Swapdwar - 8 in Marathi Horror Stories by Nikhil Deore books and stories PDF | स्वप्नद्वार - 8

Featured Books
Categories
Share

स्वप्नद्वार - 8

स्वप्नद्वार ( भाग 8)


भाग 7 वरून पुढे

" काय? " सर्वांनी एका स्वरात प्रतिप्रश्न केला.
" निशांत मला सांग तुला राजा वीरवर्धनबद्दल एवढी माहिती कशी आहे? " भुवया उंचावून डॉक्टर म्हणाले.
"काही दिवसांपूर्वी माझ्या क्लिनिकमध्ये रमेश सहस्रबुद्धे हे ऐतिहासिक लेखक मानसिक उपचारासाठी आले होते. नुकतेच त्यांनी " गाथा वीरवर्धनची खंड -1" हे पुस्तक प्रकाशित केले होते. त्याचाच सोहळा आटोपून ते माझ्याकडे उपचारासाठी आले होते. मलाही अवांतर वाचनाची आवड असल्यामुळे मी त्यांच्याशी या विषयावर बरीचशी चर्चाही केली. ऐतिहासिक विषयावर समान विचार असल्यामुळे त्यांनी मला त्यांच पुस्तक ' गाथा विरवर्धनची खंड 1' हे पुस्तक मला वाचायला दिलं. ते विचित्र स्वप्ने पडण्याच्या त्रासाने त्रस्त होते ".
" निशांत तुला काही सत्य सांगायचं आहे " निशांतवर कटाक्ष फेकून डॉक्टर म्हणाले.
"काय? "
" तुला Multiple Personality Disorder हा मानसिक रोग आहे ".
सर्वांच्या नजरा आता निशांतवर खिळल्या. निशांतच्या मनाच्या मंदिरात शंकेच्या असंख्य घंटा घणाणू लागल्या होत्या.
" शक्यंच नाही " तोंडातून एक फुत्कार काढून निशांत म्हणाला. त्याच्या कपाळावर आठ्यांच जाळ पसरलं होत.
" खरंतर माणूस जेव्हा अतिशय जास्त भावनेच्या चक्रात अडकतो तेव्हा तो Multiple Pesonality Disorder(MPD) या रोगांनी ग्रस्त होतो. अतिमहत्वकांशा हेसुद्धा Multiple Personality Disorder च कारण असू शकत. मुळात मनुष्य जेव्हा कुणातरी पेक्षा श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याच्या मनात अगणित भावना उफाडून येतात आणि जेव्हा तो या भावनेच्या चक्रात अडकतो तेव्हा त्याला मानसिक आजार होतात. त्यापैकीच एक म्हणजे Multiple Personality Disorder. म्हणून मनुष्याने कधीही उत्तम बनण्याचा प्रयत्न करावा. कुणतारीपेक्षा श्रेष्ठ बनण्याच्या काटेरी कुंपणेच्या भावनेत अडकू नये " डॉक्टरांनी निशांतला स्पष्टीकरण दिलं.
" खरं आहे निशांत नेहमीच मानसोपचारात श्रेष्ठ बनण्याचा प्रयत्न करीत होता " योगेश स्वतःशीच पुटपुटला.
" जेव्हा तू माझ्या क्लीनिकमध्ये आला तेव्हाच तुझ्या सर्व हालचालीवर माझं बारीक लक्ष होत. तेव्हा मला तुझ्यात काही गोष्टी संशयास्पद जाणवल्या पण ते सर्व धुक्यासारखं अस्पष्ट होत. काही गोष्टी जर मला आधीच स्पष्ट झाल्या असत्या तर मी तुला कधीच तुझ्या स्वप्नदुनियेत पाठवलं नसतं. म्हणून मी तुझ्या अनुपस्थित काही गोष्टींचा उलगडा करण्याच ठरवलं. एके दिवशी तू घरी नसतांना मी तुझ्या आईला भेटलो आणि तुझ्या खोलीची झडतीही घेतली. रहस्य उलगडलं होत. माझी शंका खरी ठरली होती. ज्या दिवशी मी तुला हि गोष्ट सांगणार होतो त्याचदिवशी तू मला यापेक्षा विदारक बातमी सांगितली कि तो स्वप्नदुनिया भेदून वास्तविक जगात आलाय".
निशांतच्या मनात विचाराचा उलट -सुलट अग्नी भडकू लागला होता . सर्व काही विचारशक्तीचा पल्याड होत.
" ते सर्व ठीक आहे पण याच काही ठोस प्रमाण आहे का? " शीतल स्वरात निशांतने प्रश्न केला.
" Multiple Personality Disorder बद्दल इथे काही बेसीक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. हा रोग तीन भागात विभाजित आहे. सौम्य,तीव्र आणि अतितीव्र. यापैकी तू सौम्य भागात मोडतो. सौम्य म्हणजे मानव त्या व्यक्तिमत्वात काही क्षण किंवा काही मिनटे असतो, तीव्र या विभागात तो हिंसक बनतो...तो .. किती कालवाधीसाठी त्या व्यक्तिमत्वात राहील याच काही खरं नसतं. आता या Multiple Personality Disorder चा तिसरा प्रकार म्हणजेच अतितीव्र.... हा प्रकार सर्वात भयंकर असतो. यात रुग्ण हिंसक तर बनतोच पण तो कधी यातून बरा होऊ शकेल कि नाही हेही खात्रीने सांगता येत नाही ".

सर्वजण काही क्षण धीरगंभीर झाले. निशांतच्या चेहऱ्यावर चिंतेच्या गडद छटा पसरल्या. त्याचा मानेवरून घामाचे दोन टपोरे थेंब सरळ रेषेत ओघळत होते. त्या धीरगंभीर वातावरणात शब्दांचे बाण चालवत डॉक्टर म्हणाले.
" निशांत तुझ्या MPD मध्ये कसं माहित आहे.... तू फक्त काही क्षण.. काही मिनिटे व्यक्तिमत्वात राहतोस ती व्यक्ती तू स्वतः आहे असे समजून आपल्या डायरीत काहीतरी लिहितोस. मी जेव्हा तुझ्या गैरहजेरीत तुझी डायरी वाचली तेव्हा कितीतरी व्यक्तीबद्दल तू त्यांच्याशी निगडित काही माहिती लिहली होती. मला आश्चर्य तर तेव्हा वाटलं जेव्हा तू माझ्याही व्यक्तिमत्वात काही क्षण होता ".
" काय? मी तुमच्यातही काही क्षण होतो " आपल्या विचारकक्षेतून डोके वर काढत निशांत म्हणाला.
" होय उदाहरणासहित स्पष्टीकरण द्यायचं झाल्यास... मी तुला अनाहतभेदन क्रियेच्या मदतीने स्वप्नदुनियेत पाठवलं होत त्यामुळे तुझ्या मनात माझ्याविषयी असंख्य भावना उमलून आल्या माझ्याबद्दल तू हि माहिती लिहली होती ... 'मी विजय कांत भारतातील सर्वोत्तम मानसोपचार तज्ञ आहे.. अनाहतभेदण क्रिया हि मला मिळालेली एक अभुदपूर्व देणगी आहे. ज्याच्या मदतीने कुणाच्याही स्वप्नदुनियेतील प्रश्न मी अगदी सहज सोडवू शकतो ".
खोलीत सर्वत्र स्थिरता पसरली.
" मग या Multiple Personality Disorder आणि राजा वीरवर्धन यांचा काय संबंध? "योगेशने प्रश्न उभा केला.
" मला तर असं वाटतं... निशांत हा राजा वीरवर्धन यांच पुस्तक वाचून त्यांच्याही व्यक्तिमत्वात काही क्षण राहिला असेल. त्यानेही राजा वीरवर्धनच्या जीवनाबद्दल काहीतरी विशेष माहिती लिहली असेल. पण ते कुठे लिहली आहे हे मला ठाऊक नाही कारण त्याच्या डायरीत कुठेही राजा वीरवर्धनचा उल्लेख नव्हता. त्याच विशिष्ट माहितीमुळे त्या अमानवी शक्तीला आव्हान झालं असावं म्हणूनच ऐतिहासिक लेखक रमेश सहस्त्रबुद्धे आणि तुला वाईट स्वप्न पडण्याचा त्रासजाणवत होता. राजा वीरवर्धन हा तुमच्या दोघातही समान दुवा आहे".
सर्वांच्या काळजात चिंतेचे, कुतूहलाचे आणि असंख्य प्रश्नाचे चरे उमटले.
" मग या लढाईतली आपली पुढची योजना काय असावी? " योगेश विचारू लागला .
सर्वांनी डॉक्टरांचे शब्द ऐकण्यासाठी आपले कान टवकारले.
" मला तरी असे वाटते मी ऐतिहासिक लेखक रमेश सहस्त्रबुद्धे यांना भेटून त्या खंड -1 मध्ये असं काय विशेष लिहलं आहे याचाआधी उलगडा करतो कारण आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे. ती काळशक्ती तुला संपवण्यासाठी आसुसली आहे"
पाण्याचा एक घोट घेऊन डॉक्टर म्हणाले.
" मी पण तुमच्या बरोबर येतो म्हणजे मी जे काही लिहलं असेल ते मी शोधून काढू शकतो " मधातच निशांतने आपला स्वर काढला
" नाही आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे. किंबहुना परत जर त्या काळशक्तीशी आपला सामना झालाच तर इथे आचार्य विष्णुगुप्त आणि आर्य त्या काळशक्तीला रोखून ठेवू शकेल. पण जर तू माझ्यासोबत आलास तर तुझ्या प्राणाची काहीच शाश्वती नसेल ".
" उद्याचा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. उद्या सर्व गोष्टी निखळ खळखळपणे वाहणाऱ्या जलासारख्या स्पष्ट होतील " विष्णुगुप्तांचा पहाडी स्वर त्या खोलीत सर्वदूर घुमला.

गर्भगळीत तिमिरातुनी चालतांना कितीतरी रहस्य बाहेर पडतात. पण जेव्हा रहस्य भेदून सत्य बाहेर पडत.....तेव्हा त्या सत्यासाठी काय तुम्ही तयार आहात??

गगनाच्या कडा उजाळल्या होत्या. सूर्यदेवाचे पिवळे तेजस्वी किरणे निळ्या गगनाला चिरून जमिनीवर पसरले होते. आज निशांतच्या जीवनातला सर्वात महत्वाचा दिवस होता. डॉक्टर सकाळीच मुबंईला ऐतिहासिक लेखक रमेश सहस्त्रबुद्धे यांना भेटायला निघाले.

" मला असे वाटते राजा वीरवर्धन यांनी आपल्या शेवटच्या वर्षात काही लेण्या कोरल्या होत्या . त्यात नक्कीच काहीतरी गुप्त माहिती कोरून ठेवली असेल.आपण जर त्या लेण्यांना एकदा नजरेखालून घातलं तर नक्कीच काहीतरी विशिष्ट माहिती आपल्याला मिळू शकेल " इतिहासतज्ञ संकेत यांनी निशांतला सल्ला दिला.
" नक्कीच आपल्याला इतिहासातील धुळाक्षरात काहीतरी सापडू शकत " आचार्य विष्णुगुप्त म्हणाले. त्यांची लांबसडक पांढरीशुभ्र दाढी वाऱ्यावर हिंदोळत होती.

डॉक्टर विजय कांत हे मुबंईला ऐतिहासिक लेखक रमेश सहस्त्रबुद्धे यांच्या घरी पोहचले. मानसिक आजारामुळे त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम झाला होता. त्याच्या निस्तेज आणि दुर्बल शरीरावरुन ते काही दिवसांचेच सोबती आहे याचा अंदाज डॉक्टरांनी लावला. डॉक्टरांनी आपला परिचय करून देऊन काही प्रश्न विचारण्यास सुरवात केली.
" सर मला अशी शंका आहे कि राजा वीरवर्धनशी निगडित कुठलंतरी रहस्य तुमच्याकडून लिहलं गेल आहे. ज्यामुळे एका काळशक्तीला आव्हान झालं आहे. मला शंका आहे ती काळशक्ती चेतनसिंघ किंवा अलोकसिंघची असेल. या प्रकरणात काय सत्य आहे कुणास ठाऊक.. कारण डॉक्टर निशांतही याच त्रासाने ग्रस्त झाला होता आणि आता तर परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली आहे ".
ऐतिहासिक लेखक रमेश सहस्त्रबुद्धे यांचे ओठ हलले. चार शब्द बोलण्यासाठी त्यांच शरीर सर्वशक्ती एकवटत होत. बोलतांना त्यांची पिंजरा छाती घर -घर करीत होती. अडखळत अडखळत ते म्हणाले
" खंड 1 मध्ये काहीच लिहलं नाही आहे".
------------------------------------------------------------------

आचार्य विष्णुगुप्त, इतिहासतज्ञ संकेत, आर्य आणि निशांत राजमहलाच्या दूर कोरलेल्या लेण्यांमध्ये काही विशेष माहिती मिळेल या भाबड्या आशेवर अंधार पसरलेल्या त्या लेण्यात मेणबत्ती घेऊन शोधाशोध करीत होते. त्या अमानवी शक्तीचा कुठल्याही क्षणी सामना होईल याची तयारी सुद्धा त्यांनी केली होतीच. काही लेण्या अति खोलवर असल्यामुळे श्वास घ्यायला त्यांना थोडा त्रास होत होता. दूरवर त्यांना एक खोली दिसली. जाड भरड्या भेसूर आवाजातली एक भयंकर किंकाळी त्या खोलीतून बाहेर पडली. तस सर्वांच्या काळजात धस्स... झालं. त्या खोलीच्या भिंतींना नखांनी ओरबडल्याच्या स्वरांनी सर्वांच्या काळजात भीतीने खोलवर पाय पसरले.
" त्या खोलीत नक्कीच काहीतरी विचित्र आहे... मला तर वाटते तीच अमानवी शक्ती त्या खोलीत असावी " आचार्य विष्णुगुप्तांनी सर्वांना सावध केलं.
एवढ्यात रक्ताने माखलेला लांबसडक नखे असलेला एक हात त्या खोलीतून बाहेर आला. क्षणाचाही विलंब न करता आचार्य विष्णुगुप्त यांनी अभिमंत्रित पवित्र जल त्या हातावर शिंपळले. पवित्र जलाचे थेंब त्या हातावर पडताच एक भयंकर जोरदार किंकाळी घुमली. ते स्वर एवढे भीषण होते कि तिथे असलेल्या पक्षांनी फड... फड.. पंख पसरवीत उडून गेले. इतक्यात जमिनीला तलवारीच्या घर्षणाचा भीषण स्वर सर्वत्र घुमू लागला.
" आपण परत या काळशक्तीला जास्त वेळ रोखू शकणार नाही तेव्हा आपण इथून माघार घेऊन मागे फिरलेलंच बर... एखाया पवित्र स्थळी हि काळशक्ती नक्कीच आपलं काही बिघडू शकणार नाही " आचार्य विष्णुगुप्त म्हणाले. त्यांचा तेजस्वि चेहरा निराशेच्या गर्तेत झोकाळला होता. सर्वांनीच सहमती दर्शवली. लेण्यांमध्ये असलेला त्यांचा आशेचा शेवटचा किरणही तिमिरात हरवून गेला.
--------------------------------------------------------------------
" खंड 1 मध्ये काहीच लिहलं नाही आहे "
" मग त्या काळशक्तीच रहस्य तरी काय आहे? " डोळे मोठे करून डॉक्टर विचारू लागले. श्वास प्रचंड भरून येत होता.
" खंड 2 जो मी नुकताच लिहायला सुरवात केली होती... पण...... " श्वास अडखळत होता. शब्दही मुखावाटे बाहेर पडत नव्हते.
" पण खंड 2 मध्ये असं लिहलंय तरी काय? " कुतूहलाने डॉक्टरांनी विचारले.
रमेश सहस्त्रबुद्धे यांचा ऊर भरून आला. छातीत एक जोरदार कळ उठली. कसेबसे शब्द एकवटत ते म्हणाले " खंड 2 मध्ये चेतनसिंघ आणि अलोकसिंघ.... "
पुढच्याच क्षणात त्यांचे प्राण पाखरू उडून गेले.
-------------------------------------------------------------------
" बुद्धिबळाच्या या पटलावर आपल्या प्रत्येक चालीवर पदरी निराशाच पडत आहे. या लढाईचा अंत कुठे होईल कुणास ठाऊक. बहुतेक हि लढाई माझे प्राण घेऊनच संपेल " निशांतच्या मनाच्या आकाशात चिंतेच्या विजा आरपार कडाडल्या. मंदिराच्या ओट्यावर सर्वजण बसून होते.
इतिहासतज्ञ संकेत त्याला धीर देत म्हणाले
" एक शेवटचा प्रयत्न आपण करून बघू... राजा वीरवर्धन याने लिहलेल्या शेवटच्या ग्रंथात नक्कीच काहीतरी सापडेल. सध्या तो ग्रंथ बऱ्याच इतिहासतज्ञांनी रिप्रिंट केला आहे ".
"कुठे मिळेल तो ग्रंथ? " निशांतने प्रतिप्रश्न केला.
" जुन्या वाचनालयात ".
इतिहासतज्ञ संकेत, आचार्य विष्णूगुप्त आणि निशांत त्या ग्रंथाला व्यवस्थितपणे चाळत होते. निशांत एक एका शब्दावर बारीक लक्ष ठेवून होता. एका जागी तो थांबला त्याच्या चेहऱ्यावर हर्षेउल्हासीत आनंद होता.
" हेच ते वाक्य आहे जे मी त्या गुहेच्या तळघरात वाचल होत " मार्दव आवाजात निशांत म्हणाला.

क्रमश...