Should the police patrol near the school? in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | पोलिसांनी शाळेजवळून पेट्रोलिंग करावं?

Featured Books
Categories
Share

पोलिसांनी शाळेजवळून पेट्रोलिंग करावं?

पोलिसांनी शाळेजवळून पेट्रोलिंग करावं?

पोलीस....... फार महत्वाचा घटक. ते नसतील तर अंतर्गत सुरक्षा व्यवस्थीत राहूच शकत नाही. काही तत्ववेत्ते म्हणतात की बाहेरचे शत्रू परवडले परंतु अंतर्गत शत्रू नकोत. जसे आपले शेजारी भांडखोर असले तरी आपण निपटवून टाकतो. परंतु आपल्याच घरातील लोकं जर विश्वासघातकी असतील तर त्यांना आपण निपटवू शकत नाही. बाहुबलीनं ताकदीनं सारं जग जिंकलं. परंतु एका पुरुला हारला.
माणसाच्या पराभवाबद्दल सांगायचं झाल्यास पराभव कसा होतो? याबाबत विचार करतांना रावण मृत्युशय्येवर असतांना भगवान श्रीराम जेव्हा रावणाला भेटायला गेले. तेव्हा त्यांनी रावणाला विचारलं,
"तुमच्यावळ एवढं सारं होतं. सोन्याची लंका होती, अजस्र बाहूबल होतं, खंबीर वीर होते की ज्यांना विश्वात तोड नव्हती. तरीही पराभव झाला. याबाबत आपण काही सांगू शकाल काय?"
तो श्रीरामाचा प्रश्न. त्यावर क्षणभर विचार करुन रावण म्हणाला,
"श्रीरामा, तुझं बरोबर आहे. माझ्याकडे सोन्याची लंका आहे अजस्र बाहूबल आहे. शुरवीरतेची काही कमी नाही. तरीही मी हारलो आणि तू जिंकला. कारण तुझ्याकडे तुझा भाऊ होता. तो खांद्याला खांदा लावून होता आणि माझ्याकडे भाऊ नव्हता. माझा भाऊ तुझ्या गोटात सहभागी झाला होता.
पराभवाबद्दल आणखी एक म्हण प्रचलीत आहे. घरका भेदी लंका ढहाये. यांचा अर्थ असा की राज्याला धोका हा शत्रूंपासून राहात नाही तर तो धोका हा आपल्याच देशातील गद्दारांपासून असतो. हेच ओळखून शिवाजी महाराज हे गुप्तहेरांना कडक शिक्षा करीत असत.
पोलीस प्रशासन हे देशाची अंतर्गत सुरक्षा करतात. ते गुन्हेगारी रोखायचं काम करतात. ते सतत चोवीस तास जागृत असतात. ते जर जागृत नसतील तर गुन्हेगार मोकाट सुटतील व सर्वत्र चोऱ्या, डकैती होतील. यावर उपाय म्हणून त्यांना जागृत राहाणं गरजेचं आहे. शिवाय पोलीस जागृत असतातच. जर अपवादात्मक काही पोलीस सोडले तर. जे भ्रष्टाचार करीत असतात.
पोलीस हे सतत जागृत असतात व ते गुन्हेगारी रोखतात. तरीही गुन्हेगारी घडतच असते. त्याचं कारण आहे भडकणं व त्या भडकण्यातून भांडण होणं. ते भांडण विकोपाला जाणं. यात भडकविणाराही व्यक्ती एक माध्यम म्हणून काम करीत असतो. ज्यातून गुन्हेगारी घडत असते.
गुन्हेगारी टळते. जर पोलीस पेट्रोलिंग करीत असतील तर....... रात्री अपरात्री कुठे डाके पडत असतांना वा चोऱ्या होत असतांना पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांचा आवाज आला तर चोर पळून जातात व घातपात होत नाही. त्यासारख्या तत्सम घडणाऱ्या घटना टळतात वा टाळल्या जातात. अशाच प्रकारच्या पेट्रोलिंगची गरज आहे, शाळेच्या वा महाविद्यालयाच्या आवारात. तिथं ऐन शाळा सुटण्याच्या वेळेवर वा शाळेच्या मधल्या सुट्टीत वा कधी शाळा भरण्याचे वेळेवर काही दुर्भिक्ष समाजघटक नुकत्याच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवणाऱ्या तरुणींची छेड काढण्यासाठी उभे असतात. ते दुर्भिक्ष समाजघटक तरुणींना छेडत असतात नव्हे तर त्यांना फुस लावून पळवत असतात. इथूनच गुन्हेगारीची पाश्र्वभुमी तयार होते. जसे मुलीचे अपहरण, त्यांचा लिलाव, एखाद्या मुलीवर दोन तरुण प्रेमाचे जाळे टाकत असल्यास त्यांच्यात होणारा वाद, त्यातून हत्यासत्र, मुलींचा खुन, मुलांचा खुन, समजा एखादी मुलगी प्रेमात पडलीच तर त्या प्रेमाला विरोध करणाऱ्यांची हत्या, धमक्या, वडील भाऊ यांची वाढती चिंता, त्यातून आत्महत्या.
सारेच गुन्हे. शाळेतील तरुणी, तरुण झाल्यावर. ती अशा शाळेलगतच्या तरुणावर भाळत नसेल तरीही, तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकणाऱ्या मुलांचे इशारे, कधी तिला जबरदस्तीनं प्राप्त करण्यासाठी उपयोजीलेले कट. हे सर्व पुर्णत्वास नेण्यासाठी गट तयार करणे, गटाद्वारे बदला घेणे. गटाद्वारे सामूहिक कृत्य करणे. मग जबरदस्तीनं एखाद्या मुलीचं अपहरण आणि त्यातच सामुदायिक बलत्कार. कधी विक्री.
महत्वाचं सांगायचं झाल्यास या सर्व गोष्टी बऱ्याच अंशी खऱ्या असून आज विद्यार्थीनींनी तरुण होताच शाळेत कसं जावं हा एक चिंतेचा विषय ठरत चालला आहे. याबद्दल पोलीसांची भुमिका जरी सुरक्षा करण्याची असली आणि त्यांनी जरी एकशे बारा व एक हजार एक्यान्नव हा मदत क्रमांक जरी जारी केलेला असला तरी पाहिजे त्या प्रमाणात पर्याप्त नाही. त्यामुळंच पर्याप्त म्हणून आणि पर्याय म्हणून पोलिसांनी जर या प्रत्येक महाविद्यालय व शाळेपरीसरात रोज एक भेट पेट्रोलिंग रुपानं केल्यास, तसेच त्या परीसरात उभे राहणाऱ्या दोन चार तरुणांना तिथं का उभे आहे याबद्दल कारण विचारल्यास शाळेत वा महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुण मुलींची सुरक्षा करता येईल. शिवाय शालेय परीसरातून संभाव्य घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालता येईल यात शंका नाही. कारण पोलिसांना सर्वच घटक घाबरतात. जरी त्यांच्या सीटीचा आवाज आला तरी. रात्रीला चोर सीटीचा आवाज ऐकताच चोरी करणं सोडतात. त्यामुळंच शाळेतील तरुण मुलींसाठी पोलिसांनी दिवसातून कमीतकमी दोनवेळ तरी पेट्रोलिंग करणं आवश्यक आहे. मात्र या पेट्रोलिंगच्या वेळा वेगवेगळ्या असाव्यात म्हणजे झालं. हीच प्रक्रिया सध्या प्रचलीत असलेल्या शिकवणी वर्गासमोरुनही राबवावी. जेणेकरुन विद्यार्थी सुरक्षीत तर देश सुरक्षीत असं करता येईल.
आज देशात अपहरणाची जास्त प्रकरणे वाढत असून त्यात महिला आणि विशेषतः अशा महाविद्यालयातून वा शाळेतून अपहरण केले गेलेले प्रकरणं जास्त आहेत. त्यामुळंच महिला सुरक्षेलाच नाही तर मुलींच्या शिक्षणालाही मर्यादा प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळंच मुलींना कसं शिकवायला पाठवायचं? हा एक ऐरणीचा प्रश्न प्रत्येक मायबापाला पडतो आहे.
आजच्या काळातील विद्यार्थी सुरक्षा ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण आजच्या काळात बऱ्याच घरी हम दो हमारा एक, मग ती मुलगी का असेना. एकच अपत्य असतं. हे तेवढंच खरं. यादृष्टीनं जर शाळेशाळेच्या परीसरातून शक्य झाल्यास पोलिसांनी पेट्रोलिंग केलं तर विद्यार्थी तर सुरक्षीत होतीलच. शिवाय सुरक्षीत होतील पालकही. त्याचबरोबर गुन्हे कमी होतील आणि गुन्ह्याबरोबर शासकीय यंत्रणेचाही त्रास तेवढाच कमी होईल यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०