Karn - 1 in Marathi Short Stories by Payal Dhole books and stories PDF | कर्ण - भाग 1

Featured Books
Categories
Share

कर्ण - भाग 1

एक आज मला थोडं बोलायचं आहे! मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील! म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली? पण केव्हा-केव्हा अशांनाही बोलावं लागतं! जेव्हा-जेव्हा हाडामांसाची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात, तेव्हा-तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. छे! मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही; कारण मला चांगलं माहीत आहे की, तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्त्वचिंतक नाही. माझ्यापुढं जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून! आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता! अनेक प्रकारच्या, अनेक आकारांच्या विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत असा एक भाता!! आज मला माझ्या आयुष्‍याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावयाचा आहे! स्वत:च्या हातांनी त्यातील विविध घटनांचे बाण - अगदी एकजात सगळ्या घटनांचे बाण - आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत! आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे, आपल्या बांधीव आणि आकर्ष‍क आकारानं चटकन डोळ्यांत भरणारे, तसेच मोडलेल्या शेपटांमुळे केविलवाणे दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यांमुळे उघडे-बोडके, कसेतरीच, कलाहीन वाटणारे - अगदी सर्वच्या सर्व बाण - आणि तेही जसेच्या तसे - आज मला सर्वांना दाखवायचे आहेत! जगातील एकजात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहेत. धरणीतलावरील यच्चयावत मातृत्वाकडून आज मला त्यांचं खरंखुरं मोल ठरवून घ्यायचं आहे. पृथ्वीतलावरील एकूणएक गुरुत्वाकडून मला त्यांचं खरंखुरं स्थान ठरवून घ्यायचं आहे. जिवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्यांची परीक्षा करवून घ्यायची आहे. जिव्हाळ्याच्या प्रेमसरींनी ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्यांचं खरंखुरं मूल्यमापन करायचं आहे. आतून - अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गहनगंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडे मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतो. जो-जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपविण्याचा प्रयत्न करतो, तो-तो वायूच्या सुसाट झोतानं अगन्ची ज्वाला विझण्याऐवजी पूर्वीपेक्षा आधिक जोमानं जास्तच भडकत जावी, तसा तो आवाज मला पुन:पुन्हा गर्जून सांगतो, ‘सांग कर्णा, तुझी जीवनकथा आज सर्वांना सांग. आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषे‍त सांगावी अशीच आजची परिस्थिती आहे. सगळं जग म्हणतं, ‘कर्णा, तुझं जीवन म्हणजे एक लक्तर होतं!’ सांग, सर्वांना गर्जून सांग की, ते लक्तर नव्हतं; तर ते जरीकाठाचं एक तलम राजवस्त्र होतं. केवळ - केवळ परिस्थितीच्या निर्दय काटेरी कुंपणात अडकून त्याच्या सहस्र-सहस्र चिंध्या झाल्या. ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा आभिमान का वाटतो? ‘कुठल्यातरी अडगळीत, सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्याकोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा, अक्राळविक्राळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एकाकीपणानं झुंजताना फाटून गेलेलं तुझं ते राजवस्त्र कमी मोलाचं होतं काय ते आज सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे. नीट कान उघडे ठेवून ऐकू दे. वीरांच्या कथा नेहमीच चवीनं ऐकणाऱ्या आणि दुसऱ्याच क्षणी - अगदी दुसऱ्याच क्षणी त्या तितक्याच सहजपणे आणि निष्‍काळजीपणे सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदागदा हलवून सोडील काय? आहे का तिच्यात एवढं प्रचंड सामर्थ्य? ‘विश्वाच्या अंतिम सत्यतेवर ज्यांचा-ज्यांचा नितान्त विश्वास आहे, ज्यांना-ज्यांना ‘मृत्यू’ हे एक खेळणं वाटतं, अशा जगातील अजूनही आस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा ऐकावीशी वाटेल. छे! ही काय केवळ कथा आहे? ते एक महान सत्य आहे!! आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं! ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं. उगवत्या सूर्यदेवासारखं!’ कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्यांची अशी कल्पना असते की, तिच्यात मद्याचे मधुर चष‍क असावेत, नर्तिकांचे नादमय पदन्यास असावेत, स्त्री-पुरुषां‍ची आवेगपूर्ण आलिंगनं असावीत. क्षणभंगुर जीवनाची जाणीव कुठंतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी. मी सांगणार आहे, त्या माझ्या या जीवनकथेत असले मद्याचे चष‍क नाहीत. मनाला हळुवारपणे गुदगुल्या करणारे नर्तिकांचे पदन्यास नाहीत. तिच्यात आहे केवळ संग्राम! निरनिराळ्या भावभावनांचा थरारून सोडणारा संग्राम! प्राणपणानं लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक! मी माझी कथा आज केवळ माझ्या - केवळ माझ्याच समाधानाकरिता सांगतो आहे! माणसाला कुठंतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही! म्हणूनच माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे. पण माझी ही संग्रामकथा संगतवार कशी सांगावी, हीच आता माझ्यापुढची खरी अडचण आहे! कारण कडाडणाऱ्या विजेचा कानठळ्या बसविणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे इतस्तत: धावू लागतात, तशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यांसमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावताहेत, त्यांची संगतवार रचना कशी करावी, ते माझं मलाच आता सुचेनासं झालं आहे! का कुणास ठाऊक; पण या वेळी पुन:पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे ती गंगामातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावर वसलेली चंपानगरी! चंपानगरी हे माझ्या जीवनसरितेतील मला आवडणारं सर्वांत सुबक असं वळण आहे. त्या नगरीच्या नुसत्या आठवणीबरोबर माझ्या स्मृतींचं अरण्य एकदम चाळवलं जातं आणि घटनांच्या हरणांचे कळपच्या कळप धपाधप उड्या घेत धावू लागतात. कुणी म्हणतात, आठवणी म्हणजे मोरपिसांसारख्या असतात, तर कुणी म्हणतात, त्या बकुलफुलांसारख्या आपला सुगंध मागं दरवळत ठेवणाऱ्या असतात! पण मला मात्र ते कधीच पटत नाही. आठवणी या नेहमीच हत्तीच्या पायांसारख्या असतात! त्या आपला खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भूमीवर मागं ठेवूनच जातात. निदान माझ्या सर्व आठवणी तरी या अशाच आहेत. चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजराजानं उठविलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे. माझ्या जीवनप्रवासातील हे सर्वांत शांत नि हवंहवंसं वाटणारं आश्रयस्थान आहे. काही-काही लोक जीवनाला ‘मंदिर’ म्हणतात. मला माहीत आहे, माझं जीवन तसं मंदिर मुळीच नाही आणि असलंच तर ‘चंपानगरी’ ही त्या मंदिरातील सर्वांत मंजूळ अशी एकमेव घंटा आहे!