी भाषा समजते त्यांचं भाषेत मी बोलणार आणि त्यांना कळणार सुद्धा नाही अशा पद्धतीनं त्यांना मूर्ख बनवीन."

अशोक वासंती हे सगळं ऐकून सुन्न झाले.काय बोलावं त्यांना कळेना. "आई बाबा तुम्हाला मी हर्षवर्धन बद्दल अपडेट देत राहीन.आम्ही कधी घर शिफ्ट करु ते सांगीन. राधा आणि शशांक आहेत माझ्याबरोबर काळजी करू नका."

प्राची निघाली तरी दोघं पुतळ्यासारखे निश्चल झाले होते. दोघांच्याही कल्पनेबाहेरचं हे सत्य होतं.हे सत्य अशोक आणि वासंती दोघांना पचवणं जड जात होतं. आपली मुलगी एवढ्या धैर्यानी या गोष्टीला सामोरी जाते आहे हे बघून तिचं त्यांना कौतुक वाटतं होतं.

***

प्राचीच्या रिहॅबसेंटरला चकरा होतं असत. हळुहळु प्राची हर्षवर्धनशी मैत्री करण्यात यशस्वी झाली होती.जेव्हा प्राची त्याला सारखी भेटू लागली तेव्हा हर्षवर्धनचा तिच्यावर विश्वास बसू लागला.तिला तो ओळखू लागला.तीनी तेव्हा त्याला सांगीतलं "मी प्राची तुझी बायको आहे आणि तुला या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी धडपड करते आहे.हर्षवर्धन मला तुझी प्रत्येक पावलावर साथ लागेल तेव्हाच तू ड्रग्ज च्या दलदलीतून बाहेर पडशील." असं सांगते.


हर्षवर्धनला फारसं काही कळलं नाही.एवढं कळलं की ही मुलगी आपल्याशी चांगलं बोलते वागते.बाकी खूप विचार करण्या इतका त्याचा मेंदू अजून तितकासा सक्रीय झाला नव्हता, नशेच्या पकडीतून अजून पूर्णपणे बाहेर पडला नव्हता.एकदा कामीनी बाई पण सेंटरला जाऊन हर्षवर्धनला भेटल्या होत्या.


तेव्हा त्यांनी त्याला सांगीतलं."बाळा प्राची तुला पहिल्यासारखं करण्यासाठी खूप मेहनत घेते आहे.तू इथे जसं सांगतील तसा वाग.सांगतील तो व्यायाम करत जा." हर्षवर्धनला तेव्हा थोडी जाणीव झाली की आपण घरी नाही.

त्यानी केविलवाण्या चेह-यानी विचारलं "आई तुला मी आवडत नाही का? तू इथे टाकून जाणार मला.?" त्याचा हा प्रश्न ऐकून कामीनी बाईंना रडायलाच आलं. रडत रडतच त्या बोलल्या." नाही रे बाळा आम्ही तुझी तब्येत छान व्हावी म्हणून तुला इथे ठेवलय. तू शहाण्या सारखं ऐक आणि वाग. तू बरा झाला की तुला घरी घेऊन जाऊ." यापुढे त्या बोलू शकल्या नाहीत.

"हर्षवर्धन आता तुला लवकर या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडायचं आहे.कारण आता आपलं लग्नं झालय." असं म्हणून प्राचीने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र हर्षवर्धनला दाखवलं. प्राचीच्या चेहे-यावर हसू होतं.हर्षवर्धनच्या चेहे-यावर त्याचा गोंधळ उडाला आहे हे दिसत होतं.

प्राची हर्षवर्धनचा हात हातात घेऊन म्हणाली, "आपलं छान घर आपल्याला बांधायचय. आपल्याला आईबाबा व्हायचंय. होणार नं तू बाबा?" यावर हर्षवर्धन फक्त हसला.त्याच्या हसण्यातून त्यांचं उत्तर नाही तर गोंधळ कळत होता.
"मी रोज तुला भेटायला येईन. आई येतील आठवड्यातुन एकदा माझ्याबरोबर. तू शहाण्या सारखा रहाशील नं?" हर्षवर्धननी यावर मान डोलावली.

सेंटरमधून बाहेर पडताना कामीनी बाईंचे डोळे अश्रू गाळणं थांबवत नव्हते. प्राचीनीही त्यांना रडू दिलं. जेवढ्या मोकळेपणानी त्या रडतील तेवढाच त्यांच्या मनावरचा ताण दूर होईल हे प्राची जाणून होती. "प्राची दहा दिवस होतील त्याला तिथे ठेऊन पण अजून माझ्या मनाला सवय नाही झाली ग त्याच्याशिवाय राहण्याची. त्याच्यात बदल असा काही झालेला दिसला नाही."


सासुचा हात हातात घेऊन प्राची म्हणाली

"आई खूप वर्षांपासून हर्षवर्धन व्यसन करतोय.ते कमी व्हायला काही दिवस लागतील.त्याला आता इथे सारख्या पुड्या देणार नाहीत कोणी. पुडी घेतली नाही की त्याला त्रास होईल. तो त्रास पुडीची सवय बंद झाल्यावर बंद होईल. त्याला व्यायाम करायला लावतील. व्यायामामुळे त्यांचं शरीर सुदृढ होईल. मग हळुहळू त्याचा त्रास कमी होईल आणि पुडीची आठवण येणार नाही." कामीनी बाई ऐकत होत्या.त्यांच्या डोळ्यात हर्षवर्धन बरा कधी होती याची प्रतिक्षा दिसत होती. प्राचीने मायेने कामीनी बाईंचा हात थोपटला.

हर्षवर्धन बरा होऊन घरी येईपर्यंत प्राचीलाच कामीनी बाईंना त्यांची आई होऊन आधार द्यायचा आहे हे प्राचीला कळलं होतं.


भय्यासाहेबांपासून वाचण्यासाठी प्राची रोज सेंटरवर जात असे.त्यावर भय्यासाहेबांनी विचारलं "रोज रोज कशाला सेंटरवर जावं लागतं.तिथे डाॅ.आणि कर्मचारी आहेत नं लक्ष ठेवायला?"या भय्यासाहेबांच्या प्रश्नाला प्राचीनी उत्तर दिलं "बाबा तिथल्या डाॅ.नीच सांगीतलं की रोज काही दिवस तुम्ही येत जा. एकदम एकटं ठेवलं तर ते मनानी खचतील. रोज आईंनी दगदग करण्यापेक्षा मी जाते."

प्राची आठवड्यातून एकदा सासूला घेऊन जात असे.ऊरलेल्या दिवसांत केव्हाही भय्यासाहेब आपला फायदा घेऊ शकतात म्हणून ती पुढे काही शिकायचं ठरवते. सेंटर आणि तिची लायब्ररी यामुळे ती एकही दिवस घरी राहत नसल्याने भय्यासाहेबांचा चांगलाच हिरमोड झाला होता.ते म्हणाले प्राचीला " प्राची अभ्यास घरी कर. कुठला कोर्स करणार आहे सांग मी फी भरतो. सगळी पुस्तकं आणून देतो.पण तू घरी अभ्यास कर.तू घरी नसतेस तर मला करमतं नाही."

प्राचीने अगदी बापूडवाणा चेहरा करून उत्तर दिलं.
"काय करु मी तरी माझ्या सरांनी वेगवेगळी पुस्तकं वाचायला सांगीतली आहेत. त्यात मग जो विषय आवडेल त्यावर पुढे काय करायचं ते बघू असं म्हणाले सर." खरं म्हणजे असं काहीही नव्हतं.ती सेंटरला जाऊन मग ती नोकरीवर जाते याचा थांगपत्ता तिनी भय्यासाहेबांना लागू दिला नव्हता. जवळ असलेल्या वाचनालयात जाते असं खोटं सांगीतलं असतं. हर्षवर्धन घरी आल्यावर त्यांच्याशी कसं वागायचं याबद्दल काही माहिती मिळते का हे ती बघायची.

बरेच दिवस झाले होते हर्षवर्धनला रिहॅब सेंटरला ठेऊन.त्याच्यात आता खूपच छान सुधारणा झाली होती. शरीर व्यायामामुळे छान झालं होतं.आता त्यांच्या डोळ्यात प्राची बद्दल प्रेम दिसू लागलं होतं. तो आता प्राची कडे बघू लागला की प्राचीच्या अंगावर शिरशिरी यायची आणि हळूच तिची नजर दुसरीकडे वळायची.

हर्षवर्धनचं असं बघणं तिला पहिल्या भेटीत अपेक्षीत होतं पण तसं तेव्हा झालं नाही आता मात्र झालं आणि ती आनंदानी मोहरून आली. कितीतरीवेळ हर्षवर्धन तिच्याचकडे बघत होता.शेवटी तिनी विचारलं "असं का बघतोय?" " प्राची तू जे धाडस केलस ते करणं खूप कठीण आहे.लग्नच मुळी तुझं अश्या मुलाशी झालं जो तुला बायको म्हणून ओळखतही नव्हता. तरी तू केवढी हिम्मत धरलीस आणि मला पुर्वीसारखं केलं."

" हर्षवर्धन हे सगळं मी आईंचा पाठींबा असल्यामुळे करू शकले." "प्राची मला अजून हवा तसा आत्मविश्वास नाही आला ग. मी नोकरी कशी करेन?"
"घाबरू नको हर्षवर्धन मी ग्राफीक डिझाइनर आहे. आमच्या सरांच्या मित्राच्या फर्म मध्ये मी काम सुरू केलंय.ज्या दिवशी तुला इथे ठेवलं त्याच दिवशीपासून मी नोकरी करायला लागले." " प्राची किती कष्ट घेतेस तू?" "हर्षवर्धन आपल्या संसारासाठी मी सगळं करायला तयार आहे."प्राची म्हणाली.

हर्षवर्धन आता तिच्याशी आपली बायको या नात्यांनी बोलायला लागला होता. ही गोष्ट प्राचीसाठी खूप महत्वाची होती. ती आता हर्षवर्धनला बघताच आनंदानी मोहरुन जात असे.

हळुहळू दोघांमध्ये खूप मोकळेपणा आला होता. एकदा असंच बोलताना तिनी त्याला बजावलं "मी नोकरी करते हे बाबांना यातलं काही माहिती नाही.तू घरी आल्यावरही मी कामाला जाईन पण बाबांना लायब्ररीत पुढचा अभ्यास करायला जाते. हेच सांगायचं आहे." "का?" याचं उत्तर तिनी देण्याच़ टाळलं आणि वेगळंच कारण सांगीतलं. प्राचीला आत्ताच कुठली गुंतागुंत नको होती. हर्षवर्धन अजून बुद्धीने तेवढा सक्षम झालेला नसल्याने प्राचीने खरं कारण सांगण्याची टाळलं
" हर्षवर्धन तुला घरी नेल्यावर तू अजून थोडा ठीक झालास की आपण ते घर सोडायच़ आहे.याचं कारण आई तुला सांगतील." यावर ठीक आहे अशी मान बोलावून हर्षवर्धन गप्प बसला.


हर्षवर्धन बरा होऊन घरी यायचा दिवस उजाडला. तिघही ठरविल्याप्रमाणे वागणार असतात. प्राची आणि कामीनी बाईं हर्षवर्धनला घेऊन घरी येतात.हर्षवर्धन गाडीतून उतरायचाच असतो की प्राची आपल्याच तो-यात घरात निघून येते. हर्षवर्धनला बघताच भय्यासाहेबांना तो आपला प्रतीस्पर्धीच वाटायला लागला. इतका हॅंडसम नवरा असताना ही प्राची आपल्याशी कशाला बोलेल? या विचारांनी भय्यासाहेबांच्या काळजात चर्र… झालं.

***

प्राची राधा आणि तिच्या होणा-या नव-याला म्हणजे शशांकला घर बघण्यासाठी सांगते. भय्यासाहेबांचं घर सोडल्यावर पैसा आणण्याचा मार्ग प्राचीलाच शोधावा लागणार होता. तसा तिनी तो शोधला होता. पण हे सगळं भय्यासाहेबांना कळू न देता चालू होतं.सगळ नियोजना प्रमाणे चाललं होतं तरीही प्राची आणि कामीनी बाईं खूप सतर्क होत्या कारण भय्यासाहेब फार धूर्त होते. हर्षवर्धन त्या दोघी सांगतील तसा वागत होता.

याच वेळी भय्यासाहेबांना मुंबईला काम निघतं ते प्राचीला म्हणतात " आता हर्षवर्धन बरा होऊन आलाय घरी. मला दोन दिवसांच्या कामांनी मुंबईला जायचय. तूही चल मस्त ट्रिप होईल. आता नाही म्हणू नकोस. तुझ्या मनासारखं झालंयनं. आता माझ्या मनासारखं वाग."प्राची विचारात पडली आता नाही म्हणता येणार नाही.आता काय करावं? ती म्हणाली .मी सरांना विचारते कारण प्रोजेक्ट संपत आलय." " प्रोजेक्ट?तू तर अभ्यास करायला जातेस नं" भय्यासाहेबांनी प्राचीला शंकेखोर स्वरात विचारलं.

प्राची भय्यासासेबांच्या प्रश्नावर सावधपणे म्हणाली,"हो. मी अभ्यास करायलाच जाते पण सरांना एका प्रोजेक्टसाठी काही महत्वाचा डेटा हवा होता तो सध्या मी त्यांना गोळा करून देते आहे. आज त्यासाठी येऊ का विचारते जर आज नको असेल तर मग आपण जाऊया." असं म्हणून गोड हसली. तिच्या या गोड हसण्याने पुन्हा एकदा भय्यासाहेबांची दांडी उडाली. भय्यासाहेब मुंबईला कधी जाणार ते प्राची राधाला कळवते.

राधानी एक छोटंसं घर भाड्यानी शोधून ठेवलेलं असतं. आज प्राचीला भय्यासाहेबांचं पक्कं कधी जाणार ते कळतं त्यामुळे ती राधाला ठीक ११वाजता घरमालकाकडे भेटायला जाउया असं सांगते.

दोघी घरमालकाला भेटतात. ऊद्या ॲग्रीमेंट करायचं ठरतं. ॲग्रीमेंट प्राचीच्या नावानी करायचं असतं. उद्याची वेळ पक्की करुन प्राची ऑफीसला जाते.

****
प्राची, राधा आणि शशांक तिचं जाऊन घराचं भाड्याचं ॲग्रीमेंट करतात आणि घरमालकांकडून घराची किल्ली घेतात. हे झाल्यावर प्राची म्हणते "परवा बाबा मुंबईला जाणार आहेत.ते गेले की अर्ध्या तासांनी शशांक तू गाडी घेऊन ये.आमचं सामान आम्ही बांधून तयार ठेऊ. तू आलास की निघू.""
"ओके ठीक आहे.आम्ही सकाळी तयार राहतो. भय्यासाहेब निघाले की मिसकाॅल दे मी राधाला घेऊन येतो. " शशांक म्हणाला. "नको शशांक मला उलटं घ्यायला येशील त्यापेक्षा तू सरळ जा मी गाडीवर येईन. ऊगाच एकांत एक पाय अडकून घोळ नको."राधा शशांकला म्हणाली. "राधा बरोबर बोलतेय शशांक." प्राची म्हणाली.

ठरल्या प्रमाणे भय्यासाहेब मुंबईला निघाले.भय्यासाहेब गेल्यानंतर लगेच न निघता थोडं थांबायचं असं प्राचीने ठरवलं कारण प्राचीला भय्यासाहेबांवर विश्वास नव्हता. मध्येच जर भय्यासाहेब जाण्याचा बेत रद्द करुन आले तर… म्हणून ही काळजी घ्यायची तिने ठरवलं. अर्ध्या तासानी सहज म्हणून प्राचीने भय्यासाहेबांना फोन केला.प्राचीचा फोन बघून क्षणभर भय्यासाहेबांना वाटलं ही येणार असेल आपल्याबरोबर म्हणून फोन केला असेल.त्यांनी आनंदानी फोन घेतला अन् घायकुतीने विचारलं," हॅलो. बोल यायची इच्छा आहे का येतो परत." त्यांचा आवाज उत्तेजीत झाल्याचं प्राचीला जाणवलं.

"नाही. मी येणार नाही. तुम्ही पुण्याबाहेर पडलात की नाही हे विचारायला फोन केला. ट्रॅफिक कसा आहे.?" हे आणि असेच जुजूबी बोलून प्राचीनी ते कुठपर्यंत पोचले यांचा अंदाज घेऊन फोन ठेवला.

"कधी निघायचं?"कामीनीबाईंनी विचारलं. त्यांनाही या तुरूंगातून लवकर बाहेर पडायची घाई झाली होती.
" आता निघुया.मी राधा आणि शशांकला फोन करते." प्राचीचा फोन आल्याबरोबर राधा आणि शशांक निघतात. पंधरा वीस मिनीटात दोघं वेगवेगळ्या दिशेनी प्राचीच्या घरी येऊन पोचले.

देवघरातील देव घेत असताना कामीनी बाई पुटपुटल्या
" देवा आता नवीन जागी मुक्तपणे श्वास घेता येईल तुम्हाला. माझ्या मुलाला सुनेला सदैव साथ द्या.त्यांचा संसार नवीन जागी बहरू दे हीच प्रार्थना." पिशवीत सगळे देव घेऊन नंतर इथल्या देवघरात एक फोटो आणि अक्षता ठेऊन त्यावर सुपारी ठेऊन कामीनी बाई देवघराबाहेर पडल्या.


पटवर्धनांच्या घराला कुलूप लावून सगळे निघाले. निघण्यापूर्वी समोरच्या खोलीतल्या टीपाॅयवर "आम्ही घर सोडून चाललो आहोत. तुम्ही दिलेल्या सगळ्या भेटवस्तू घरातच आहेत आणि तुम्ही घेऊन दिलेला मोबाईल सुद्धा इथेच ठेवते आहे." अशी चिठ्ठी लिहून ठेवायला प्राची विसरली नाही.


भय्यासाहेबांनी मुंबईहून निघतांना प्राचीला खूप फोन केले पण तिनी फोन उचलला नाही.आधी त्यांना राग आला मग ते अस्वस्थ झाले. कारण हर्षवर्धन आता बरा होऊन घरी आला होता.प्राची आता आपली होईल की नाही ही काळजी त्यांना वाटू लागली होती.मुंबई पुणे पूर्ण प्रवासात ते अस्वस्थच होते. गाडी दाराशी थांबताच भय्यासाहेब धावत आत जातात. बेल वाजवतात. बराच वेळ बेल वाजवल्या वर ते शेवटी आपल्याजवळच्या किल्ली नी दार उघडतात.

घरात शिरल्यावर प्राची...प्राची अशी हाक मारत घरभर फिरतात. प्राची कुठेच दिसत नाही.नंतर त्यांच्या लक्षात येतं हर्षवर्धन आणि कामीनी बाईपण कुठे दिसत नाहीत. ते कोसळल्यासारखे सोफ्यावर पडतात.ड्रायव्हर भय्यासाहेबांची बॅग घेऊन आत येतो. तो त्यांच्या वागण्यानी गोंधळात पडतो. तो न बोलता बॅग ठेऊन जातो.

भय्यासाहेबांच्या नजरेला प्राचीनी लिहून ठेवलेली चिठ्ठी दिसते.ती वाचल्यावर ते पार कोसळतात.त्यांनी दिलेला मोबाईल प्राचीनी तिथेच ठेवलेला असतो. त्यावर भय्यासाहेबांनी केलेले तीस मिस्डकाॅल असतात. ते स्वतःला धूर्त,हुशार समजत होते पण प्राची त्यांच्या वरताण निघाली होती.याचं फार दु:ख त्यांना झालं.
________________________________
क्रमशः भय्यासासेबांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर प्राची आता आपल्या आयुष्याची कशी सुरूवात करेल?
बघू पुढील भागात.
मीनाक्षी वैद्य.