Ghosts crying in Marathi Classic Stories by श्रीराम विनायक काळे books and stories PDF | भुतां रडचत

Featured Books
Categories
Share

भुतां रडचत

भुतां रडचत


   ऊं ऽऽ ऊं ऽऽऽऽ ऊं असा गळा काढून रडण्याचा भीषण सूर कानांवर आला. ओसरीवर आप्पा आजोबांच्या कुशीत झोपलेला नातू बाळ्या भेदरून जागा झाला. खोतांच्या घराखाली मळ्याच्या कडेला अस्ताव्यस्त वाढलेले सुरमाड, त्यांच्या कवाथ्यात बसून रात्री - बेरात्री कांडेचोर सुर ओढायचे. त्यांचे ओरडणे हुबेहुब माणसाच्या रडण्यासारखे ! दुपारी भेंडीतल्या काळू आत्त्याबरोबर तिची मुलगी मथी आलेली. मथी बाळ्यापेक्षा पावणेदोन वर्षानी मोठी, पण बोलण्यात भारी पाष्ट ! तिच्या घरात आजी, पणजी,परत आलेली आत्ते नि चुलत आज्जी असा सोवळ्या म्हाताऱ्यांचा भरणा. मथी त्यांच्या घोळक्यात बसून त्यांची बोलणी कान पाडून ऐकायची अन् त्यांचेच अनुकरण करून ओख्खाबाई सारखे वाह्यात बोलायची. संध्याकाळी बाळ्याबरोबर परवचा म्हणून झाल्यावर.मथीने काहीबाही भुतांच्या गोष्टी त्याला सांगितल्यान्. “मध्यान् राती भुतां काजी भाजोनी खाचत. मग गरांच्या वाटणी वरनी तेंचा भांडण होचे, मारामाऱ्यो होचत नी मार बसलेली भुतां रडचत. तेंचा रडणां अपशकुनी सचे. ती माणसाच्या मानेवर बसचत. एकदा बेसल्यावर मग ती झाड सोडव्वेची नाय.” असल्या काय बाय गोष्टी आयकूनबाळ्या भलताच टरकलेला !
रात्री कांडेचोरांचे रडणे ऐकल्यावर तो गर्भगळीत झाला. “आजोबा ऽऽ भुता रडेवे लागली सत....” असे म्हणत तो आजोबाला बिलगला. कांडेचोरांची 'कुयेल'वाढली तशी बाळ्याचा धीरच सुटला. मुठी वळून हात आवळीत बाळ्या ताठ झाला. बाळ्या नवसासायाने झालेला. म्हणून त्याचे नाक टोचून नाकाच्या उजव्या पाळीत सोन्याची मुदी घातलेली. बाळ्या आकडी येऊन ताठ झाला. त्या गडबडीत त्याच्या नाकातल्या मुदीत आप्पांच्या अंगावरचे बुरणुस अडकले. नाकपुडी फाटून भळाभळा रक्त यायला लागले. म्हाताऱ्याने बोंब मारली नि घरातली माणसे ओसरीवर जमली. बाळ्याच्या तोंडातून फेस अन् नाकातून रक्ताचा ओघळ आलेला. काय करायचे कोणालाच काही सुधरेना. धोंडू गड्याने प्रसंगावधान दाखवीत त्याच्या डोईवर पाणी थोपटले, कांदे आणायला सांगितले. कांदा फोडून हुंगवल्यावर बाळ्या सावध झाला. पण तो बराच वेळ काहीही बोलेना. मग त्याचे वडिल भाऊ खोत धोंडूला घेऊन मिराशी वैद्याला आणायला गेले.
खोत समक्ष आले म्हणताना वैद्यबुवा लगबगीने घराबाहेर पडले. पोराची नाडी बघता तो फार घाबरलेला आहे हे वैद्यबुवांनी ओळखले. कसलेसे भस्म मधात घालून चाटवल्यावर बाळ्या सावध झाला. गरम पाण्याने त्याचे तोंड धुऊन नाकावर कसले तरी पाळ उगाळून लेप काढून झाला. बाळ्याला गुळपाणी दिल्यावर वैद्यबुवांनी खेादून खोदून चौकशी केली. तेव्हा भुते रडतात नी ते ऐकल्यावर भीती वाटली असे बाळ्या म्हणाला. वैद्यबूवा हसत म्हणाले, “भुतां कसली ना काय्, ते कांडेचोर रडचत. तेनां घाबरेवे नाकां. भीती वाटचे तर राम राम म्हणवेचा. रामाचा नाव आयकोन भुतां पळचत. खोतानो,तेला एकदा कांडेचोर रडेवे लागले की न्हेवनी दाखवा. मग तेला भीती वाटवेची नाय. नायतर एखादो कांडेचोर मारोनी दाखवा.”
पुढे आठवडाभर वैद्यबुवा रोजा सकाळ-संध्याकाळ खोतांकडे यायचे. त्यांनी स्वतःबाळ्याला रामरक्षा शिकवली. बाळ्या घाबरतो म्हणून रोजा रात्री धोंडू गडी आगरभर फिरायचा. सुरमाड,जुनाट अष्ट,आंबटांबा ही कांडेचोराची आदस्थाने. बचक्याएवढे दगड झाडांवर मेखलावीत “हाड् रे झ्यो ऽऽ झ्यो....तुज्यो मायची.....”असे ओरडत तो कांडेचोरांना पिटाळायचा. एकदा बाळ्याला खांद्यावरून न्हेऊन भाऊ खोतांनी कांडेचोर दाखवले. आंब्याच्या फांद्यावरून धावणारे ते विचित्र प्राणी बघून बाळ्या मनात घाबरलाच. कुळकुळीत काळ्या करडया रंगाचे,माजलेल्या बोक्याएवढे, अंगावर बोट बोट लांब भीस असलेले, कोल्ह्यासारखे झुबकेदार शेपुट असलेले,हिरवे डोळे लकलकावीत धावणारे कांडेचोर चार सेलच्या विंचेस्टर ‘ब्याटरीच्या’ झोतात धावणारे कांडेचोर दाखवून भाऊ म्हणाले, “ते कांडेचोर सचत नी ते रात्री फळांखाचत, नी तेंचा पोट भरले वर ते रडचत....तेंना किणला घाबरेवेचा?“
खोतांचे भले मोठे आगर. नारळ, पोफळी, केळी, अननशी तर कितीक. फळे खाण्याला लबुद असलेले कांडेचोर न येते तरच नवल!या शिवाय आंबे, चिक्कू, पेरू, पोपये, आंबे, फणस,भोकरे,चिकणे,दाभणे,तोरणे,हसोळे अष्ट आणि उंबर यांची फळे , शिवाय आगराच्या कडेला हारीने लावलेल्या वाव वाव लांब केळघडानी वाकलेल्या शेकडो केळी. अशी बारमास नानाविध फळे मिळायची. खेरीज विहिरीजवळच्या दोणीत, खालच्या भरडातल्या डुरे बावीत कायम पाण्याची सोय. मळ्यालगत आगराच्या कडेला गगनावेरी उंच गेलेली सुरमाडांची झाडे. पावसाळा सरताना सुरमाडांच्या कवाथ्यातून घोड्यांच्या शेपटासारखा दोन-तीन हात लांबीचा घोस बाहेर पडायचा. घोसातल्या प्रत्येक तंगुसावर आंगळ आंगळ अंतराने सोललेल्या सुपारीएवढी फळे धरायची. मग तर दीर्घमुदत खाण्याची बेगमीच व्हायची. सुरमाडाच्या फळाना तर कांडेचोर भलतेच लबूद! हे कांडेचोराचे आवडते खाद्य.
सुरमाडांवर फळे धरून ती पिकायच्या बेताला आली की अलम दुनियेतले कांडेचोर खोतांचे पडण जवळ करायचे. जुनाट झाडांवरच्या असंख्य ढोलीमध्ये ते वीणी काढायचे. रात्री-बेरात्री त्यांची झोंबटे लागायची. तुडुंब खाऊन अंगणात,दोणीच्या कडेने कुठे- कुठे ते हगून ठेवायचे. त्यांच्या विष्ठेत खाल्लेल्या बियांचा कचकल असायचा. बाळ्याला फिट आल्यावर पंधरवडाभराने गोठ्याच्या छपरावर बसून कांडेचोर रडायला लागला. “ ही भुतां रडेवे लागली” तशी अंगणात नेऊन त्याला रडणारा कांडेचोर दाखवला. “झ्योऽऽऽ झ्यो”करीत एक लांब ‘ताज’ (बांबूची काठी) घेऊन धोंडूने त्याला हुसकून लावले. भुताच्या रडण्याचे इंगित बाळ्याला कळले. कांडेचोराबद्दलची दडसही जारा कमी झाली. पण महिना-पाऊण महिन्याने त्याला आकडी यायची ती काही कमी होईना. कसलाही हासभास नसताना एकाएकी मुठी आवळून बाळ्या खाली कोसळायचा. झोपाळ्यावरून, दरडीवरून, उंबऱ्यात कुठे कुठे अवघाती पडून त्याला जखमा व्हायच्या. कांदा फोडून हुगवीपर्यंत त्याच्या तोंडातून फेस येत राहायचा. हे नसते नष्टचर्य बाळ्याच्या मागे लागले म्हणून म्हातारा धास्तावला.देवदेवस्क्या, नारळ, भात -कोंबडे सुध्दा उतरून झाले.
नेहमीच अशी आकडी यायला लागल्यावर बाळ्याला लांब लांबच्या वैद्यांकडून उपचार करवून झाले. प्रिंदावणचे पेंढाकर वैद्य,विजयदुर्गातले दत्तूशेठ देवरुखकरकर वैद्य,खारेपाटणचे खडपेकर डॉक्टर३सगळ्यांना दाखवून झाले. पण बाळ्याच्या आकडीचे निदान होईना. जुजबी गुण यायचा. पूर्वी दर चार आठ आकडी यायची. औषाधांचा मारा झाल्यावर वरचेवर येणारी दीर्घ मुदतीने म्हणजे दोन तीन महिन्यानंतर येई एवढेच. बाळ्याघाबरल्यामुळे असे होते हेच सगळ्यांचे अनुमान यायचे. बाळ्याची भीती घालवण्यासाठी धोंडू गडी काय काय हिकमती करायचा. कांडेचोर गुळाला लंपट ! धोंडूने काटेरी चापाला गुळाचा खडा बांधून तो अष्टाच्या मुळात ठेवला. गुळ खायला गेलेल्या कांडेचोराची मानच काटेरी दात्यांमध्ये गावली. चापात अडकून मेलेला तो कांडेचोर मुद्दाम बाळ्याला दाखवण्यात आला. बाळ्याने धिटाईने त्याच्या अंगावरच काठीचे तडाखेसुध्दा लगावले. दोन-चार दिवसांनी कांडेचोर दाखव म्हणून बाळ्या मागे लागला. मग मुद्दाम बर्कनदार बाणून खोतांकडच्या बंदूकीने कांडेचोराची पारध झाली. मारलेले कांडेचोर धोंडू 'सागोती' म्हणून न्यायचा.
कांडेचोर निव्वळ फळांवर जगणारा. त्याच्या अंगाला जरा घुडस परमळ आला तरी त्याचे मटण भारी चविष्ट. कांडेचोर मांजरासारखा दिसतो म्हणून मराठा समाजाचे लोक तो खात नसत पण कुळवाडी,कातकरी मुद्दाम पारध करून कांडेचोर मारीत. बाळ्याची भीती घालवण्याच्या निमित्ताने धोंडूची चांगली सोय व्हायला लागली. मात्र बाळ्याची 'फिट'काही कमी होईना. खोतीण त्याला घेऊन पुण्यात भावाकडे खेप करून आली. पुण्यात दोन महिने राहून विलायती डॉक्टरांचे उपचार करून झाले. इंग्लिश औषध-गोळ्यांनी जरा गुण आला खरा पण त्या औषधांनी बाळ्या कायम झोपेच्या गुंगीत राहायचा. दिवसा उजेडी कधिही नी कितीतरी वेळ बाळ्या सुस्तावून निजून रहायचा.इंग्लिश‘दव्याचा’ हा भलताच परिणाम लक्षात आल्यावर मात्र म्हाताऱ्याने औषध-गोळ्या फेकून दिल्या. 'या औषधांपेक्षा आकडी आलेली परवडली' म्हतारा त्राग्याने म्हणाला.
बाळ्या आताशी शाळेत जाायला लागला. पहिले तीन चार महिने बरे गेले. कारण बाळ्या जोमतेम तासभर शाळेत रमायचा नि परत यायचा. हळूहळू तो नियमित जायला लागला. त्यातच एकदा त्याला वर्गात आकडी आली. खोतांचा मुलगा, नवस- सायासाने झालेला. त्यातही त्याच्या आकडीची विचित्र तऱ्हा बघितल्यावर गुरूजींच्या अंगाने घाम उतरला. दोन-तीन वेळा असे प्रकार झाल्यावर वर्गातली पोरे त्याला चिडवायला लागली. खोताचा बाळ्या याऐवजी ती त्याला 'फिटयेरा बाळ्या'म्हणायला लागली. मग घरापर्यंत तक्रार गेली. आप्पा खोत नातवाची बाजू घेऊन शाळेत गुरूजींना भेटायला गेले. न्याय झाले. बाळ्याने ज्यांची ज्यांची नावे सांगितली त्या पोरांना गुरूजींनी खोतांच्या समक्ष बेदम झोडपून काढले. त्यानंतर थोडे दिवस बरे गेले. त्याची कळ कोणी काढीनासा झाला. मार खाल्लेल्या पोरांनी मात्र डुख ठेवला. बाळ्याला कोणी खेळायला घेईना. शाळेत जाताना -घरी येताना काहीतरी निमित्त झाले की पोरे त्याला 'गप ऱ्हव फिटयेऱ्या' म्हणायची. स्वतःची आगळीक असली की बाळ्या गप्प बसे. काही वेळा फिटयेरा म्हणणाऱ्या पोराची तो पाठ घेई. बाळ्या अंगपिंडाने चांगला आडदांड. वरच्या वर्गातल्या पोरांनासुध्दा त्याच्या वार्तेला जायची हिम्मत होईना. पण पोरे भलतीच बाजंदी. तीन-चार पोरे एका मेळाने बाळ्याला मारीत. एक - दोन वेळा हा प्रकारही त्याने सहन केला. त्यानंतर अशाच प्रकारची पुनरावृत्ती झाली. या खेपी बाळ्याने चांगले बचक्या एवढे धोंडे पोराना मारले. एका पोराचे डोके फुटले. गुरूजींकडे तक्रार गेली. खरे तर पोरांनी मुद्दाम बाळूला पिसळवलेला पण गुरूजींसमोर सगळ्या पोरांनी संगमताने खोटे-नाटे सांगून बाजू बाळ्याच्या अंगावर उलटवली.
तक्रार म्हाताऱ्याच्या कानी गेली. त्याने बाळ्याला नीट विचारून घेतले. पोरे संगमताने त्याला त्रास देतात हे चाणाक्ष खोताने ओळखले. त्याने गुरूजींना नीट सगळे समजावुन सांगितले. त्यांनाही ही गोष्ट पटली. काही गरीब पोराना बाजूला घेवून विचारल्यावर पोरे त्याला एकटा टाकतात,एकमेकांशी संगनमत करून त्याला पिसळवतात हे त्यांच्याही लक्षात आलेले. या वेळीही दोन-तीन आगावू पोरांना गुरूजींनी मार दिला. पुन्हा थोडे दिवस बरे गेले. पण पोरे बाळ्याच्या जाशी धुमालाच लागली. आता पोरे त्याची कळ काढीनात. पण आपापसांत एकमेकाला ‘गप बस फिटयेऱ्या.... इलो मेलो फिटयेरो’ असे म्हणायची. बाळ्या रागाने लाल व्हायचा,पण त्याला पारिपत्य काय करता येईना. हा प्रकार अतीच व्हायला लागला तेव्हा मात्र एक दिवस बाळ्याने जाहिर करून टाकले. “में मेलो तरी शाळांत जायवेचो नाय.”त्याच्या तक्रारी निस्तरून कंटाळलेल्या आजोबानेही म्हटले, "बाळो,चार यत्ता शिकलो तेवढां पुरे. नायतरी शाळा शिकोनी काय मोठो बालिस्टर होणार से? माजी सगळी इष्टेट कोण खाणार से? से ताच तेच्या सात पिढ्यो खावनी सरवेचा नाय. शिरां पडो त्या शाळेवर!”
कांडेचोरांची पारध आणि दोन तीन महिन्याने येणारी आकडी या दोन गोष्टी सोडल्या तर बाळ्या अगदी गुणी. अंगा पिंडाने एवढा आडमाप की उभ्या गावात त्याचे मनगट धरायची हिंमत कुठल्या ताकदवान गड्याला झाली नसती. शिक्षण सोडून घरी बसलेला बाळ्या घरच्या कामात लक्ष घालायला लागला. केळी,चिकू, पोपये, अननशींची राखण करण्यासाठी चार-दोन दिवसांनी तो आगरात फिरायचा. धोंडूचा मुलगा सोन्या त्याच्याच बरोबरीचा. दोघे कांडेचोरांची पारध करायचे. ते आगर सोडून बाहेर जात नसत म्हणून घरातुनही त्यांच्या फिरण्याला आक्षेप आला नाही.

त्या वर्षी कांडेचोर भारीच बोकाळले. दिवसा उजेडी सुध्दा चुकार-माकार कांडेचोर फिरताना दिसायचे. आंबा,अष्ट,वड यांवरची बिळे त्यांना पुरेनात की काय कोण जााणे. त्यांनी गुरांच्या गोठ्यात माळ्यावर गवतात वीण घातली. गोठ्याच्या छपरावरचे नळे,कोने बाजूला करून ते माळ्यावर उतरायचे. गोठ्यात जिथे तिथे गळती झाली. पण माळ्यावर बेगमीचे गवत भरलेले. काही इलाज चालेना. राहत्या घरातही त्यांनी हैदोस घातला. देवाच्या मंडपीवर, शिंकाळ्यांवर काय वस्तू ठेवायची सोय ऱ्हायली नाही. रात्री-बेरात्री माळ्यावर त्यांचा नुसता धुडगूस चालायचा. दडादडा धावताना कांडेचोर वस्तुंची सांड लवंड करीत. डब्यांची झाकणे उघडून आतल्या वस्तू खाईपर्यंत त्यांची मजल गेली. केळघडाचा एखादा फणा जरा उजळला की त्यांनी केळ्यांचा फन्ना केलाच म्हणून समजा. कोठीच्या खोलीत माळवदाला टांगून ठेवलेले केळघड,तोवशी, भोपळेसुध्दा त्यांनी फस्त केले. स्वयंपाक घराच्या कोपऱ्यात ठेवलेले लेपवणाचे नी उरलेसुरले अन्न टाकलेले पातेले तर रोज उपडे केलेले असायचे.
कांडेचोरांच्या येण्याजाण्याच्या वाटा ठरलेल्या असायच्या. घराच्या मागील बाजूला असलेल्या दरडीवरून ते छपरावर उडी मारीत. सोन्या आणि बाळ्या तिथे दडून बसायचे. कांडेचोर दबकत दबकत पुढे आला की त्याने उडी मारण्यापूर्वी काठीचा तडाखा बसून तो आडवा व्हायचा. पण कांडेचोर मरायला भरी लोचट. दोन-तीन फटके खाऊन रक्त ओकत आडवा पडलेला कांडेचोर सकाळी तिथे दिसत नसे. त्याच्या पोटाला दोरीचा फास टाकून मांडवाच्या खांबाला बांधून ठेवला तर सकाळी तोच कांडेचोर खांबावर चढताना दिसायचा. म्हणून त्याचे पोट वर-खाली व्हायचे बंद होऊन तो पुरा मरेपर्यंत काठीने बदडून काढावा लागे.
संध्याकाळी बाळ्या नि सोन्या दूध काडायला गोठ्यात गेलेले. गोठ्यात माळ्यावरील काठ्यांच्या साटीतून कांडेचोरांच्या पाच - सहा शेपटया हारीने लोंबताना दिसल्या. बाळ्या भारी हिकमती ! गुपचुप पुढे जाऊन त्याने डाव्या उजव्या हातात मिळाल्या त्या शेपटया गच्च ओढून धरल्या. अडकलेले कांडेचोर ‘च्रींऽऽऽच्रींऽऽ’करायला लागले. सोन्या दांडका घेऊन माळ्यावर चढला. गवताची हुसका हुसकी करीत त्याने कांडेचोर शोधले नि दांडकावून आडवे केले. एका खेपेला पाच कांडेचोरांची पिल्ले मिळाली. पण असे मारून कांडेचोर कुठले कमी व्हायला? गोठ्याच्या माळ्यावर सांदीफटीतून धावणारी पाच-पंचवीस पिल्ली सोन्याला दिसली. सोन्या-बाळ्यांची रात्री नेमाने फेरी व्हायला लागल्यावर कांडेचोरही शहाणे झाले. ब्याटरीचा फोकस दिसला की दडून राहायचे. त्यांच्या येण्या-जाण्याच्या वाटा बदलल्या. त्यांच्या फिरण्याच्या वेळाही बदलल्या.
कांडेचोरांचा उपद्रव अतीच झाला तेव्हा मात्र अप्पांनी खुप विचार करून वांदरमाऱ्यांना बोलावून घ्यायचे ठरविले. सराई आल्यावर उन्हाळा सुरू झाला की पाच-सहा वांदरमाऱ्या कातकऱ्यांची जोडपी कलंबईच्या वाडीत सड्यावर मुक्कामाला असायची. धोंडू गडी मुद्दाम कंलबईत जाऊन कातकऱ्यांना आवतन देऊन आला. दुसऱ्या दिवशी मध्यान्हीला शंकर कातकरी,त्याची बायको जानी आणि भाऊ रोंग्या अशी तिघे वाड्यासमोर येऊन अंगणात बसली. खांद्यावरचा कामठा (धनुष्य) पडवीच्या खांबाशी ठेवून "सावकार"अशी हाळी शंकराने मारली. तिघेही पावळीत बसली. त्यांचा कुत्रा खळ्याच्या पेळेजवळ बसला. तिघांनाही केळीच्या फाळक्या वरून जेवण देऊन कुत्र्याला दोन भाकऱ्या धोंडूने टाकल्या. पण कुत्रा भाकरीला तोंड लावीना.
“तेला वाटता काय की,भाकऱ्या आमाला ठेवलेल्या हायेत. तवा तो तोंड लावणार नाय. तिकडे लांब पालंदीत व्हेवुन घालशाल तरच कुत्रा खाईल. आमच्या पालावर उघड्या ताटा- टोपात आन्न आसते. पण कुत्रा विरड विरड सामनी बसून रायला तरी त्वांड लावणार न्हाई.” शंकर म्हणाला. कुत्र्याला लांब पाळंदीत नेऊन भाकऱ्या टाकल्या तेव्हाच त्याने तोंड लावले. जेवून झाल्यावर त्याच पानाच्या खोलप्यातुन ताक पिऊन कातकऱ्यांनी ढुंगणाला हात पुसले. पान खाऊन झाल्यावर शंकर उठला. “आता कांडेचोराचा ठिकाणा दाकवा”रोंग्या म्हणाला. रोंग्याचा उत्साह बघून सगळ्यांना हसू आले. कारण त्याचे ध्यान होतेच तसे. लहानपणी पायावरून ताप गेल्यामुळे त्याच्या पायाच्या गडख्या झालेल्या. हातात चपला घालून तो ढुंगणाने फरकट्या मारीत मारीत फिरायचा. त्याला धड उभेही राहता येत नव्हते. हा कसली कर्माची पारध करणार ? असेच सगळ्यांना वाटले.
कातकरी आल्याची वर्दी लागुन पाच-पन्नास माणसे खोतांच्या घरापुढे जमली. सगळे लमांडर आगरातल्या आंबटांब्याकडे निघाले. सहा पुरूष सरळसोट,दोन गड्यांच्या वेंगेत गावणार नाही एवढे आंब्याचे खोड. त्यावर चार फाटे फुटून अस्ताव्यस्त वाढलेले. दोन फाटे सरळसोट गगनाला भिडलेले नि दोन फाटे जामिनीस समांतर पालखीच्या दांड्यासारखे आडवे गेलेले. आडवे फाटे चढायला भारी अवघड. त्याच्यावरचे आंबे काढायलासुध्दा कोणी गडी चढायचे धाडस करीना. नेमक्या त्याच आडव्या फाट्यांवर कांडेचोरांनी बिळे केलेली! हा कातकरी बिळापर्यंत पोहोचणार तरी कसा ?हाच प्रश्न बघ्यांच्या मनात आला.
आंबटांब्याचे चारी अंगानी फिरून नीट निरिक्षण केल्यावर रोंग्याने दोरी आणायला सांगितली. दोरीच्या एका टोकाला दगड बांधून शंकराने दोरी आंब्याच्या एका फांदीभोवती टाकून घेतली. दोन्ही टोके जुळवून त्याने नि जानीने दोरी ताणून धरली. आता रोंग्या पुढे झाला. चार हात लांबीची आंबाड्याची रशी त्याने कमरेभोवती बांधून घेतली. दोन्ही हातांवर थुंकून तळवे घासले नि दोरीवर हातांची पकड घेऊन तो वर जाऊ लागला. आंब्याच्या बेचक्यात पोहोचल्यावर जरा दम खाऊन रोंग्या आडव्या फांद्यावर बसत बसत फरकट्या घालीत बिळापर्यंत पोहोचला. जमिनीवरून शंकराने, “हां, वांयच् फुडेजाजऽऽरा. हां बास,बराबर , तुज्या पायाशी खायल्या आंगाने बील हाये,” अशा सुचना दिल्या. योग्य जागा गाठताच रोंग्याने कमरेची रशी सोडली. आंब्याच्या फांदीभोवती तिचा पक्का फास टाकला. दोरीच्या दुसऱ्या टोकाला सरक फास करून त्यात दोन्ही पावले अडकवली आणि दोरी हातात धरून त्याने स्वतःला फांद्यावरून ढकलून घातले. बघ्यांच्या काळााचा ठोका चुकला.
दोरीच्या फासावर लोंबकळणाऱ्या रोंग्यांच्या तोंडासमोरच कांडेचोराची ढोल. त्याने हाताने फांद्यावर धडाधडा फटके मारले. बिळातले कांडेचोर ‘च्राँऽऽ च्राँ ऽऽ राँ ऽऽ राँ ऽऽ’ असा आवाज करू लागले. त्यांचा आवाज ऐकून कुत्रा भुंकायला लागला. रोंग्या बिळातून आत हात घालायचा प्रयत्न करू लागला, पण त्याचा हात आत जााईना. “संकर घब लई न्हानी हाये,हात भतूर जाईत न्हायी” रोंग्या ओरडला. त्यावर शंकर म्हणाला,तू फांद्यावर चढ. मी तुला तीर देतो. तेने घब रूंद कर" रोंग्या खांद्यावर चढून बसला. शंकराने कामठ्यावर वादी (प्रत्यंचा) चढवली आणि नेम घेऊन तीर सोडला.
शंकरचा तीर अचूक रोंग्या बसला त्या जागेला खालच्या अंगाने सप्पकन फांद्यात रूतला. पुन्हा रशीवर लोंबकळत रोंग्याने तीराच्या पात्याने तासून तासून घबीचे तोंड रूंद केले. मग बेदकारपणे हात घालून तंगडीला धरून कांडेचोर बिळाबाहेर पेचून काढला. त्याला फांद्यावर धडाधडा आपटून तो गप्प झाल्यावर फांद्यावर आडवा ठेवला तेवढ्यात बिळातून एक कांडेचोर बाहेर आला आणि त्याने सरळ जमिनीवर उडी मारली. पण कांडेचोराने जमिन गाठण्यापूर्वी कुत्र्याने अंतराळी उडी मारूनच त्याला पकडले आणि ठार मारले. दोन्ही कांडेचोर जमिनीवर फेकून रोंग्या दुसऱ्या फांद्याकडे निघाला. दुसऱ्या फांद्यावर२/३ बिळे ! एका बिळातले कांडेचोर काढीत असताना दुसऱ्या बिळातून बाहेर आलेले कांडेचोर शंकरने जमिनीवरून तीर मारून टिपले.
कातकऱ्यांची पारध बघून बाळ्याच्या नजरेचे पारणे फिटले. त्या संध्याकाळी आंबटांब्याकडे बिळातले चौदा कांडेचोर कातकऱ्यांनी मारले. त्यांतल्या आठ कांडेचोरांचे गठळे बांधून रोंग्या कंलबईच्या वाडीत वस्तीवर गेला. शंकर नि जानी घोव बायले वसतीला राहिली. त्यांनी जवळचे कांडेचोर कुळवाड्यांना विकून मिळालेल्या पैशाची दारू खाऊन दोघेही रात्री तर्रर्र होऊन वाड्यावर आली.रात्री न जेवताच दोघेही गोठ्याच्या पडवीत ढकलली. त्या रात्री मात्र कांडेचोरांचा कुठे पायरवसुध्दा ऐकू आला नाही. दुसरे दिवशी अष्टावरच्या ढोलीत कातकऱ्यांना दोन-तीन बारकी पिल्ले मिळाली. सगळ्या कांडेचोरांना कातकऱ्यांचा माग लागल्यामुळे ते भिऊन सड्यावर पळून गेले असावेत असे धोंडू म्हणाला.
बाळ्याची कातकऱ्यांशी चांगलीच गट्टी जमली. तो कवडे मारून द्यायला त्यांच्याबरोबर बंदूक घेऊन रानतळ्यावर गेला. तिथे त्याला फीट आल्यावर कातकऱ्यांनी त्याला अच्चळ उचलून घरी आणले. अलिकडे फीट येण्यापूर्वी बाळ्याला समजायचे. फीट येण्यापूर्वी तो “आयलीऽऽऽ आयली”असे ओरडायचा. कातकऱ्यांनी कसल्याशा पाल्याचा रस त्याच्या नाकात पिळून कांदा न हुंगवताच त्याला शुध्दीवर आणला. बाळ्याच्या आकडीवर हुकमी औषध शंकराने सांगितले. पण ते मोराच्या रक्तातून घ्यायचे होते. बाळ्या तयार झाला नाही. खोताकडे दोन दिवस राहून भात - नाचणे, जुनी चिरगुटे आणि खोतांनी दिलेले दोन रूपये घेऊन कातकरी समाधानाने निघून गेले.
कातकरी गेल्यावर आठ-दहा दिवसांनी पुन्हा कुठे कुठे कांडेचोर आढळायला लागले. त्या दरम्यान कातकऱ्यांनी न सांगता खेप घातली. अलिकडे दर पंधरवड्याला कातकरी वस्तीला यायचे. ते वस्तीला आले हे कांडेचोराना कसे काय कळे देव जााणे. पण कातकरी वस्तीला असले की एकही कांडेचोर कुठे उमगेना. खोतांकडे कातकऱ्यांना पोटभर अन्नपाणी, पानसुपारी मिळायची. कातकरी अल्पसंतुष्ट, चोरटे मारटेही नाहीत. अन्न आणि शेरमापटे धान्य मिळालेकी खूश. शिवाय बाळ्या त्यांना कवडे,ल्हावे मारून द्यायचा. त्या परिसराची कातकऱ्यांना खडान् खडा माहिती. कवडे-ल्हावे यांची‘बसल’कुठे असेल याची उज्जू माहिती कातकऱ्यांना असायची. सहसा कधी खेप फुकट जात नसे.
आताशा अप्पा खोत भलतेच थकले. ते कायम झोपून असायचे. अन्न फक्त एकदा -दुपारीच घ्यायचे. “आता माझा नेम नाय्.माझे डोळे मिटण्यापूर्वी नातवाच्या डोक्यावर अक्षत पडूदे. नातसुनेच्या तोंडात साखर भरवून मग में डोळे मिटीन्” असे ते घोकीत राहायचे. कोण येईल जाईल त्याला बाळ्यासाठी फक्कडशी पोरगी बघायची गळ घालीत. “मी शेलापागोटे देईन. काय तरी बक्षिसी देईन.”अशी लालूच दाखवायचे. पण बाळ्याला काही मुलगी सांगून येईना. कार्तिकात ईश्वराच्या देवळात उत्सव व्हायचा. कीर्तनकार मोघेबुवा सालाबादप्रमाणे खोतांकडे आले. त्याच्या मुक्कामात म्हाताऱ्याने बाळ्यासाठी मुलगी बघायची गळ त्यांना घातली. मोघेबुवा दहा गाव फिरलेले, धोरणी! बाळ्याचे अल्प शिक्षण, फिटा हे वर्म त्यांनी उगाळले.
तो स्वस्ताईचा काळ. पैशाला भलतीच किंमत! पण बाळ्याला चांगली मुलगी देण्यासाठी पाचशे रूपये बक्षिसी् द्यायला म्हातारा कबुल झाला. मुलगी गरिबाघरची असेल तर लग्नखर्चही ‘आतुन’द्यायची तयारी दाखविली. ही ‘मात्रा’चांगली लागू पडली. म्हाताऱ्याकडून “म्हटला शब्द पुरा करीन”असे वचन बुवांनी घेतले. मग त्यांनी गुळणी फोडली. स्वतःचीच दोन नंबरची कन्या यमू बाळ्याला द्यायची तयारी बुवांनी दर्शविली. मुलाचे फिटा येणे सोडले तर बाळ्याचे स्थळ म्हणजो लाखात एक. उत्सव संपल्यावर चौथ्या दिवशी बुवा मुलगी दाखवायला घेऊन आले. बुवांची यमू म्हणजे नक्षत्रच ! पहाटेला म्हाताऱ्याने बुवांना हलवून हलवून जागे केले. बक्षिसीचे पाचशे रूपये आणि लग्नखर्च म्हणूनअडीचशे रूपये पडशीत टाकुन बुवा यमूसह घरी गेले. लग्न खोतांच्याच घरी झाले. हौसावलेल्या खोतांनी हात सोडून खर्च केला. चार दिवस जेवणावळी झडल्या. यमुला ओझे व्हावे इतके सुपभर दागिने खोतांनी सुनेच्या अंगावर घातले. त्या वैभवाने दिपलेल्या यमूला बाळ्याच्या फिटांची मग फिकीरच वाटली नाही. त्याच्याकडे लक्ष द्यायला त्याचे स्वतःचे 'मनुष्य' आलेले. म्हातारा बिनघोर झालेला. "आता पणतू बघीन, म्हावंदे घालीन आणि मगच मरेन”असे तो म्हणायचा.
पावसाळा जवळ आला. अननसे पिकायला लागली अन् दीर्घमुदत बेपत्ता झालेले कांडेचोर एक -एक करून पुन्हा खोतांच्या आगरात यायला लागले. त्यांचे रडणे ऐकून प्रथम यमू भलतीच घाबरली. बाळ्या बंदूक घेऊन बाहेर पडला. कांडेचोर मारून आणून त्याने यमुला दाखवला. आठवडाभरात कांडेचोरांनी भलताच धुमाकूळ घातला. पण यमू बाळ्याला रात्री-बेरात्री घराबाहेर फिरायला देईना. त्याच्या फिटांचा प्रकार बघितल्यावर दिवसासुध्दा तो बाहेर पडला तर यमू मागून जायची किंवा धोंडू-सोन्या ह्यांना हातातले काम टाकून त्याच्या पाठीवर धाडायची. आंबटांबा,अष्ट या आदस्थानांमध्ये कांडेचोरांनी पुन्हा 'विणी' घातल्या. रात्री-बेरात्री त्यांचा मुक्त संचार सुरू झाला. वाड्याच्या माळवदावर त्यांची झोंबटे लागली की,सगळ्यांची झोपमोड व्हायची. माळवदावर चढून त्यांना हाकवल्याशिवाय ते जात नसत. बाहेरची फळे संपल्यावर त्यांनी गुरांची खाणी, घरातल्या चीजवस्तू यांच्याकडे मोर्चा वळवला. कातकरी पावसाळ्यात फोंडा घाटापलीकडे जायचे.
कलंबईच्या वाडीत वस्तीवर एकही कातकरी राहत नसे. त्यामुळे भलतीच पंचाईत झाली. सोन्या -बाळ्या यांची पारध आता राजारोसपणे सुरू झाली. रिकाम्या पिंपात गुळाचा खडा ठेवून पिंपाच्या झाकणाला दोरी बांधून जागत बसायचे. रात्री गुळ खायला कांडेचोर पिंपात शिरला की दोरी ओढून झाकण पाडायचे म्हणजे कांडेचोर पिंपात अडकायचा. नाना युक्त्या लढवून सोन्या-बाळ्या कांडेचोरांच्या धुमालाच लागले.
रात्री बेरात्री कांडेचोर रडायला लागले की हे “ही भुता लागली रडव्वे” म्हणत बाळया बंदूक उचलायचा. आता कांडेचोरही शहाणे झालेले. काटेरी सापळ्यात,रिकाम्या पिंपात ते चुकूनही अडकत नाहीसे झालेले. बाळ्या नि सोन्या रात्री जेवणे झाल्यावर आंबटांब्या जवळ दडून राहायचे. कांडेचोर बिळातून बाहेर पडले की खसफस व्हायची. सोन्या बॅटरीचा फोकस टाकायचा नि बाळ्या बंदूकीने त्या कांडेचोराला अचूक टिपायचा. एकदा गोळी खाऊन पडलेला कांडेचोर मान झाडीत उठून पळायला लागला. बाळ्या नी सोन्या त्याच्या मागून धावत निघाले. अंगणाच्या पेळेवरून धावत कांडेचोर खालच्या मरडात उतरला. आता कांडेचोर मळ्यात शिरून नाहीसा होणार हे सोन्या, बाळ्या दोघांनीही ओळखले. कांडेचोराला अडवण्या साठी सोन्या वाड्याच्या मागील बाजूने धावत खालच्या अंगाला गेला. बाळ्या वाड्या समोरूनच खाली निघाला. अंगणातून पायऱ्या उतरून जााईपर्यंत कांडेचोर दिसेनासा झाला. विहिरीच्या आसपास बॅटरी मारून बाळ्या कांडेचोराला शोधायला लागला.

विहिरीच्या एका अंगाला एका मोठ्या घबीत काही वेळा कांडेचोराची विष्ठा दिसायची. ते आठवून बाळ्या ती घब निरखून बघायला विहिरीजवळ गेला. विहिरीच्या काठावर बसून त्याने बंदुक बाजुला ठेवली नी बावीत वाकून बॅटरीच्या उजेडात तो घब निरखायला लागला. नेमकी त्याच वेळी बाळ्याला फीट येणार असल्याची भावना झाली.“आऽऽयली आयली” असे ओरडत बाळ्या उठला. जााणिवेच्या अखेरच्या क्षणीही विहिरीत पडायला होऊ नये म्हणून बाळ्याने बाजुला होण्याचा प्रयत्न केला. विहिरीकडून बाळ्याचा आवाज आलेला ऐकून यमू,तिचे सासरे, सासू गडबडीने कंदील घेऊन बाहेर पडली. खालच्या अंगाने गेलेला सोन्याही बाळ्याचा आवाज ऐकून विहिरीच्या दिशेने धावला.
पेटती बॅटरी नि बंदूक विहिरीच्या कडेला पडलेली दिसली. बाळ्या मात्र कुठेच दिसेना. यमूला तिथेच चक्कर आली. ती बेशुध्द होऊन खाली पडली. धावत आलेल्या सोन्याने पेटती बॅटरी उचलून आजूबाजूला बघितले. मग खोतांना बॅटरी दाखवायला सांगून तो विहिरीत उतरला. साताठ पुरूष पाण्यात बुडी मारून सोन्याने बाळ्याला शोधले. मोठ्या खटपटीने त्याने बाळ्याला वर काढले. पाण्याच्या पृष्ठभागावर आल्यावर सोन्याने विहिरीच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीना घट्टपणे पावले टेकली नि बाळ्याला अर्धवट पाण्याबाहेर काढले तशी बाळ्याचे डोके छातीवर कलंडून लोंबायला लागले.
◙ ◙ ◙ ◙ ◙ ◙