Indian independence in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | भारतीय स्वातंत्र्य

Featured Books
Categories
Share

भारतीय स्वातंत्र्य

स्वातंत्र्य दिन विशेष

भारतीय स्वातंत्र्य

दि. १५ ऑगस्ट. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा गतकाळातील अतिशय मानाचा दिवस. त्या दिवशी तमाम भारतीयांना त्यांच्या मनमुराद स्वप्नांना आकार मिळाला व जाहीर झालं की आता यानंतर ब्रिटीशांची सत्ता राहणार नाही. ते येथून आपली सत्ता सोडून जतील. आता या भारतातील सत्ता येथीलच लोकं चालवतील आणि जेही लोकं चालवतील, त्यांनी कोणाला त्रास देवू नये.
भारताला स्वातंत्र्य जाहीर होताच दि. पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजताच ब्रिटीशांचा युनीयन जॅक खाली उतरला व त्याजागी भारताचा तीन रंगी तिरंगा वर चढला.
ती रात्र. ती रात्र अतिशय मोलाची होती. सर्व भारतीयांनाच आनंद झाला होता. त्यातच तो आनंद येथील भुमी आणि वातावरणालाही झाला होता. जो आनंद प्रत्यक्ष पाहण्यासाठी पाऊस, वारा जातीनं हजर होता. तरीही लोकं डगमगले नाहीत. त्यांनी स्वातंत्र्योत्सव आपल्या गल्लीगल्लीत साजरा केला. असा स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करीत असतांना काही लोकांनाच निमंत्रण नव्हतं. त्यांना जाणूनबुजून विसरलं होतं येथील प्रशासन. ज्यांनी याच देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली होती.
स्वातंत्र्याचा उत्सव साजरा झाला आणि त्यानंतर प्रश्न उठला निर्वासीतांचा. कारण दोन देश निर्माण झाले होते. जे दोन देश धर्माच्या आधारावर निर्माण झाले होते. अर्थात हिंदुस्थानचे दोन तुकडेच केले होते एक देश होता पाकिस्तान तर दुसरा देश होता भारत.
हिंदूस्थान हा भारत पाकिस्तान या दोघांचाही भाग. भारत पाकिस्तान बनण्यापुर्वी येथील जनता ही हिंदूस्थानात निरनिराळ्या कानाकोपऱ्यात राहायची. ज्यात हिंदूही होते तसेच मुस्लिमही. या ठिकाणी पाकिस्तान देश बनविण्यात काही मुस्लिम नेत्यांची मागणी होती. परंतु त्यात तमाम हिंदूस्थानात राहणाऱ्या लोकांचे मत विचारात घेतले गेले नव्हते. ज्यात मुस्लिमांचाही समावेश होता. तसेच काही भागात राहणारे हिंदूही होते. असे हिंदू की जे भारत पाकिस्तान बनल्यावर पाकिस्तानातील कानाकोपऱ्यात राहात होते. तसेच असे मुस्लिम की जे भारत बनल्यावर भारतातील एका कोपर्‍यात राहात होते. ज्यांना भारत पाकिस्तानच्या सीमारेषाही माहित नव्हत्या. शिवाय त्यापैकी काही मुस्लिम लोकांना भारतात राहायचे होते तर काही मुस्लिम लोकांना पाकिस्तानात जायचे होते. तसंच काही हिंदू लोकांना भारतात यायचे होते तर काही हिंदू लोकांना पाकिस्तानातच राहायचे होते. त्यातच आव्हान सुरु होतं की ज्यांना ज्यांना भारतातून पाकिस्तानात जायचे असेल त्यांनी जावं व ज्यांना राहायचे असेल त्यांनी राहावं.
नेत्यांची मागणी. आम्हाला पाकिस्तान हवाच. ते खुळ त्यांच्या मनात कोणी भरलं? का भरल्या गेलं? ते खुळ फायद्याचं होतं की नुकसानदायक. यावर कोणीच विचार केला नाही. फक्त खुळ समोर आणले व त्यातून भारत पाकिस्तानची निर्मिती झाली.
त्यालाही एक इतिहास आहे. म्हणतात की भारतात आलेले इंग्रज. त्यांनी या देशावर राज्य करण्यासाठी फोडा व झोडा या पद्धतीचा अवलंब केला. ते कधी हिंदूंच्या मनात मुस्लिमांविषयी आकस शिरवीत. जेणेकरुन वातावरण चिघळायला हवं. तसंच मत मुस्लिमांच्याही मनात टाकत असत. सन १८५७ चा उठाव याच विचारातून झाला. परंतु या उठावाचे वेळेस हिंदू मुस्लीम भांडले नाहीत. ते एकत्र येवून लढलेत. फरक एवढाच की ते तुकड्यातुकड्यानं लढलेत. म्हणूनच पराभव झाला. त्यावेळेस इंग्रजांनी ओळखलं की जर हिंदू मुस्लीम एकत्र राहिले तर आपली या देशात डाळ शिजणार नाही. म्हणूनच त्यांनी लार्ड कर्झनच्या नेतृत्वात सन १९०५ मध्ये बंगालची फाळणी केली व धर्मांधतेला पहिला फाटा फोडला. त्यातच इंग्रजांनी हिंदूंची कमजोरी ओळखत मुस्लिमांना जास्तचे अधिकार देणे सुरु केले. ज्यातून हिंदूंमध्ये मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण होईल. तसंच काही मुस्लीम नेत्यांना हाताशी घेवून त्यांच्यात हिंदूंविषयी दुहीचे बीज पेरले. बीज हेच की त्यांच्यावर हिंदू अत्याचार करतात. यातूनच मुस्लीम कवी इकबालनं मुस्लीम लीग संमेलनात सन १९३० मध्ये स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली. त्यानंतर याच मागणीला सन १९३५ मध्ये दुजोरा मिळाला.
मुस्लीम लीग मुस्लिमांची. त्यातच पाकिस्तानची मागणीही मुस्लिमांची. मुस्लिमांसाठी तो खास स्वतंत्र्य देश. त्यावर काही मुस्लीम लोकं खुश होते तर काही नाखूश होते. परंतु स्वतंत्र्य पाकिस्तान कवी इकबाल यांना का हवा होता? त्यात षडयंत्र कोणाचं? ही गंभीर बाब त्या काळात कोणीही विचारात घेतली नाही. शिवाय आजही ती बाब आपल्याला कळलेली नाही.
ती इकबालनं जी स्वतंत्र्य पाकिस्तानची मागणी केली. त्यात इंग्रजांचाच हात असेल. परंतु एक विचार केल्यास तो इंग्रजांचा त्यावेळेसचा हेतू नसेल. परंतु नंतर इंग्रजांनी त्यांच्या स्वतंत्र्य पाकिस्तानची मागणी ताबडतोब मान्य केली. ज्यात दोन हेतू होते. पहिला म्हणजे आपल्याला मुस्लिमांनी चांगलं म्हणावं लागेल दुसरा म्हणजे तमाम भारतीयांना मुस्लिमांपासून छुटकारा मिळावा. कारण त्यांनी बऱ्याच वर्षांपासून पाहिलं होतं. हिंदू मुस्लीम आपापसात लढत होते व एकमेकांच्या धार्मिक भावना तर दुखवत होतेच. शिवाय एकमेकांचे मुंडके छाटायलाही मागे पाहायचे नाहीत.
मुस्लिमांची जोर धरणारी पाकिस्तान मागणी. त्याला सहमती देत इंग्रजांनी केलेले अखंड हिंदूस्थानचे तुकडे. त्यातच महात्मा गांधींना वाटत असलेलं देशप्रेम. त्यांना अखंड हिंदूस्थानचे तुकडे झालेले चालत नव्हते. कारण काही काही मुस्लीम नेत्यांनी त्यांच्याशी बोलणी केली असेल की आम्ही भारत सोडून जात नाही. आम्हाला हाकलू नये. त्यानंतर महात्मा गांधी चक्कं उपोषणाला बसले. परंतु त्यांच्या उपोषणानं देशातील काही लोकांच्या भावना थोडं ना बदलणार! शेवटी काही हिंदू लोकांना वाटत होतं की भारतात राहणाऱ्या मुस्लिमांनी पाकिस्तानातच जावून राहायला हवं. तसंच काहींना वाटत होतं त्यांनी इथंच राहावं. ते आपले मित्र आहेत. तसंच पाकिस्तानातील काही मुस्लीम लोकांना वाटत होतं की येथे राहणाऱ्या तमाम हिंदू लोकांनी भारतात जावं. तर काहींना ते तिथंच राहावं असं वाटत होतं. हाच वाद होता व यावरुनच दंगे सुरु झाले. त्यातच काही लोकांनी आपलीच माणसं कापली. ज्यातून भडका उडाला व धार्मिक दंगली सुरु झाल्या. त्याचा परिणाम हा झाला की तद्नंतरच्या काळात निर्वासीतांचा प्रश्न सुटला नाही. ज्यांना जिथे जायचे होते. ते तिथेच राहिले. त्यांची इच्छा पुर्ती झाली नाही. मात्र तो इतिहास बनला. रक्ताळलेला इतिहास. धार्मिक दंगलीचा इतिहास. जो त्यांचे त्यांचे पुर्वज आपल्या आपल्या पिढ्यांना आज सांगत आहे व त्यावरुनच त्यांना भारत जरी स्वतंत्र्य झाला असला तरी आजही हिंदू मुस्लीम वाद होतात आहे. काही काही लोकं स्वतःच स्वतःच्याच धर्मातील माणसांवर, बिरादरीवर गोळ्या चालवतात व त्याला धार्मिक रंग देवून दुसऱ्या धर्मातील लोकांची नावं पुढं करतात. त्यातच धर्मांना बदनाम करतात.
प्रत्यक्ष फाळणीची प्रक्रिया "मांउटबॅटन योजने"खाली पार पडली. ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या आधिकाऱ्याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली. १८ जुलै १९४७ रोजी ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. यात भारतातील ५६५ संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली. भारत पाकिस्तानचा जन्म झाला. भारताला स्वातंत्र्य तर मिळालंच. ज्यातून हिंदूसाठी भारत व मुस्लिमांसाठी पाकिस्तान निर्माण केल्या गेला. परंतु हे जरी खरं असलं तरी तमाम भारतात त्यावेळेपासून हिंदूंसोबत मुस्लिम राहात होते. आजही राहतात. तसेच पाकिस्तानमध्ये त्यावेळपासून हिंदू राहात होते, आजही राहतात. ज्यांना ज्यांना ज्या ज्या ठिकाणी राहायचे होते. ते राहात आहेत. याचाच अर्थ असा की आजही भारतात तसंच पाकिस्तानात विविध धर्माचे लोकं आहेत. जे त्यावेळेस अखंड हिंदुस्थानात होते. मग भारत आणा पाकिस्तान का निर्माण केला? यावर आता उत्तर सापडत नाही. परंतु हाच विषय व विचार मनात ठेवून कधीकधी आजही बॉम्बस्फोट होतात काहीकाही ठिकाणी. कधी आपलीच मंडळी बॉम्बस्फोट करुन दुसऱ्यांना बदनाम करतात तर कधी दुसऱ्या धर्माची मंडळी बॉम्बस्फोट करतात. ज्यात निरपराध लोकांचा बळी जात असतो.
महत्वपुर्ण बाब ही की झाली गोष्ट झाली. काही चुकाही झाल्यात. तसं पाहिल्यास भारताला वा पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळणं अतिशय महत्वाचं होतं. परंतु त्यातून भारत पाकिस्तान वाद उत्पन्न होणं वा हिंदू मुस्लीम तेढ निर्माण होणं तेवढं महत्वाचं नव्हतं. जो वाद आज आपण विनाकारण उत्पन्न करीत आहोत. तसं पाहिल्यास चुकांपासून शिकणं हा निसर्ग नियम आहे. हीच वस्तुस्थितीही आहे आणि हीच गोष्ट पुर्वीपासून चालतही आलेली आहे. तेव्हा झालेल्या त्या सर्व आपल्या चुका सुधारून आपण सर्व हिंदू मुस्लीम लोकं, तसेच इतरही धर्माचे लोकं एकत्रीत राहूया. पाकिस्तानचं जावू द्या. आपण आपल्या भारताचा विचार करुया. आपला भारत बलशाली बनवूया. तसंच त्याला सुजलाम सुफलाम बनवूया. जेणेकरुन येणाऱ्या पिढीतील प्रत्येक भारतीय माणसाला गर्व वाटेल व त्याची छाती वितभर फुगेल. जर आपण तसे वागलो तरच देश जागतिक महासत्ता बनेल. नाहीतर पुन्हा एकदा या भारताचे तुकडे होवून पुन्हा दोन नवीन देश निर्माण होतील. ज्यात पुन्हा एकदा निर्वासीतांचा प्रश्न उद्भवेल. मग धार्मिक दंगे, कत्तली. हिंसाचार, जाळपोळ होईल. ज्यातून विनाकारण निष्पापांचे मुदडे पडतील. मग जागतिक महासत्ता जाईल खड्ड्यात. एरवी देश सुजलाम सुफलामही बनणार नाही. अन् बलशालीही बनणार नाही. म्हणूनच म्हणणे आहे की मिळालेलं स्वातंत्र्य अतिशय मेहनतीनं व बलिदानानं मिळालेलं आहे. ते टिकवूया. तसंच अबाधीत ठेवूया. एकमेकांशी न भांडता, न वाद करता. गुण्यागोविंदाने आणि तेवढ्याच एकजुटीने.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०