Swapdwar - 7 in Marathi Horror Stories by Nikhil Deore books and stories PDF | स्वप्नद्वार - 7

Featured Books
Categories
Share

स्वप्नद्वार - 7

स्वप्नद्वार ( भाग 7)

भाग 6 वरून पुढे.


त्या अमानवी शक्तीने निशांतच्या मानेवर दुसरा प्रहार करण्यासाठी तलवार उचलली. बाहेर वाऱ्याचे झोत सैरभैर थैमान घालत होते. त्या अमानवी शक्तीच्या हातात असलेली तलवार वाऱ्याला कापत विजेच्या वेगाने निशांतच्या मानेपर्यंत पोहचणार इतक्यात कुठल्यातरी दिव्य तेजपूंजी पुरुषाच्या हाताच्या मुठीला रुद्राक्षाच्या माळा गुंडाळून होत्या. तो प्रहार त्यांनी आपल्या भरदार हाताच्या मुठीवर घेतला. कोण...... कोण होते ते विराट दिव्य तेजोमय पुरुष.... ते होते.... आचार्य विष्णुगुप्त. त्यांच्या सोबत त्यांचा शिष्य आर्यही होता. त्या अमानवी शक्तीच ते बिभित्स रूप आणि त्याच्या डोक्यावरच ते लालसर मास पाहून त्याच्या पोटात खड्डा पडला. डोक्यात विचारांचे घणघणाती घाव एका पाठोपाठ एक सुरु होते. क्षणातच त्या खोलीतले वातावरण बददले. एका कुबट उग्र वासाने सर्वांच नाक आकसल .. हवेचा दाब कमी झाल्यामुळे सर्वांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता.... काळपट धुराचा पडदा त्या खोलीत सर्वदूर पसरला. आता त्या तिमीरांगणात दोन अद्वितीय शक्ती ऐकमेकांसमोर येऊन उभ्या ठाकल्या होत्या. एकीकडे अनंत, असीम, अक्राळविक्राळ काळशक्ती तर दुसरीकडे विष्णुगुप्त नामक पवित्र, दिव्य तेजशक्ती. विष्णुगुप्त 60-62 वर्षांचे, लांबसडक पांढरे केस, भगवे वस्त्र परिधान केलेले, प्रमाणबद्ध वल्कले, गळ्यात असलेल्या रुद्राक्षाच्या माळा वाऱ्याच्या झोतामुळे विशिष्टपणे हलत होत्या, चेहऱ्यावर एक पिवळी कांती अस त्यांच तेजपुंज व्यक्तिमत्व होत. विष्णुगुप्तांच्या माथ्यावरील रेषा सरळ रेषेत ताठरल्या होत्या. जणू त्याही त्या अमानवी शक्तीला गर्जून सांगत होत्या.
" एका काळशक्तीचा एका पवित्र तेजशक्तीवर विजय..... असंभव ". समोरच काही अंतरावर ती अमानवी शक्ती उभी होती. रुद्राक्षाच्या स्पर्शाने ती अमानवी शक्ती काही पावले मागे सरली होती. पण तिच्या नकारात्मक शक्तीच आभामंडल अतिशय प्रबळ होत. त्याचा प्रहार चुकल्यामुळे तो क्रोधाच्या आगठिणग्या सर्वत्र बरसवत होता. त्याच्या एका भेसूर किंकाळीने सर्वजणांच्या काळजात भीतीचे व्रण उमटले . भयग्रस्त झालेल्या हरीणाच्या दृष्टीने डॉक्टर, योगेश आणि संकेत डोळे चूरचूरत समोरच दृश्य पाहत होते. परत एकदा एक जोरदार प्रहार करण्यासाठी ती अमानवी शक्ती सज्ज झाली होती. तलवार उचलल्या गेली. एक जोरदार प्रहार विष्णुगुप्त यांच्यावर केला. परंतु विष्णुगुप्तांनी तो वार परत एकदा आपल्या मुठीला गुंडाळलेल्या रुद्राक्षाच्या माळेवर घेतला. आपल्या गुरुवर्यांवर झालेल्या प्रहरा मुळे आर्यने आपला तिसरा नेत्र उघडून क्रोध प्रकट केला. त्याच्या नेत्रातील शिरा रक्ताळल्या होत्या. डोक्यात सुरु असलेल्या विचारांचे घणघणाती घाव त्याने शांत करून स्वतःला सावरले. आर्य अतिशय तरुण असल्यामुळे त्याच्याजवळ फार मोठी सिद्धी नव्हती. म्हणून त्याने मंत्रशक्तीचा वापर करण्याचे ठरवले. त्याच्या एका गगनभेदी मंत्रस्वराने ती खोली दुमदुमून गेली. विष्णुगुप्तांनीही त्याचेच अनुसरण करत मंत्र उच्चारण्यास सुरवात केली. मंत्राचा घणघणाती स्वर त्या खोलीत थैमान घालत होता. मंत्राच्या तीक्ष्ण बाणामुळे ती अमानवी शक्ती हतबल झाली आणि काही क्षणातच तेथून अदृश्यहि झाली.

अक्राळविक्राळ वादळानंतर त्या घरात आता एक स्थिरता पसरली. मोबाईलचा अंधुकसा प्रकाश त्या तिमिराची तीव्रता कमी करण्यास हातभार लावत होता. बाहेर वाऱ्याचा वेगही कमी झाला होता. हलक्या हलक्या वाऱ्याच्या वेगात विष्णुगुप्तांचे पांढरे लांबसडक केस भूरूभरू उडत होते. निशांतला अस वेदनेनं तडफडत पाहून सर्वजण गहिवरले. विष्णुगुप्तांच्या कपाळावर आठ्यांनी गर्दी केली.
" काय प्रकरण आहे हे आणि कुठली एवढी भयानक काळशक्ती आहे हि? " एका खड्या स्वरात विष्णुगुप्तांनी विचारले.
" ती काळशक्ती..... " डॉक्टर काही सांगणार. इतक्यात निशांतने त्यांना शांत राहण्याची खूण केली. डॉक्टरांनी निशांतच्या जखमेवर प्राथमिक उपचार केले. निशांतच्या चेहऱ्यावर अजूनही वेदनाग्रस्त छटा झडकत होत्या. योगेश त्याच्या दुखऱ्या मनावर सांत्वनाची फुंकर घालण्याचा अपुरा प्रयत्न करीत होता. एकंदरीत घरातले वातावरण आता स्थिर वाटू लागले. आपल्या रुद्राक्षाच्या माळा बरोबर करत विष्णुगुप्त म्हणाले.
" ती कुठली काळशक्ती होती? ".
कुणी काही बोलणार एवढ्यात निशांत म्हणाला.
" आम्हाला काहीच ठाऊक नाही ".
विष्णगुप्तांच्या माथ्यावर आठ्या जमल्या होत्या आणि त्यामागे एक शीर सरळ रेषेत आक्रसत होती.
" आम्हाला राजा वीरवर्धन बद्दल प्रसिद्ध असलेली भयकथेच्या आख्यायिकेबद्दल माहिती हवी आहे ".कुणी काही बोलायच्या आत निशांतने प्रतिप्रश्न केला.
" नक्की काय माहिती हवी आहे तुम्हाला " एका मृदू स्वरात विष्णुगुप्त म्हणाले.
" सुवर्णगरुड... आणि ठगांबद्दल प्रसिद्ध असलेली भयकथा " डॉक्टर म्हणाले.

" अच्छा राजा वीरवर्धन याने ठगांचा सरदार चेतनसिंघ आणि त्याचा मुलगा अलोकसिंग यांचा आपल्या समशेरीने शिरच्छेद केला. परंतु मरता मरता त्याने शपथ घेतली कि तो मेल्यावरही परत येईल आपला प्रतिशोध घेण्यासाठी आणि झालंही तसंच दुसऱ्याच दिवशी राजा वीरवर्धन याचा कुळवंश संपला. त्याचे दोनही पुत्र आणि भाऊ मृत्यमुखी पडले. याच गोष्टीचा धक्का राजा वीरवर्धन सहन करू शकला नाही. तो हि काही दिवसात मानसिक आजाराने स्वर्गवासी झाला ".
निशांत सर्वचित्ताने एकाग्र होऊन ऐकत होता.
" अस काही लोक म्हणतात कि राजा वीरवर्धन याने त्या सरदाराच्या काळशक्तीला अभिमंत्रित शक्तीने जखडून ठेवलं होत ".
" म्हणजे कुठल्या प्रकारच्या शक्तीने? " प्रश्नार्थक चेहऱ्याने निशांत विचारू लागला.
" राजा वीरवर्धन यांच्या महालात एक गुप्त तळघर होत. त्या काळातले गुप्तहेर काही गुप्त माहिती साठवून ठेवण्यासाठी त्या तळघराचा वापर करायचे. तेथून काही अंतरावर एक गुहा होती. राज्यातले जे हि दृष्ट अपराधी, लुटारू, गुन्हेगार यांचा शिरच्छेद झाल्यावर सामान्य जनतेची दृष्टीहि त्याच्यावर पडू नये म्हणून त्यांना त्या गुहेत पुरले जात असे. अशी एक आख्यायिका माझ्या वाचनात आली कि सरदार चेतनसिंघ याला त्याच गुहेत अभिमंत्रित शक्तीने जखडून ठेवलंय. ठगांवर मिळवलेल्या विजयाचा पुतळा म्हणजे सुवर्णगरुड तो हि तिथल्याच कुठल्यातरी परिसरात उभारला आहे ".विष्णुगुप्तांनी आपलं बोलणं थांबवलं.
निशांत, डॉक्टर आणि योगेश यांच्या नजरा ऐकमेकांना भिडल्या होत्या. निशांत अवाक होऊन विष्णुगुप्ताकडे पाहू लागला. त्याच्या मनात प्रश्नाचं काहूर उठलं. आपल्या कपाळावर हात देऊन तो म्हणाला.
" मी माझ्या आयुष्यातही सर्वात मोठी चूक केलीय. मी त्या गुहेत जाऊन त्याला अभिमंत्रित शक्तीतून मुक्त केलंय. मघाशी ज्या अमानवी शक्तीचा तुमच्याशी टकराव झाला. तो सरदार चेतनसिंघ होता ".
" काय? कसं शक्य आहे हे? मुळात ती गुहा खरंच आहे कि नाही याचे काही ठोस पुरावे अजूनही नाही. ती फक्त आख्यायिका आहे. त्यात सर्व सत्य असेलच असं नाही आणि जर असेलही तरी ती गुहा कुठे होती याच रहस्य राजा वीरवर्धन सोबतच संपून गेलंय. भूस्खलनात ती गुहा जमिनीत गाडलीही जाऊ शकते म्हणून हा तुझा गैरसमज असेल असेच मला वाटते " विष्णुगुप्तांनी एक कटाक्ष निशांतवर टाकला.
" कुठलाही गैरसमज नाही झालाय माझा. मी स्वप्नदुनियेत जाऊन त्याला मुक्त केलंय. त्याच भयानक गुहेत मी प्रवेश केला होता ".
" कसं शक्य आहे हे ...... स्वप्नदुनियेत किंवा कुठल्याही प्रकारच्या आभासी जगात जाण्यासाठी अनाहतभेदन क्रियेचा वापर करावा लागतो. ती क्रिया फक्त काही बोटावर मोजता येणाऱ्या लोकांनाच ठाऊक आहे. एवढेच काय ती क्रिया मलाही अजून यशस्वीपणे येत नाही " विष्णुगुप्त एकादमात म्हणाले.
त्या खोलीतल वातावरण काहीस अस्थिर झालं होत.
" हो बरोबर आहे तुमचं म्हणणं... त्या बोटांवर मोजता येणाऱ्या लोकांपैकीच मी एक आहे " एका कापऱ्या नाराजीच्या स्वरात डॉक्टर म्हणाले . डॉक्टरांनी घडलेल्या सर्व घटना सविस्तरपणे विष्णूगुप्तांना सांगितल्या
" काय.... ! असं जर खरंच असेल तर मग खूपच अकल्पनीय गोष्ट आहे हि. त्या काळशक्तीला मी पण संपवू शकत नाही". दूरवर नजर फिरवीत विष्णुगुप्त म्हणाले. त्यांचे ते शब्द ऐकुन सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग जमले होते.
डॉक्टर आपल्या खुरट्या दाढीवर हात ठेवून म्हणाले.
" म्हणजे नक्की म्हणायचंय तरी काय तुम्हाला? "
" होय खरं तेच सांगतोय. त्या काळशक्तीला मी संपवू शकत नाही. फक्त काही काळ रोखून ठेवू शकतो. त्याच्या नकारात्मक शक्तीच आभामंडळ अतिशय प्रबळ आहे. त्याला संपवण्याएवढी सिद्धी माझ्यातहि नाही आहे ".
एवढ्यात आर्यचा गगनभेदी स्वर त्या खोलीत घुमला.
" एक व्यक्ती आहे. जो या काळशक्तीला संपवू शकतो " सर्वांच्या नजरा आता आर्यकडे वळल्या होत्या.
" कोण आहे ती व्यक्ती? " डॉक्टरांनी प्रश्न केला .
" काळशक्तीने कितीही गिधाडपंख पसरविले तरीही त्याला भेदण्याचे सामर्थ त्याच्यात आहे. मुळात सूर्य उगवतो .... सूर्य माथ्यावर चढतो आणि मावळतो. पण तो सदैव इथेच असतो. आपल्या पाशुपतास्त्ररूपी अग्निज्वाळा काळशक्तीवर बरसवत " त्याचे ते शब्द ऐकुन सर्वजण रोमांचित झाले.
" कोण? आहे तरी कोण तो? "त्याच नाव ऐकण्यासाठी सर्वांनी आपले कान टवकारले होते .
" रुद्र........ रुद्रदमण ". त्याच्या गगनभेदी स्वराच्या लहरी खोलीत सर्वत्र घुमत होत्या.
" नाही रुद्रदमणला इथे बोलावता येणार नाही. ते शक्यच नाही " विष्णुगुप्त गंभीर आवाजात म्हणाले.
" का.... काय कारण गुरुवर्य?" आर्य ने प्रश्न उपस्थित केला.
" रुद्रदमण त्याच्या बालपणात काही न सुटलेले प्रश्न सोडवित आहे. मुळात तो एका दृष्ट काळ्या वादळाशी छातीझुंज घेत आहे. किंबहुना ते वादळ यापेक्षा कितीतरी पटीने जास्त विध्वंसक आहे म्हणून रुद्रदमण इथे येऊच शकणार नाही ".
विष्णुगुप्तांचे शब्द ऐकुन सर्वांच्या काळजात परत भीतीची एक लाट उसळली. चेहऱ्यावर भयग्रस्त वलय निर्माण झाले.
" आता काय होणार? " निशांत विचारू लागला.
" काळजी नका करू. आपण सत्याच्या बाजूने लढत आहोत .जेव्हाही कधी दानव आणि मानव ऐकमेकांसमोर येऊन उभे ठाकतात तेव्हा नेहमीच दानवाची हार निश्चित असते. कारण मानव नेहमी सत्याच्या बाजूने लढत असतो ".विष्णुगुप्त सर्वांना धीर देत होते. निशांत मुसक्या आवढल्याप्रमाणे शांत झाला होता. स्वतःच्या स्वप्नदुनियेत जाण्याच्या इच्छेमुळे आज त्याच्यावर एवढे भीषण संकट ओढवले होते.
" रुद्रदमण शिवाय हे युद्ध जिकंने खूपच कठीण होणार आहे " आर्यच्या त्या शब्दांनी परत एकदा सर्वांच्या पोटात खड्डा पडला.
" खरंतर राजा वीरवर्धन.... सरदार चेतनसिंघ आणि ते स्वप्नद्वार यांचा नक्की तुझ्याशी संबंध तरी काय हे मला उमजतंच नाही आहे ".विष्णुगुप्त म्हणाले.
एवढ्यात डॉक्टरांची हालचाल त्यांना जाणवली. आपल्या डोळ्यावरील चष्मा बरोबर करत डॉक्टर बोलू लागले.
" हि आपण ऐकलेल्या कथेचा फक्त एकच भाग आहे. अनपेक्षितपणे या कथेचा दुसरा भाग धूसरपणे माझ्या लक्षात आला आहे ".
" काय? " सर्वांनी एकाच स्वरात प्रतिप्रश्न केला.

क्रमश......

टीप :- रुद्रदमनचा उल्लेख मी " एक रहस्य आणखी " या कथेत केला आहे.