Half and free tickets? in Marathi Biography by Ankush Shingade books and stories PDF | अर्धी व निःशुल्क तिकीट?

Featured Books
Categories
Share

अर्धी व निःशुल्क तिकीट?

अर्धी तिकीट व निःशुल्क प्रवास ; मात्र सामान्य प्रवाशांना मनस्ताप

*महाराष्ट्र हा आधीपासूनच सुजलाम सुजलाम आहे. इथे पुर्वी बारमाही नद्या वाहात होत्या आणि आजही बऱ्याचशा भागात बारमाही नद्या वाहात असतात. तसं पाहता या महाराष्ट्राला चांगली अशी ओळख आहे. मग ते क्षेत्र शेतीचं असो की उद्योगाचं. तसंच नद्याही भरपूर असून त्या नद्यांनी आपल्या परीसरातील भुभाग अतिशय समृद्ध केलेला आहे. अशाच या महाराष्ट्रातील काही जिल्हे त्यांच्यामध्ये असलेल्या विविधांगी गुणानं प्रसिद्ध आहेत. जसे संत्र्यासाठी नागपूर, गुळासाठी कोल्हापूर, नाशिक द्राक्षासाठी, जळगाव केळीसाठी, रत्नागीरी हापूस आंब्यासाठी. तशीच या महाराष्ट्रात दळणवळणाचीही साधनं पर्याप्त आणि पुरक आहेत. अशाच या सुजलाम महाराष्ट्रात पुन्हा एकदा फिरण्याचा योग आला तो मला मिळालेल्या महाराष्ट्र भुषण पुरस्काराच्या निमित्याने व त्यात आलेल्या अनुभवाचा घेतलेला आढावा.*
ते तप्त उन्हाळ्याचे दिवस होते आणि मला महाराष्ट्र भुषण पुरस्कार एका खाजगी संस्थेनं जाहीर केला होता व तो पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूरात होता. तसा मी नेहमीच फिरायला रेल्वेने जात असायचो. परंतु यावेळेस ठरवलं की आपण महाराष्ट्राची लाडकी लालपरी अर्थात एसटीनं जायचं. तसं ठरवताच मी शिवशाही बसची पास काढली व नागपूरला शिवशाहीमध्ये बसलो. जी एसटी यवतमाळ पर्यंतच होती.
शिवशाहीची पास काढण्यामागं माझा उद्देश होता. तो म्हणजे आरामदायकरितीनं जाणं व उन्हाची तीव्रता टाळणं. कारण शिवशाहीत एसी सिस्टम असल्यानं उन्हाची तीव्रता कमी होणार होती. तसा मी नागपूरवरुन शिवशाहीत बसून यवतमाळला पोहोचलो आणि यवतमाळात उतरल्यावर आपल्या महाराष्ट्रातील सुजलाम सुजलामपणाचा परीचय आला.
मी नागपूर पाहिलं आहे. कारण इथंच जास्त काळ अधिवास केला आहे. तसं बरेचदा ऐकलंही होतं की आपल्याही नागपूरपेक्षा इतर जिल्हेही तसेच समृद्ध आहेत. त्याच दृष्टीनं यवतमाळपर्यंत ठीक राहिलं. तशीच कल्पना करुन मी जेव्हा यवतमाळला पोहोचलो आणि तिथं उतरलो. तेव्हा कळलं की महाराष्ट्राला सुजलाम म्हणावं की नाही. तेच प्रश्न चिन्हं माझ्या डोळ्यासमोर साक्षात उभं राहिलं.
यवतमाळात पोहोचताच एवढं गरम व्हायला लागलं की उन्हाचा दाह सहन होत नव्हता. त्यातच नागपूरला येणाऱ्या एसट्या भरपूर होत्या आणि कोल्हापूर मार्गे नांदेडकडे जाणारी एकही एसटी नव्हती. तब्बल दोन तास तेही कडक उन्हात तपश्चर्या करीत असतांना एक एसटी आली. ती एसटी फक्त पुसदपर्यंतच होती. ज्यात महिला आणि म्हाताऱ्या माणसांचीच भरपूर गर्दी होती. तरुण व मुलं बहुतांश नव्हतीच तिथं. त्याचं कारण होतं की महाराष्ट्रानं एसटीनं महिलांसाठी अर्धी तिकीट केली व म्हाताऱ्यांना निःशुल्क.
महाराष्ट्रात महिलांना अर्धी तिकीट व सत्तर वर्षासमोरील व्यक्तींना निःशुल्क प्रवास. हा महाराष्ट्रातील एसटी महामंडळानं घेतलेला निर्णय. त्या निर्णयाची अंमलबजावणी मात्र चुकीच्या मार्गाने होत असल्याची खात्री यवतमाळात आली. कित्येक म्हातारे की ज्यांच्या पायांनाही चालता येत नाही, अशीही वयोवृद्ध माणसं आपला प्रवास निःशुल्क असल्यानं आपल्याला उन्हातान्हाचा त्रास होईल याचा विचार न करता प्रवास करतांना आढळली. शिवाय तरुणांना उठवून अशा न चालता येणाऱ्या म्हाताऱ्यांना जागा देणंही क्रमप्राप्त ठरलं. त्यातच दुसऱ्या जागा अर्धी तिकीट असलेल्या महिलांना देण्यात आली आणि विशेष म्हणजे ज्या लोकांना पुर्ण तिकीट काढावी लागली. त्यांना ताटकळत उभं राहून प्रवास करावं लागलं. हेच चित्र संपुर्ण महाराष्ट्रात दिसलं.
म्हाताऱ्यांना निःशुल्क प्रवास सवलत देवून एक फायदा झाला. तो म्हणजे म्हाताऱ्यांना मनाप्रमाणं जिकडे जाता येईल, तिकडं सैरावैरा फिरता आलं. घरची म्हाताऱ्यांची कटकट साहजीकच कमी झाली व कधी न झाले नव्हते ते झाले. ही म्हातारी मंडळी संपुर्ण महाराष्ट्रच्या दौऱ्यावर निघाल्याचं चित्र यात दिसून आलं. आज जत्थेच्या जत्थे त्यांचेच दिसत असल्याचे चित्र प्रत्येक बसस्थानकावर दिसतात. जर यात शुल्क असतं तर...... तर हे चित्र दिसलंच नसतं. तशीच महिलांना अर्धी तिकीट देवूनही तीच समस्या निर्माण झालेली असून त्या तिकीटीचा ऊहापोह होत आहे. ज्यातून बसमध्ये गर्दी फार दिसते. परंतु नुकसान बरेच होत असेल, याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु याबाबतीत कोण बोलणार! कोणीच बोलू शकत नाही. कारण जनमत सरकारला प्राप्त आहे.
म्हाताऱ्यांना निःशुल्क प्रवासाची सवलत देवून व महिलांना अर्धी तिकीट देवून राज्यसरकारनं सर्व जनतेला खुश केलं. त्यानंतर त्यांनी ते मतदान आपल्या बाजूनं ओढवलं. परंतु त्यात तारांबळ तरुण लोकांची प्रवास करतांना उडेल याचा विचार झाला नाही. यावरुन कळत नाही की सरकारनं एसटीत प्रवासातून अशा निःशुल्क प्रवासाच्या योजना साकारतांना नेमकं काय साध्य करायचं होतं? द्यायचंच होतं तर रत्नागीरी स्थानकावरुन प्रवास करतांना रात्री साडेसात नंतर प्रवास करतांना ज्या एसट्या उपलब्ध नाहीत. त्या द्यायला हव्या होत्या. कारण गणपतीपुळे हा प्रेक्षणीय भाग आहे व गणपतीपुळेवरुन एसट्या रत्नागीरीपर्यंत तर येतात. परंतु पुढं कोल्हापूरात येतांना साडेसातनंतर गाड्याच नाहीत. तसं पाहिल्यास गणपतीपुळे हे प्रेक्षणीय स्थळ आहे आणि प्रवासी गणपतीपुळेवरुन रत्नागीरीला आल्यावर,त्यांना कोल्हापूरात यायचं असेल तर वा कोणाला जर कोल्हापूरात तत्काळ यायचे असेल तर रात्री साडेसातनंतर गाड्या नसणं ही शोकांतिकाच आहे. जरी रत्नागीरी हे जिल्ह्याचे ठिकाण असलं तरी. त्यातच या महाराष्ट्रात रत्नागीरीला रात्री साडेसातनंतर गाड्या नसल्यानं त्याचा लाभ परराज्यातील म्हणजेच कर्नाटकातील राज्य घेत असतात. त्यांच्या रात्री साडेसातनंतर कोल्हापूर प्रवासासाठी गाड्या येतात.
महाराष्ट्र खरंच सुजलाम सुजलाम आहे. परंतु त्या सुजलाम सुजलामपणावर वरील गोष्टीवरुन प्रश्नचिन्हं उभं राहातं व कोणाच्याही मनात शंका उत्पन्न होते.
महत्वाचं सांगायचं झाल्यास योजना आखाव्यात. परंतु त्या योजना चारही बाजूनं विचार करुनच आखाव्यात. केवळ आपल्याला लोकं चांगले म्हणतील वा मतदान मिळवता येईल यादृष्टीनं योजना आखू नयेत. हं, म्हाताऱ्यांना निःशुल्क प्रवास योजना दिली. ती एक चांगली गोष्ट झाली. तशीच महिलांना अर्धी तिकीट दिली. तिही एक चांगलीच गोष्ट ठरली. परंतु त्याचबरोबर त्यांना प्रवासासाठी एखादी वेगळी गाडी दिली असती तर ना त्यांची प्रवास करतांना तारांबळ उडाली असती, ना सामान्य तरुण लोकांची प्रवास करतांना तारांबळ उडाली असती. शिवाय जी याच गोष्टीवरुन एसटीत जागेसाठी भांडणं होतात, ती भांडणंही झाली नसती हे तेवढंच खरं. कारण आज असा प्रवास निःशुल्क वा अर्ध्या तिकीटाचा इतर सर्वासोबत होत असतांना बसण्याच्या जागेसाठी जी भांडणं होतात प्रत्येक स्टेशनवर. त्याची कल्पना एसटीतून प्रवास करणाऱ्याच व्यक्तींना येते, इतरांना ती येत नाहीच. यात शंका नाही. यावर उपाय एकच की आगामी काळात म्हातारे, महिला आणि इतर अशांना खास सवलत म्हणून वेगवेगळ्या एसट्या पुरवाव्यात म्हणजे झालं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०