Fight for agriculture? Well no in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | शेतीसाठी भांडण? बरं नाही

Featured Books
Categories
Share

शेतीसाठी भांडण? बरं नाही

शेतीच्या लहानशा तुकड्यासाठी भांडण? हे बरं नाही.

शेतकरी शेतीचा महत्वपुर्ण घटक. तो नसेल तर शेती पीकत नाही आणि शेती जर पिकलीच नाही तर अन्न मिळत नाही. त्यादृष्टीनं शेती महत्वपुर्ण आहे.
शेतकरी आपल्या शेतात अतिशय काबाडकष्ट करतो. त्यासाठी आपल्या जीवाचं रान करतो. तो शेतात राबराब राबतो. प्रसंगी तसं राबत असतांना त्यांना पोटभर खायला मिळतंच असं नाही. कधीकधी तो उपाशीही राहतो. मात्र शेतीच्या कामात तो दिरंगाई करीत नाही. ते कार्य तो वेळच्या वेळेवर करतोच. जसा आज जर पेरणी करायची असेल तर तो आजच करतो. उद्याची वाट पाहात बसत नाही. कारण त्याला माहीत आहे की आज जर पेरणी केली नाही तर उद्या शेती बुडेल. ती पिकणार नाही. अशा या काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची बरेच लोकं फसगत करीत असतात. ज्यात पशुपक्षी, निसर्ग आणि माणसे यांचा समावेश आहे. आता कोणी म्हणतील की मानवाचं ठीक आहे. परंतु पशुपक्षी कसे काय फसवीत असतील शेतकऱ्यांना. तर त्याचं उत्तर आहे, ज्यावेळेस उभं पीक डौलानं डुलत असतं. त्यावेळेस रोही, रानडुक्कर, हरणं यासारखे काही त्या उभ्या पिकातून जात असतात. तेव्हा नासधूस होते. हे झालं पशुंचं. पक्षीही पिकांच्या मुळाशी असलेले किडे खाण्यासाठी लहान लहान रोपट्यांनाच उपटून टाकतात व पिकांचं नुकसान करतात. शिवाय पीक मोठं झालं की त्या पिकांतील दाणे खाण्यासाठी लांबून लांबून पक्षी येतात व पिकांचं नुकसानच करतात. ही एक प्रकारे शेतकऱ्यांची फसगतच असते. त्याच दृष्टीकोनातून निसर्गही कमी ताल करीत नाही. तो तर शेतकऱ्यांवर कोपल्यासारखाच वागत असतो. तो शेतकऱ्यांना जेव्हा गरज असते. तेव्हा मदत करीत नाही. उदा पाऊस येणे. पाऊस हा निसर्गाचा एक घटक. ज्यावेळेस उभं पीक शेतात असतं आणि आता त्या पिकांच्या कापणीची वेळ असते. तेव्हा अलबत येतं. त्यावेळेस शेतात उभं पीक असतांना त्या पिकातील धान्याला पाऊस आल्यानं अंकूर फुटतात व ते दाणे सडतात. अशाप्रकारे बरच नुकसान होत असतं. तसंच जेव्हा शेतातील पिकांमधील दाणे भरण्याची वेळ असते, त्यावेळेस पुरेशा पावसाची आवश्यकता असते. परंतु अशावेळेस पाऊस येत नाही. तो विश्वासघात करतो व पिकांमधील दाणे भरत नाहीत व ते दाणे लहान होतात वा पिकांमध्ये दाणे पोचट स्वरुपाची तयार होतात. त्यातच अतोनात नुकसान होतं.
असा आमचा शेतकरी. त्याचं सर्वपरीनं निसर्ग नुकसान करीत असतो आणि एखाद्यावेळेस समजा निसर्गानं भरभरुन दिलं तर त्याला लुटायला व्यापारी टपलेलेच असतात. तेही शेतकऱ्यांचं नुकसानच करीत असतात. परंतु शेतकरी ते सगळं नुकसान सहन करतो. कारण शेतकरी सदोदीत होणारं नुकसानच सहन करण्यासाठी बनला आहे. तसं यातून होणारं नुकसान बऱ्याच शेतकऱ्यांना सहन होत नाही व ते आत्महत्याही करतात.
महत्वपुर्ण गोष्ट ही की नुकसान हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली गोष्ट आहे. शेतकऱ्यांचं नुकसान निसर्ग, पशुपक्षी याकडून होतं. तसंच नुकसान मानवाकडूनही होत असतं, असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. पुर्वी जमीनदारी पद्धती होती. त्यावेळेस शेतीत धान्य पेरणीसाठी शेतकऱ्यांजवळ पैसा नसायचा व शेतीत धान्य पिकविण्यासाठी शेतकऱ्यांना पैसा हवा असायचा. तो पैसा मिळविण्यासाठी हाच शेतकरी आपली जमीन सावकार वा जमीनदारांकडं गहाण ठेवायचा. दुसऱ्या वर्षी धान्य पिकल्यावर जमीनीची सोडवणूक करील असा तो विचार करायचा. परंतु दुसऱ्या वर्षीही त्याला धान्य व्हायचं नाही व शेतकऱ्यांच्या जमीनी जमीनदार वा सावकाराला पचत. आज मात्र तसं नाही. परंतु जमीन पचविण्याची आज नवीनच पद्धती आली आहे. ती म्हणजे शेतकऱ्यांच्या जमीनी आपल्या नावावर करणे. आज लोकं एवढे हुशार झाले आहेत. ते कोणाही शेतकऱ्यांना माहीत नसतांना वा होवू न देता त्यांची बनावट कागदपत्रे तयार करतात आणि अख्ख्या त्या जमीनी आपल्या नावावर करतात. आज धुऱ्याधुऱ्याच्या वादाची प्रकरणं न्यायालयात आहेत. शिवाय असे वाद पाहिले की विचार येतो त्या गरीब शेतकऱ्यांचा बिचाऱ्यांच्या जमीनी कोणी नावावर केल्यास त्यांनी न्यायालयात लढावं कसं? कोठून पैसा आणावा? तसेच या जमीनीवरुनच भाऊबंदकीचे वाद चव्हाट्यावर येत आहेत. लोकं भावांनाही ओळखायला तयार नाहीत. ते आपल्याच रक्ताच्या नात्यानं जुळलेल्या भावांची, कधी नातेवाईकांची अतिशय निर्घुणपणे जमीनीसाठी हत्या करतात. तरी वाद मिटत नाही. तद्नंतर खुनावर खुन. केवळ आणि केवळ जमीनीसाठी.
विशेष म्हणजे असे वाद मिटायला हवेत. कोणीही कोणाशी अशाप्रकारे वाद करु नये. जमीनी काय आपण सोबत नेत नाही आणि ज्या आपल्या स्वमुलांसाठी जमीनीच्या एकफुट जागेसाठी वाद करतोय ना. तो आपला मुलगा आपलीच म्हातारपणात सेवा करीत नाहीत. मग उगाच त्या जमीनीसाठी वाद का असावा आणि त्या जमीनीसाठी एकमेकांचे मुदडे का पाडावेत? ही बाब विचारात घेण्यालायक आहे. जर आपलीच मुले आपलीच जमीनीसाठी कर्दनकाळ ठरत असतील वा बाजूचा शेतकरी त्या लहानशा धुऱ्यासाठी कर्दनकाळ ठरत असेल तर आपण का भांडावं? तो धुरा वा ती एक फुट जागा आपण मरतांना उरावर मांडून नेतो काय की सोबत नेतो? शिवाय असं भांडत असतांना आपलाच जीव गेला तर काय मिळवलं आपण? ज्या जमीनीचा धुरा ज्या मुलांसाठी वाचवला, ती मुलं तरी आपलं नाव आपल्या मरणानंतर घेतात काय? याचं उत्तर नाही असंच आहे. असे जर आपल्याला माहीत आहे तर आपण का बरं शेतीच्या लहानशा तुकड्यासाठी भांडावे? तसेच कोणी का बरं त्या जमीनीच्या तुकड्याचे वाद उत्पन्न करावेत? विशेष बाब ही की आपण असे जमीनीच्या तुकड्यासाठी भांडण्याऐवजी तसं भांडणं सोडून आपण सुखी समाधानानं जीवन जगावे. त्यावेळेस आपण कधीच मरणानंतर काहीही नेत नाही, हा विचार करावा. जेव्हा आपण तसा विचार करु. तेव्हाच आपल्याला सुखी समाधानानं जीवन व्यथीत करता येईल यात शंका नाही. जेणेकरुन आपल्याबरोबर आपल्याला आपल्या बाजूच्याही शेतकऱ्यांना सुखी करता येईल. तसेच जेव्हा बाजूचा शेतकरी सुखी होईल, तेव्हा साहजिकच देश सुखी होईल आणि देश सुखी झालाच तर देश सुजलाम सुफलाम बनेल व साहजीकच देशाला जागतिक महासत्ताही बनविण्यास कोणीच रोखणार नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०