Kamini Traval - 4 in Marathi Short Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | कामीनी ट्रॅव्हल - भाग ४

Featured Books
Categories
Share

कामीनी ट्रॅव्हल - भाग ४


कामीनी ट्रॅव्हल्स भाग ४था


मागील भागात आपण बघीतले की प्राचीने हर्षवर्धनच्या स्थळाला होकार द्यावा असं अशोक आणि वासंती यांना मनापासून वाटत असतं.बघूया प्राची होकार देईल का?

मागील पानावरून पुढे.


त्या दिवशी प्राचीनी आईबाबांच्या नकळत त्यांचं बोलणं ऐकलं होतं.वासंती कळकळीनी अशोकला म्हणत होती."अहो आपण या स्थळाला हो का म्हणतोय हे तिला समजणार नाही का?" "तू काळजी करू नकोस.आपली प्राची समजूतदार आहे.तिला कळेल आपण सांगीतलं तर.मी ऊद्या बोलतो तिच्याशी" अशोक म्हणाला."आयुष्यभर आपली आर्थिक कोंडी मिटवताना फरपट झाली. प्राची इतकी शहाणी की प्रत्येक वेळी पैशाकडे बघून मला ती गोष्ट नको म्हणत गेली. सासरी तरी तिला हव्या त्या गोष्टी सहज मिळतील. हर्षवर्धनचं काय तो लग्न झाल्यावर होईल बोलका.किती जणांचं बघतो आपण."


आता तिला कळलं की हे दोघं या स्थळाला मी हो म्हणावं म्हणून का आग्रह करतात आहेत. प्राची चटकन आपल्या खोलीत गेली. पलंगावर आडवी होवुन तोंडावर पांघरुण घेऊन हळूच डोळे पुसत होती. प्राचीला स्वतःचाच फक्त विचार केला याचं वाईट वाटलं. त्यांना मी सुखी झालेली हवी आहे हे कसं आपल्या लक्षात आलं नाही.


लहानपणापासुन म्हणजे जेव्हा तिला समजायला लागलं तसं म्हणजे साधारण आठ-दहा वर्षांची झाल्यावर तिला आठवतंय तिनी काही सांगीतलं आणि त्यांनी आणून नाही दिलं असं कधी झालं नव्हतं. तेव्हा आपण लहान होतो म्हणून आपल्याला कळलंच नाही की आईबाबांच्या पण काही इच्छा असतात.तिला आठवलं की आईनी दिवाळी शिवाय कधीच साडी घेतली नाही.घेतली तरी महागाईची नाही घेतली.


घेतली नाही कारण बाबांजवळ तेवढे पैसेच नसायचे. पैसे नाहीत म्हणून आपली आई महागाईची साडी घेऊ शकत नाही याबद्दल वाईट वाटण्याचं आपलं वय नव्हतं. पण आता कळतंय.त्यांना ज्या काटकसरीचे जगावं लागलं तसं मला जगायला लागू नये ही त्यांची इच्छा चुकीची आहे का? आई-बाबा म्हणून ते बरोबर आहेत.त्यांनी आपल्यासाठी आत्तापर्यंत खूप तडजोडी केल्या.आता आपण करायची असं प्राचीनी मनाशी पक्कं ठरवलं.


हर्षवर्धन अबोल असेल तर का असेल? त्याचा आत्ता फार विचार करायचा नाही. लग्नानंतर त्याला आपण बोलकं करू. नाहीतरी सगळे म्हणतातच प्राची दगडालाही बोलायला लावेल. हर्षवर्धन तर एक जीवंत माणूस आहे. काही दिवसांनी बोलेलच जातो कुठे? प्राचीच्या डोळ्यातून अजूनही पाणी येत होत.ते हळूच पुसून डोळे मिटून पडली.


हर्षवर्धनचा विचार डोक्यात येताच तिला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की हा अबोल असेल पण त्याची आईपण अशीच अबोल आहे.एकदाच प्राचीनी त्यांच्याकडे बघीतले होतं तेव्हा वासंती त्यांच्याशी बोलत होती म्हणून त्या तिच्याकडे बघत होत्या.पण चेह-यावर अजीबात भाव नव्हते आणि डोळ्यात खुप कारूण्य होतं. तेव्हापासून प्राची विचार करत होती यांना काय दु:ख असेल?मुलांसाठी मुलगी बघायला आल्या आहेत पण तो आनंद त्यांच्या चेहे-यावर कुठे दिसत नव्हता.आनंदाने फुलून आले होते फक्त त्याचे वडील.काय असावं?


त्या आपल्या नव-याला एवढ्या घाबरत असतील का? मुलगा बाहेरच्या जगात वडील बरोबर नसतांना बोलतो की असाच घुमेपणानी बसला असतो. प्राचीला आपलं लग्नं म्हणजे एक रहस्य वाटायला लागलं. या रहस्याचा भेद कसा करता येईल. कशानी करता येईल? त्यांच्या घरी गेल्यावर आपल्याला या गोष्टीचा सुरवातीपासून शोध घ्यायला हवा तेव्हा कळेल. नाहीतर सगळंच अवघड होऊन बसायचं.


विचार करता करता प्राचीला झोप लागून गेली.वासंती तिच्या खोलीत आली तर प्राचीला झोपलेलं बघून आश्चर्य वाटलं. अश्या अवेळी ही कधी झोपता नाही. पोरीला बरं नाही का म्हणून तिच्या तोंडावरचं पांघरुण काढून वासंतीने प्राचीच्या गळ्याला हात लावुन ताप आहे का बघीतले. ताप नव्हता. दमली असेल असं समजून तिच्या चेह-यावरुन हलकासा हात फिरवून वासंती खोलीबाहेर आली.


कपड्यांच्या केलेल्या घड्या वासंती ज्याच्या त्याच्या खणात ठेऊ लागली. प्राचीचे कपडे ठेवायला वासंती तिच्या खोलीत आली. वासंतीच्या पायाची चाहूल प्राचीला आली होती. तरीही ती तोंडावर पांघरुण घेऊन पडून राहिली. तरी अचानक तिला काय वाटलं माहित नाही तिनं तोंडावरील पांघरुण दूर करुन "आई" हाक मारली. वासंती कपाटात कपडे ठेऊन वळली तसा तिचा हात पकडून प्राची म्हणाली


"आई बस नं जरा माझ्याजवळ" " अगं बाई आज काय हे नवीन फॅड?" वासंतीनी हसतच विचारलं."काही नवीन फॅड नाही. लग्नं झाल्यावर तू कुठे मला भेटशील सारखी." असं म्हणत प्राची नी तिच्या मांडीवर डोकं ठेवलं.वासंतीलाही भरून आलं.तिच्या केसात हात फिरवत म्हणाली" खरच ग माझी सोनू नंतर सारखी सारखी नाही भेटू शकणार गावात माहेर असलं तरी."


"मी येणार हं तुम्हाला भेटायला.हर्षवर्धनचं काय तो तर त्याच्या आईबाबांकडेच राहणार. मी त्यांच्या घरी जाणार.आई मुलांनी त्यांच्या सासरी जायची पद्धत असती तर किती छान झालं असतं?" "चल वेडी कुठली." असं म्हणून वासंतीनं लाडानी तिचा गालगुच्चा घेतला.


"प्राची तू हो म्हटलस या स्थळाला म्हणून आम्हाला खूप बरं वाटलं. आमच्यासारखी आर्थिक चणचण तुला भासू नाही असं वाटतं ग. हे स्थळ समोरून चालत आलं म्हणून नाहीतर एवढ्या श्रीमंत स्थळाबद्दल आम्ही विचारच केला नसता." "हं." प्राचीने फक्त हुंकार दिला. "आपणहून मुलाकडच्यांनी विचारलं तरी धाकधुक होती मनात की हुंडा मागीतला तर,सोनं मागीतलं तर! "


"त्यादिवशी तुला बघायला आले होते तेव्हाच त्यांनी स्पष्ट सांगीतलं नं आम्हाला काही नको.तेव्हा मनावरचं दडपण कमी झालं." वासंती बोलतच होती प्राचीला झोप लागून गेली. बराच वेळ झाला प्राची काही उत्तर देत नाही म्हणून वासंतीनी खाली वाकून बघीतले तर प्राची झोपली होती.वासंती स्वतःशीच हसली आणि हळुच तिचं डोकं वासंती नी आपल्या मांडीवरुन खाली ठेवलं आणि आपल्या कामाला लागली.


प्राची खरंतर जागीच होती. तिला काही न ऐकता बोलता नुसतं आईच्या मांडीवर झोपायचं होतं.पण थोडावेळ का होईना आईच्या मांडीवर झोपली होती.नंतर तिलाच वाटलं आपण इथे आईला बसवून ठेवलं तर तिची काम राहतील.दिवसभर घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी काम करत असते नुसती.या विचाराने तिच्या मिटलेल्या दोन अश्रुंचे थेंब ओघळले.


दूस-या दिवशी सकाळी चहा घेतांना प्राचीनी अशोक आणि वासंतीवर बाॅंम्ब फोडला.म्हणाली "बाबा मला वाटतं तुम्ही दोघं त्यांच्या श्रीमंतीचा भुलले."वासंती अशोकच्या डोळ्यातील भाव समजूनही काहीच बोलली नाही. चहा पिता पिता प्राचीनी एक नजर आई बाबांकडे टाकली.ते दोघं गोंधळले आहेत हे तिच्या लक्षात आलं. "बाबा एकदम एवढे विचारात का पडलात? मी कसं तुमच्या प्रश्नाला लगेच उत्तर दिलं.माझ्या प्रश्नाचं ऊत्तर नाही का तुमच्याकडे?"


"असं काही नाही.आहे उत्तर. पण तुला ते पटणार नाही." "आई मी बाबांना विचारलं तू का उत्तर देते आहेस?" प्राचीनी बाबांकडे रोखून बघत आईला प्रश्न केला. "मी काय आणि बाबा काय दोघांचं उत्तर सारखंच आहे.जे तुला पटणारे नाही." वासंतीच्या आवाजात कोरडेपणा होता. अशोक वासंती स्पष्टपणे काहीच तिला सांगू शकत नव्हते.त्यांना माहिती नव्हतं की प्राचीने दोघांचं संभाषण प्राचीनी ऐकलंय.दोघही उत्तर न देताच गप्प बसले होते.


"तुम्हाला चांगलं वाटतंय पण मला त्या मुलाबाबतच शंका येते आहे. तो मला नाॅर्मल नाही वाटला. बघण्याचा कार्यक्रम होता तरी एक प्रश्न त्याने मला विचारलं नाही.एकदाच माझ्याकडे बघीतले पण त्याचे डोळे निर्विकार होते.एका तरूण मुलीकडे बघतोय हे भावच त्यांच्या डोळ्यात नव्हते. या माझ्या शंकेची निरसन करा.मला पटलं तर मी हो म्हणीन."


प्राची अटीतटीला आलेली बघून वासंती आणि अशोक दोघांनाही प्रश्न पडला की आता हिला असं समजायचं.प्राचीला वाटतं होतं की यांनी खरं कारण सांगून टाकावं. मी इतकी प्रश्न करतेय पण हे खरं सांगते नाही आहेत.


शेवटी अशोक बाजू सावरायची म्हणून म्हणाला."हे सगळं मी खाली उतरल्यावर भय्यासाहेबांना विचारलं. मुलाला त्यांच्या बरं नव्हतं म्हणून तो असा दिसत होता.आणि ते स्वतः म्हणाले माझ्यासमोर बायको आणि मुलगा दोघांचीही बोलण्याची हिम्मत नाही. पाठकही म्हणाले की ते खूपच कडक शिस्तीचे आहेत. गेली तीस वर्षे त्यांची मैत्री आहे. एवढी जुनी मैत्री असतांना पाठकांना त्यांच्याबद्दल खूप माहिती असणारच. पाठक आपल्याशी कशाला खोटं बोलतील."


"बाबा मुलाला बरं नव्हतं तर बघण्याचा कार्यक्रम पुढे करायचा अगदी बरं नसताना कशाला करायला हवा." " अगं त्यांना ऊद्या दहा दिवसांसाठी बाहेरगावी जायचय.म्हणून घाई." "तुम्हाला पटताहेत सगळी कारणं." " हो. आज त्यांचा फोन येईल बहुदा साखरपुड्याची तारीख ठरवायला." " होनं. मग झाल तर आता माझ्या पसंतीचा प्रश्न येतोच कुठे? करा तुम्हाला हवं तसं." एवढं बोलून जरा रागातच प्राची आपल्या खोलीत गेली. खोलीत जाताजाता ती थांबली आपण गेल्यावर हे दोघं काही बोलतात का हे तिला ऐकायचं होतं.पण दोघं फार काहीच बोलले नाहीत.


प्राचीनी रागाचा अभिनय केला होता.त्यांच्या तोंडून खरं ते ऐकण्याची. पण शेवटी तिनी आता ठरवलं होतच त्या मुलाला हो म्हणायचं. ती आपल्या खोलीत गेली.


प्राची तिथून ऊठल्याबरोबर वासंती दोघांचा चहा घेऊन टेबलपाशी आली. कपबश्या टेबलवर ठेवतानाच वासंती नी विचारलं." ऐकलं का? हो म्हणाली." अशोक नी हसत मान डोलावली. वासंती ही आनंदानी चहा घेऊ लागली.अशोक चहाचा घोट घेतांना आनंदी होता. त्यालाही वासंती सारखंच वाटत होतं. आपली मुलगी श्रीमंत घरी जातेय तिच्या वाट्याला आपल्यासारखी धावपळ आणि बेताचा पैसा पुरवण्याचा ताण राहणार नाही. रागाने का होईना प्राची हो म्हणाली यांचा दोघांना आनंद झाला.


खूप कष्टांनी आत्ता म्हणजे दहावर्षापूरवी हा वन बीएचके फ्लॅट घेतला. याचच कर्ज अजून चालूच आहे.तरी आपण प्राचीला ग्राफिक डिझायनरचा डिप्लोमा करू दिला.आता सासरी करेल नोकरी नाहीतर व्यवसाय. भय्यासाहेब म्हणालेत आहेत तिला हवं ते करू द्या. आमची ना नाही.अशोक आणि वासंती दोघांच्या दृष्टीनं मुलीनं नशीब काढलं होतं.


आजचा दिवस वासंती आणि अशोकसाठी चांगला होता. प्राचीनी मान्यता दिली हे लग्नं करायला त्यामुळे दोघांनी नि:श्वास सोडला. आता पुढची तयारी करायला दोघांना सुरुवात करावी लागणार होती.अशोक आणि वासंतीला कुठे माहिती होतं की आपलं मन राखण्यासाठी प्राची हे स्थळ पसंत नसूनही त्याला हो म्हणते आहे.


आयुष्यभर पैशाची काटकसर दोघांनी केली पण प्राचीवर प्रेमाची पाखरं घालण्यात काटकसर केली नाही म्हणूनच आज प्राची आपल्या आईबाबांचं मन जाणून शकली. आणि त्यांच्या आनंदाला आपला निर्णय,आपलं मत बाजूला ठेऊन होकार देऊ शकली.


प्राची तशी खूष नव्हती पण तिचही काही चाललं नाही. अरूदादा हेमांगी ताईशी बोलायचं नाही असं वासंतीनं तिला सांगीतलं त्यामुळे त्या दोघांना तिच्या मनातली शंका सांगता आली नाही. म्हणून ती स्वत:शीच धुमसत होती. पण आता तिला त्यामागचं कारण कळलं होतं.म्हणून प्राचीनी मनात धुमसत असलेला राग गिळून टाकायचा असं ठरवलं. आईबाबांचा आनंद हा महत्वाचा हे तिनं स्वतःला बजावलं. राधाला कळेना एकदम प्राचीचा विचार कसा बदलला.


संध्याकाळी अशोकच्या मोबाईलवर पटवर्धनांचा फोन आला. अशोक त्यांच्या फोनची वाटच बघत होता. " नमस्कार पाटणकर बोलतोय" " नमस्कार. मी ऊद्या आठ दिवसांसाठी बाहेर चाललो आहे. येत्या शनीवारी परत येतो आहे.रवीवारी सुट्टी असते सगळ्यांना.तुम्हाला रवीवारी चालेल का बघा. तसं कळवा." " हो कळवतो.ठरलं की लगेच हाॅल बघेन." " त्याची धावपळ तुम्ही करू नका. तुमच्या घराजवळ जो राधा मंगल हाॅल आहे त्याला मी सांगून ठेवलंय. तो हाॅलचा मालक माझ्या ओळखीचा आहे. तुमचं हो असेल तर मी सांगीन त्याला."


" हो चालेल. किती जणांना बोलवायचय याची यादी करतो."


"हो मग त्या हाॅलच्या मालकाला कळवीन मी.ठेवतो." "हो ठेवा." फोन ठेवल्यावर अशोक नी वासंतीला सांगीतलं.


"रवीवारी म्हणजे येत्या रवीवारी." " हो.हाॅलचं ताण घेऊ नका म्हणाले. राधामंगल कार्यालयवाला त्यांच्या ओळखीचा आहे.ते होऊन जाईल."


"साखरपुड्याची देण्याघेण्याची खरेदी करावी लागेल. कोणाकोणाला बोलवायचं याची यादी करावी लागेल. तुम्ही कधी कळवणार असं मुलाकडे सांगीतलं?" " तुझ्याशी बोलुन मग कळवतो म्हटलं." "मग लगेच कळवा. मूहूर्त कशाला बघायचा त्यासाठी." "हो करतो फोन. प्राचीला विचारतो." "कशाला? पुन्हा तासभर वाद घालायला? कळवा जमतंय आम्हाला म्हणून." "बरं लगेच सांगतो"


अशोकनी लगेच भय्यासाहेबांना कळवलं. मनातून त्याला प्राचीला विचारायला हवं होतं असं वाटतं होतं पण वासंतीच्या धाकानी तो गप्प बसला.वासंतीचही म्हणणं बरोबरच होतं.


प्राची पण आता त्या दोघांनाही तिनी काय ऐकलं हे सांगणार नव्हती. ते जर आई-बाबांना कळलं तर पुन्हा ते प्राची आपल्यासाठी तडजोड करतेय या भावनेच्या दडपणाखाली येतील.ते प्राचीला नको होतं.


लग्नात त्यांनी मागणी काहीच केली नाही.तुम्हाला जे करायचं ते करा असं सांगीतल्यामुळे अशोक वासंतीला मनापासून आनंद झाला कारण भय्यासाहेबांनी त्यांच्या तोडीसतोड सोनं मागितलं असतं तर यांना अवघडच गेलं असतं.


प्राचीला वाटलं आपल्या आयुष्यात आपण एक चांगली गोष्ट करणार आहोत ती म्हणजे आईबाबांनी पसंत केलेल्या मुलांशी लग्नं करणं.आजवर आईबाबांनी आपल्यासाठी किती वेळा तडजोड केली असेल.यावेळी आपण करू. मुलगा जरा नेभळट आणि वडलांच्या धाकाखाली दिसतो पण आपण लग्नानंतर त्याला बदलवू. हळुहळू वडलांचंपण मन जिंकून घेऊ. हर्षवर्धनची आई तर खूपच गरीब वाटते स्वभावानी. त्यांना पण आपण जिंकून घेऊन.


प्राचीच्या मनाला आता खराखुरा आनंद मिळाला. आत्तापर्यंत नेभळट मुलांशी लग्नं करणार नाही म्हणणारी प्राची आई वडलांच्या डोळ्यातला आनंद बघून सुखावत होती.कारण आता तिनी या लग्नाला होकार दिला होता.


राधाला तिचा निर्णय ऐकून जरा धक्का बसला.कालपर्यंत हा मुलगा नको म्हणणारी प्राची आज एकदम लग्नाला तयार कशी झाली.प्राचीनी तिला सगळं सांगीतलंआणि तिला शपथ घातली की "हे माझ्या आईबाबांपर्यंत पोचणार नाही याची काळजी घे."


" प्राची तू मला आज ओळखतेस का? मी नाही सांगणार." प्राची नी छानसं हसरं इमोजी राधाला पाठवलं.


प्राचीला आता सतत आईबाबांसमोर आनंदी राहण्याची धडपड करावी लागणार नव्हती कारण तिनी मनापासून होकार दिला होता. प्राचीला वाटलं निदान आपल्या आईबाबांनी आपल्याला विचारलं तरी कित्येक घरात तर मुलींना काहीच किंमत नसते. घरातलं पोतेरं अशी त्यांची किंमत असते. कसं वाटतं असेल त्या मुलींना! त्यांच्या आयुष्याचे निर्णय बाकी लोक घेतात.ती स्त्री म्हणजे किल्ली असलेलं खेळणं आहे की काय?


एक दिवस बाबांनीच त्यांच्या ऑफीसमधल्या एकाची गोष्ट सांगीतली. त्यांच्या मुलीचं म्हणे पाळण्यात असतानाच लग्नं ठरवलं होतं. प्राचीला ते ऐकूनच हसू आलं." बाबा पाळण्यात असलेल्या मुलीचं कधी लग्नं ठरवतात का?" "अगं काही लोक ठरवतात.आणि ठरविल्याप्रमाणे करतात."


" बाबा पण हे असं करणं चूक आहे." "बाळा तू अजून जग बघीतलेलं नाहीस म्हणून तुला हे विचीत्र वाटतंय." हां संवाद तिथेच थांबला कारण न बघीतलेल्या तिस-या व्यक्तीसंबंधीत घडलेल्या गोष्टींसाठी आपण का वाद घालायचा या विचाराने तिघंही गप्प बसले.


आता त्या न बघीतलेल्या मुलीची वेदना प्राचीला कळली. तिचं आयुष्य फक्त तिचं नव्हतं तर सगळ्या कुटूंबाचं होतं.सगळ्या चालीरीती निवडण्यासाठी तीच नाही कित्येक मुली हो म्हणत असतील. मी पण आई बाबांच्या मनातली मळमळ लक्षात घेऊनच आपला विचार बदलला नं. फक्त त्या मुलीवर जेवढी बंधनं असतील तेवढी माझ्यावर नाहीत आणि नसतील.राहता राहिला प्रश्न त्या मुलाचा.करू त्याच्यातही बदल.


इतका धाक बायकोवर आणि मुलांवर ठेवण़ खरच चुकीचं नाही का? बाबा म्हणतात तेच बरोबर आहे मी कुठे जग फिरले आहे. कित्ती ठिकाणी अशा गोष्टी घडत असतील.


आज सकाळीच राधाचा फोन आला. प्राची अजून साखरझोपेत होती. ब-याच वेळानी प्राचीनी फोन घेतला." काय ग राधा इतक्या सकाळी का फोन केलास?" " इतक्या सकाळी… ओं मॅडम सकाळचे दहा वाजले. सगळी दुनीया कामाला लागली. मीपण रोजंदारी करायला आली इकडे. तुम्ही झोपल्या आहे अजून." " काय दहा वाजले? आईनी उठवलं नाही मला‌."


"आतातरी उठते आहेस का?" "तुझ्या फोनची ऊठलेच आहे. बोल कशाला केला होता फोन?" " राधा त्यादिवशी मी तुला सांगीतलं होतं नं की आपल्या सरांच्या मित्राच्या घराचं इंटीरीयर करायचं आहे." " हो .त्यांचं का" "अगं माझं इंटीरीयर खूप आवडलं त्यांना. माझा पहिला चेक आज मिळाला."" अरे अभिनंदन.मग पार्टी?" " त्याचसाठी तर फोन केला."


" ऐ तुझा पहिला चेक आहे. राधा मला मोठ्या हाॅटेलमध्ये पार्टी हवी." " दिली.पण आधी अंथरुणातुन ऊठ." " उठते.ठेव फोन." प्राची खोलीबाहेर आली तर वासंती समोरच्या दाराशी भाजी घेत होती." आई तू मला उठवलं का नाही." प्राची नी विचारलं.


"अगं झोपलीस एखाद्या दिवशी उशीरापर्यंत.काय फरक पडतो.सासरी गेल्यावर असं लोळता येणार नाही.हे सगळं माहेरीच जमतं." आणि प्राची कडे बघून हसली.


" आई तू अशी बोलते आहेस जशी उद्याच मी सासरी चालले आहे."


भाजीचे पैसे देऊन भाजी घेऊन वासंती आत आली. प्राचीच्या गालाला हात लावून म्हणाली " बेटा माहेरची लज्जत आणि माहेरपणातील गंम्मत तू जेव्हा सासरी जाशील तेव्हा तुला कळेल. सध्या नाही कळणार."आणि हसतच आत गेली. प्राचीच्या सगळं डोक्यावरून गेलं. ४


डायनींग टेबलवर प्राची चहाची वाट बघत होती आणि वासंती जागेपणी प्राची बोहल्यावर उभी असल्याचं बघत होती आणि स्वतःशीच गालातल्या गालात हसत होती.


---------------------------------------------------------------


क्रमशः


लेखिका...मीनाक्षी वैद्य.