What should one do? in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | कोणी काय काय करावं

Featured Books
Categories
Share

कोणी काय काय करावं

कोणी काय करावं म्हणजे देशाचा विकास होईल?

*देशात व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती यानुसार भारतात अनेक पक्ष आहेत व ते निवडणुकीला उभे राहतात. त्यांनी तसं उभं राहण्यापेक्षा मुख्य राजकीय पक्षांना समर्थन द्यावं. उमेदवार म्हणून निवडून आलेल्या नेत्यानं आपल्या लेकरासाठी गडगंज संपत्ती गोळा करु नये. ती मुक्तहस्ते लोकांसाठी खर्च करावी. कारण मरणानंतर कोणीही ती वर नेत नाही. जनतेनंही मुक्तपणानं मतदान करावं. कारण मतदान हे सर्व दानापेक्षा अनमोल अशीच वस्तू आहे ते जनतेनं लक्षात घ्यावं म्हणजे झालं.*
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. ह्या देशात अनेक धर्म व पंथ आहेत. तशाच जाती आहेत. त्याचबरोबर विविध विचारांचे लोकंही आहेत. ते वेगवेगळा विचार करतात आणि वेगवेगळा विचार करायला भाग पडतात. त्याचं कारण आहे भारतातील भारतात असलेलं स्वातंत्र्य. इथं कलम एकोणवीस ते बावीस अंतर्गत वेगवेगळ्या स्वरुपाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. इथं बोलता येतं. मुक्त विहार करता येतं आणि त्यातच कोणालाही निवडणुकीत उभंही राहता येत असतं.
निवडणुकीबाबत सांगायचं झाल्यास देशात कुणीही उभा राहतो. जो निवडूनच येत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यानं ही प्रवृत्ती. तसं पाहिल्यास त्या व्यक्तीनं निवडणुकीत उभे राहण्याऐवजी देशातील निवडणुकीत उभे असलेल्या दोन किंवा तीन राजकीय पक्षास समर्थन जाहीर केल्यास काय हरकत होईल? यातून देशातीलच जनतेचा पैसा वाचेल व तो देशातीलच विकासाच्या कामात येवू शकेल. याबाबतीतील विचार कोणीच करीत नाहीत. उलट निवडणुकीत बहुसंख्य प्रमाणात उभं राहून लोकांचाच कररुपात गोळा झालेला पैसा खर्च करीत असतात आणि जनता जनार्दनावर निवडणूक संदर्भात कामाचा ताण निर्माण करीत असतात.
देशाबाबत सांगायचं झाल्यास देशात जाती जशा जास्त आहेत. तसेच धर्म व पंथ. तसेच वेगवेगळ्या विचारांचे राजकीय पक्षही आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या विचारानुसार अनेक स्वरुपाचे राजकीय पक्षही आहेत. काही पक्षांच्या विचारात तर तारतम्यच जुळत नाहीत. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती यानुसार कितीतरी लोकं आज निवडणुकीत उभे राहात असतात. काही लोकं असेही उभे राहात असतात की त्यांना पक्कं माहीत असतं की ते निवडणुकीत निवडूनच येत नाहीत. तरीही ते निवडणुकीत उभे राहतात. त्याचं कारणही त्यांनाच माहीत असतं.
निवडणुकीबाबत सांगायचं झाल्यास निवडणुकीत कुणालाही उभे राहण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक माणसानंच निवडणुकीत उभे राहावे की जे पक्ष यापुर्वीही निवडून आले नाही वा येणार नाही. तरीही आपापलं नशीब प्रत्येकजण आजमावत असतात. कारण असतं, एकदा का निवडून आलं की पेन्शन सुरु होणं वा भ्रष्टाचार करुन आपल्या भावीपिढीसाठी अतोनात पैसा कमवता येणं. या निवडणुकीत जेही उभे राहतात, त्या प्रत्येक माणसाचं ध्येयधोरण वेगवेगळं असतं.
निवडणुकीबाबत सांगायचं झाल्यास भारतातील या निवडणुकीत वरच्या स्तरावर तीनच पक्ष असावेत. दोन पक्ष दोन विचाराचे व तिसरा पक्ष त्या दोन पक्षाचा विचार न पटणारा. याचा फायदाही होवू शकतो देशाला. तो म्हणजे देशातील निवडणुकीला खर्च होणारा पैसा वाचवता येवू शकतो. जो जनतेचा पैसा असतो. जो जनतेच्या करातून मिळत असतो. ज्या पैशातून देशाचा विकास करता येतो. ज्या पैशातून देशातील तरुणांना रोजगार देता येवू शकतो. ज्या पैशातून देशातील भुक्या माणसांची भूक भागवता येवू शकते. शिवाय कामाचा ताणही कमी करता येवू शकतो.
कामाचा ताण? कामाचा ताण असं म्हटल्यास कुणालाही आतिशयोक्ती वाटेल. परंतु कामाचा ताण असतोच. तो ताण असतो सरकारी कर्मचाऱ्यांवर. बिचाऱ्या कर्मचारी वर्गाला तेवढ्या निवडणुकीत उभे राहणाऱ्या लोकांच्या प्रचारावर लक्ष द्यावं लागतं. शिवाय त्याला निवडणूक निरपेक्ष पार पडावी म्हणून अतिशय दक्ष राहावं लागतं. काहीबाही बोलतात येत नाही. शिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन देता येत नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकांच्या प्रचारात जाता येत नाही. तसं पाहिल्यास मतदानाची इच्छा असूनही काहींना मतदान करता येत नाही. शिवाय मशीन यंत्रात जास्त उमेदवार असल्यास जास्त एकापेक्षा जास्त कन्ट्रोल युनीट वापरावे लागतात. ती मतं मोजतांनाही अडचण येतेच. प्रत्येकाची मतं मोजावी लागतात. त्यातच जर दोनच पक्ष असले वा तीन पक्ष असले तर त्याच्या मतमोजणीची प्रक्रियाही व्यवस्थीत पार पाडता येवू शकते. उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्याच घरातील देता येईल. आपल्या घरात जास्त मुलं असली तर एकाला शर्ट मिळतं तर दुसऱ्याला निकर. शिवाय खाण्यापिण्यातही वांदेच असतात. शिक्षणाच्या बाबतीतही सांगायचं झाल्यास नीट शिक्षणही शिकवता येत नाही. त्याच स्तरावर दुसरी बाजू अशी असते की त्याच घरात एक किंवा दोनच अपत्ये असल्यास त्यांना व्यवस्थीत शिक्षण देता येतं. व्यवस्थीत कपडेही वापरता येतात. व्यवस्थीत जेवणाखाण्याची सोय पुरवता येवू शकते.
महत्वाचं सांगायचं म्हणजे अनेक पक्षापेक्षा दोन किंवा तीन पक्षातील उमेदवारांच्या निवडीतून लोकांच्या विचाराला न्याय मिळवून देता येवू शकतो. मग हा विचार येतो की देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्तीला वा व्यक्तीसमुदायाला राजकीय पक्ष वा संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे. मग त्याचा उपयोग काय? याबाबतीत सांगायचं झाल्यास व्यक्ती तेवढ्या प्रवृत्तीनुसार लोकांना अनेक राजकीय संघटना स्थापन कराव्यात. व्यक्तीगणिक संघटना असाव्यात. परंतु त्या संघटनांनी आवडीनं अस्तित्वात असलेल्या दोन किंवा तीन राजकीय पक्षांना समर्थन द्यावं. उगाच आपण निवडून येवू शकत नसल्याची खात्री असल्यानं विनाकारण देशाच्या राजकारणात उभं राहून देशातील लोकांचा पैसा खर्च करु नये. जो लोकांच्या मालमत्तेतून वा खिशातूनच कराच्या रुपात गोळा होतो. जो वाचला की देशाच्या कामात येवू शकतो. हे तेवढंच खरं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून निवडणुकीत प्रत्येक व्यक्तीनं उभं राहून अनागोंदीपणा वा स्वैराचार माजवू नये. कारण स्वातंत्र्याचा अर्थ एकदम मुक्त वा स्वैराचारी स्वातंत्र्य होत नाही. जसं स्वातंत्र्य आहे, म्हणून आपण कुणाचाही खुन करीत नाही. तसंच स्वातंत्र्य निवडणुकीतही पाळावं. स्वातंत्र्य आहे म्हणून प्रत्येकांनी उभं राहू नये वा जनतेचा पैसा विनाकारण खर्च करु नये तर समर्थन द्यावं. तसंच एक दोन वा तीनच पक्षाच्या लोकांनी उभं राहावं. तसं पाहिल्यास समर्थन हे कुणालाही देता येतं व आपलं मत व्यक्त करता येतं यात शंका नाही.
निवडणुकीचं महत्व लक्षात घेता निवडणूक ही निरपेक्ष व्हावी. लोकांनी कोणत्याही राजकीय पक्षाची बळी न बनता फक्त नि फक्त आपल्या मनात विचार करावा. जो आपल्या नाही तर देशाच्या कामात येवू शकत असेल, त्यालाच मतदान करावं. स्वार्थ नसावाच मनात. कारण स्वार्थानं निवडणूक तर जिंकता येईल. परंतु त्यानं देशाचा विकास करता येणार नाही. देशाची प्रगती खुंटेल. जी प्रगती देशविकासाला हानीकारक ठरेल. उमेदवारांनीही निवडून आल्यानंतर आपलाच स्वार्थ पाहू नये. निवडून आल्यानंतर देशातील जनतेचा व देशाच्या विकासाचा विचार करावा. कारण कोणताच व्यक्ती हा मरण पावताच काहीही नेत नाही. ते सगळं जागच्या जाग्यावरच राहातं. आपल्याला लागते साडे पाच फुट जागा. तिही तीन महिन्यानं दुसऱ्याचीच होते. नाहीतर एक प्रेत जाळण्यासाठी ओटा. तोही दुसऱ्या दिवशी दुसऱ्याचाच होतो. राखही अस्तित्वात राहात नाही. तिही दुसऱ्याच दिवशी नदीच्या पाण्यात मिसळून जाते. त्यानंतर कोणताही आपल्यामागे उरणारा आपला वंशज आपल्या जमविलेल्या मालमत्तेनुसार आपलं नाव घेत नाही. मग कुणासाठी जमवायचं? त्या आपल्या स्वार्थप्रेरीत लेकरांसाठी की आपल्यासाठी? याचा विचार नेत्यांनीही निवडून आल्यानंतर करावा. शिवाय नेत्यांनी निवडणुकीत निवडून आल्यानंतर या गोरगरीब जनतेसाठी वा त्यांच्या हितासाठी मुक्त हस्तानं खर्च करावा. वेळ, योजना, सेवा आणि पैसाही. जेणेकरुन जनता नेते मरण पावल्यानंतरही त्यांचं नाव घेईल वा त्यांची ऋणी राहील नव्हे तर ऋणी असल्याबाबत पदोपदी ऋण व्यक्त करेल. परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी तुर्तास सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे. सर्वांनी मतदान करावं म्हणजे झालं. हेही तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०