Mala Space havi parv 1 - 50 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५०

Featured Books
Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५०

मला स्पेस हवी पर्व १ भाग ५०

मागील भागात आपण बघितलं की नेहा सगळ्या गोष्टींना कंटाळलेली आहे आता यापुढे काय होईल हे आपण वाचूया

सहा महिन्यानंतर आज आपण काय घडतंय हे बघूया

सुधीर सहा महिन्यांमध्ये सतत नेहाशी बोलायचं प्रयत्न करत होता. जसं निशांत आणि नितीनने त्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे तो तिला म्हणत होता की
“आपण कुठेतरी जाऊया जेणेकरून तुला जो ताण आलेला आहे तो जाईल.

पण नेहा काही त्याला रिस्पॉन्स देत नव्हती या कारणामुळे सुधीरला खूपच टेन्शन यायचं एक दिवस संध्याकाळी नेहा आईकडे गेलेली होती त्यावेळी सुधीरची आई सुधीरशी बोलली,

“सुधीर किती महिने मी बघते आहे नेहाचं काहीतरी बिनसलय. काय बिनसलं रे ?तुला काही बोलली का ती?”

“नाही आई मी खूप तिला विचारलं पण ती काहीच बोलत नाही.”
असं कसं काय झालं असेल तिला ?”

“ती एकदा म्हणाली की तिला आता सगळ्याचा कंटाळा आलेला आहे. प्रियंकाच्या आजारपणात ती खूप दमली हे मला कळतंय पण सगळ्यात जास्त ती कंटाळली आहे त्या नातेवाईकांमुळे. तिला त्या दांभिकपणाच्या वागणुकीने खूप चिड आली आहे.त्यामुळे ती म्हणते की मला आता सगळ्यातला इंटरेस्ट केलेला आहे.”

“सुधीर हे असं तिचं वागणं बरोबर नाही. वेळीच तिच्याकडे पूर्ण लक्ष दे. जर का ती पूर्णपणे याच्यातून बाहेर आली तर कठीण होईल रे? तुमचा संसार कसा होईल?”

“ आई मला निशांत आणि नितीन दोघांनी म्हटलं होतं की तिला एकटीला कुठेतरी बाहेर घेऊन जा प्रियंका आजारी पडली तेव्हापासून ती घरातच आहे त्यामुळे त्या वातावरणापासून तिला जरा बाहेर घेऊन जा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जिथे तिचा मूड पुन्हा ठीक होईल आणि ऋषीला मात्र घेऊन जाऊ नको. नाही तर तिचा तिथेही सगळा वेळ ऋषींमध्ये जाईल. तुम्ही दोघंच जा असं समजा की तुम्ही हनिमूनला आलाय तिचा मूड पुन्हा तसा होण्यासाठी तुला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील असं मला दोघेही स्पष्ट म्हणाले.”

“हो रे बरोबर आहे त्यांचं म्हणणं. खरंच ती खूप कंटाळली असेल, थकली असेल अरे लग्न होऊन या घरात आली म्हणून तिचा आणि प्रियंकाचा संबंध आला.
प्रियंका माझी पोटची मुलगी आहे त्यामुळे तिच्या आजारपणात आणि तिच्या जाण्यानंतर जे काही वातावरण तयार झालं त्याला मी सहन करू शकले. नेहाचा उगीचच या सगळ्यात बळी जातोय असं मला वाटतं. तू खरंच तिला एकटीच बाहेर घेऊन जा. ऋषी तिच्या माहेरी चांगला राहतो आणि तिच्या माहेरचे लोकही चांगले समजूतदार आहेत. ते या सगळ्या मागचं कारण नीट समजून घेतील आणि ऋषीला सांभाळतील. पण बेटा तू खरच वेळेवरी सगळं सावरून घे. हे जर सगळं अवघड परिस्थितीत येऊन बसलं तर मग सावरणं कठीण होईल.”

“बरोबर बोलतेस आई. मी पुन्हा एकदा शांतपणे नेहाला विचारतो.”

“ सुधीर तू असं का नाही करत. तू ऑफिस मधून तिला बाहेरच परस्पर भेट आणि बाहेरच जरा दोघजण जेवायला जा. तिथे तिला विचार. ती काय म्हणते ते ऐक. तिचे पण काही विचार असतील. तिला काय वाटतंय ते तिचं सांगणं नीट ऐकून घे आणि समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुला न पटणाऱ्या गोष्टीबद्दल जर ती काही बोलली तर त्याचा राग वाटून काही बोलू नकोस. अरे बायकांचं मन समजून घ्यायला पुरूषांनी तेवढंच नाजूक मन ठेवावं लागतं. खूप नाजूक मन असतं रे स्त्रीचं. घरासाठी ती सगळं काही करत असते, तिच्या मनात घराविषयी,घरातल्या लोकांविषयी खूप आपलेपणा असतो पण जर ती कंटाळली ना तर मग तिच्या दृष्टीने काहीही महत्त्वाचा राहत नाही. या सगळ्या गोष्टीतून तिला परत आणायचं असेल तर तुला खूप नाजूकपणे ही गोष्ट हाताळावी लागेल. अरे सुधीर मी आईये प्रियंकाची पण मी एक स्त्री पण आहे.एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला जाणून घेऊ शकते. म्हणून तुला सांगते तू तिच्याबरोबर बाहेर जा जेवताना गप्पा मार आणि तिला विचार आणि तिच्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जा. तू कुठे भाडं कमी लागतय, कुठे पैसा कमी खर्च होतोय तिथे जाण्याचा विचार करू नको. कारण इथला जो खर्च आहे ती तुझी इन्व्हेस्टमेंट आहे असं समज. तुझी बायको सगळ्यांपासून लांब जायला बघते आहे तिथून तिला परत आणायचं असेल तर हा खर्च तुला करावा लागेल. तुझ्या लक्षात येत आहे का मी काय म्हणतेय?”

“होय मला समजतंय. मी तसंच करेन मी आजच तिला विचारतो .”

“हे बघ ती घरी आली ना की या विषयावर बोलू नको. आता ती घरी यायची वेळ झाली आहे. तू ऑफिसमध्ये तिला फोन कर तिला विचार किंवा मेसेज द्वारे विचार जसं तुला कम्फर्टेबल वाटेल तसं. पण घरी हा विषय काढू नको. एवढेच तुला सांगते. ती कदाचित खुलून बोलणार नाही.”

“ठीक आहे लक्षात ठेवतो मी.”


हे दोघे बोलत असतानाच नेहा आली. नेहा ऋषीला घ्यायला तिच्या माहेरी गेली होती. आज जरा तिला मीटिंग होती आणि वेळ लागणार होता म्हणून सहजच तिने आईला विचारलं तर तिची आई म्हणाली,

“अगं ऋषीला आमच्याकडे ठेव विचारायचं काय त्यात? हे तुझं माहेर आहे आणि आम्ही पण खूप दिवस झाले ऋषीला भेटलो नाही. तू आणून ठेव.”

म्हणून ऑफिसला जाता जाता नेहाने ऋषीला तिच्या माहेरी सोडून दिलं होतं .आता त्याला आणायलाच तिच्या माहेरी गेली होती. ती आल्याबरोबर सुधीर आणि आई दोघांच्या गप्पा थांबल्या. आपण आलो तेव्हा हे दोघं काहीतरी बोलत होते याचा थोडा अंदाज नेहाला आला. पण ती काही बोलली नाही. ऋषी घरात शिरल्या शिरल्या सुधीरकडे धावला. तिने सुधीरकडे किंवा त्याच्या आईकडे जराही न बघता आपल्या खोलीत गेली. ही गोष्ट सुधीरच्या आईने सुधीरच्या लक्षात आणून दिली.

“ सुधीर काल पण नेहा अशीच वागली बर का. नेहा आल्या आल्या लगेच आपल्या खोलीत गेली. असं कधी आज पर्यंत घडलं नाही. ती आल्यावर माझ्याशी बोलल्याशिवाय कधीच आपल्या खोलीत गेली नाही. याचा अर्थ तिला आता कुणाशी बोलण्यातही इंटरेस्ट राहिलेला नाही असं मला वाटतंय. सुधीर जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर हा गुंता सोडवावा लागेल. घरातल्या घरात ही घुसमट तिला जितकी सहन करणं शक्य नाही तितकीच मलाही नाही. तुझं एक वेळ ठीक आहे पण बाबांना याने काही फरक पडणार नाही कारण त्यांचं विश्व वेगळे आहे. पण एक स्त्री म्हणून माझं आणि नेहाचा विश्व वेगळ आहे. आज पर्यंत ती मला प्रियंका पेक्षा वेगळी कधीच वाटली नाही. ती प्रियंका सारखीच माझ्याशी बोलायची. माझ्याशी हसतमुख राहायची मला वेगवेगळे प्रश्न विचारायची. प्रियंका आजारी पडली तेव्हा सुद्धा तिनेच मला खूप सावरलं. त्याची मी कधीच उतराई होऊ शकणार नाही.”


“हो आई तू म्हणतेस ना ते खरय. स्नेहाने खूप सहन केलं. मला वाटतं सगळ्यात जास्त तिची कोंडी झाली ते सगळे नातेवाईक आल्यानंतर. त्यामुळे ती जरा जास्ती चिडली आहे किंवा ती उदास झाली आहे असं वाटतंय.”
“ ती उदास झाली असेल म्हणूनच तिला त्यातून बाहेर आणायला आपण प्रयत्न करायला हवा. ती तुला तुला जास्त सांगेल आम्हाला नाही सांगणार. तुला मी काय म्हणतेय ते कळतय ना रे? खूप नाजूक गोष्ट आहे.”

यांच्या गप्पा ऋषी ऐकत होता. मध्येच ऋषीने विचारलं
“आजी तोनाला ग तंताला आलाय ?”

असं हे त्यानी विचारल्यावर सुधीरला आणि त्याच्या आईच्या लक्षात आलं की ऋषीला आता बरंच कळतं. आपण त्याच्यासमोर असं काही बोलून चालणार नाही. त्याबरोबर बाजू सावरून घेत सुधीरची आई म्हणाली,
“अरे कोणी नाही बाळा. तू कोणाला ओळखत नाहीस. सुधीर काहीतरी ऑफिस मधलं सांगतोय त्यावर आम्ही बोलतोय.”
“ हो या.”

असं म्हणून ऋषी तिथून खोलीमध्ये चालला गेला. तेव्हा सुधीरची आई म्हणाली,

“ सुधीर आता ऋषीला बरच कळायला लागलाय. ऋषीला पुढे तुमच्या दोघांमधला तणाव पण कळेल. तो त्याच्या बुद्धीनुसार याचा तर्क काढेल आणि तो विचारेल. तो विचारण्यापूर्वी तुमच्या मधला तणाव नाहीसा झाला पाहिजे बरं जर का ! तो तणाव त्याच्याशी जोडल्या गेला तर त्याचा स्वभाव बदलेल. तो एका वेगळ्याच घुसमटीत राहील आणि मुलांची घुसमट त्यांना सांगता येत नाही. म्हणून जितक्या लवकर नेहाचं वागणं बदलता येईल तेवढा बघ.”

“हो आई. खरच ऋषी आजकाल खूप प्रश्न विचारतो. त्याच्या प्रश्नांना उत्तर देता देता आमच्या दोघांची खूप दमछाक होते.”


“अरे सुधीर ऋषीचं वय अआहे हे प्रश्न विचारण्याचं. प्रत्येक गोष्टीत मुलांना उत्सुकता असते. त्यांना जी गोष्ट कळत नाही ती कळण्यासाठी ते शेवटपर्यंत चिवटपणे तुम्हाला प्रश्न विचारतात. जर तुम्ही दोघांनी वेडी वाकडी उत्तर दिले तर तेही त्यांना कळतं. म्हणून सांगते त्यानी आज खूप प्रश्न विचारण्यापूर्वी तू हा प्रश्न सोडवला ठीक आहे. बर आता नेहा घरी आली आहे जरा इतरच आवांतर तिच्याशी बोल. कळलं? मी पण माझ्या कामाला लागते आता सरस्वतीबाई येतीलच स्वयंपाकाला. त्यांच्या देखत या काही गोष्टी व्हायला नको आहे”

“ ठीक आहे.”

असं म्हणून सुधीर खोलीत निघून गेला. सुधीरची आई मात्र विचारा पडली. हे असं वेगळं संकट आपल्या घरावर का आलं? प्रियंकाच्या आजारपणाने आमच्या घरातला सगळा उत्साहच गेला पण तो परत आणण्यासाठी नेहानी खूप प्रयत्न केला. आमचं घर या संकटातून जेमतेम बाहेर पडतंय असं वाटत असतानाच नेहाचं असं वागणं हे वेगळ्या संकटाची नांदी वाटते. ही वादळापूर्वीची शांतता आहे का? असं नको व्हायला. या घराची अजून काही तोडमोड व्हायला नको. एक झाली आहे ती पुरेशी आहे. आयुष्यभर तो कोपरा रिकामाच राहणार आहे. कारण त्या घरची लेक होती. लेकीचं वास्तव्य लेकीचं अस्तित्व लेकीचं हसणं बोलणं तिचं वावरण हे सगळं हवाहवासच वाटतं

आईशी बोलल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच सुधीरने नेहाला ऑफिसमध्ये फोन केला.

“ हॅलो “

“नेहा सुधीर बोलतोय.”

“बोल ना. आता कसा काय फोन केलास?”

“घरी बोलता येणार नाही म्हणून ऑफिसमध्ये फोन केला.”

“घरी न बोलता येण्यासारखं काय विषय आहे?”

“ नेहा मला वाटतं की तू खूप सध्या तणावात आहेस हा तणाव आपल्याला काढायचा असेल तर आपण दोघेच कुठेतरी फिरायला जाऊया तिथे मनसोक्त एकमेकांच्या सहवासात राहूया.”

“हे वेगळं काय बोलतोयस तू ?”

“ हे बघ नेहा प्रियंकाच्या आजारपणापासून आत्तापर्यंत खूप वेगळ्या फेज मधूनं आपलं कुटुंब गेलय तू आमच्या तिघांना सावरण्याचा खूप आटोकाट प्रयत्न केलास आणि त्यामध्ये तू इतकी थकलीस की आता तुला पुन्हा उत्साहित करण्याची जबाबदारी माझी आहे. कारण मी तुझा लाईफ पार्टनर आहे.”

“एवढा विचार कधी करायला लागलास रे ?मध्यंतरी मला वाटलं की तू माझ्यापासून खूप लांब गेला आहेस.”

“ नाही. नेहा तुझ्यापासून मी लांब जाईन हेकसं शक्य होईल? प्रियांकाचं आजारपण हे आपल्याला इतकं वेगळ्या मनस्थितीत नेईल असं मला कधी वाटलंच नाही. ही जी सध्याची फेज आहे नेहा त्याचा तणाव तुझ्यावर आहे. वेळच्यावेळी या फेजमधून तुला बाहेर यायला हवं. जर उशीर झाला तर या तणावाची खूप मोठी गाठ तयार होईल आणि ती गाठ कापून टाकायला मग खूप कठीण होईल.”


“ सुधीर असं वेगळच काहीतरी मला न समजेलं असं बोलू नको. तुला काय म्हणायचे ते नीट सांग.”

नेहा सुधीरचा मुद्दा न कळल्याने असं म्हणाली.


“नेहा आपण कुठेतरी फिरायला जाऊ. कोणतं डेस्टिनेशन आहे तुझ्या मनात. तुला जे आवडतं त्या ठिकाणी जाऊया.”

“ मी अजून विचार नाही केला.”

“ मग विचार कर आणि ठरव.आपण तिथे जाऊया. तुला सुट्टी मिळणार नाही का?”

“सुट्टी तर माझी नाहीच आहे जास्ती बरीच सुट्टी प्रियंकाच्या आजारपणात खर्च झाली नंतर येणाऱ्या नातेवाईकांमध्ये झाली. मध्ये ऋषीच्या आजारपणात गेली आता राहिली ते यावर्षी जेवढी आहे तेवढीच.”


“ठीक आहे. तुझ्या जितक्या सुट्टी असतील तेवढ्या घे. नाहीतर विदाऊट पे वेळ घ्यायची असेल तर विदाऊट पे घे. तुझा तेवढा पगार कापल्या गेल्याने आपल्याला काही फरक पडत नाही. पण आपल्या मध्ये दोघांमध्ये पूर्वीसारखं नातं निर्माण व्हायचं असेल तर आपल्याला एकदा असंच बाहेर जायला हवं हे मात्र नक्की आहे. याचा तू विचार कर. आणि हे सगळं घरी ऋषी समोर बोलता येणार नव्हतं. ऋषीला तुझ्या आईकडे ठेवून आपण जायचंय.”

“ऋषीला ठेवून जायचं? इतके दिवस?”

“नेहा तिथेही तू‌ऋषीच्या मागे मागेच राहशील. मग आपल्याला दोघांना जो वेळ हवाय तो कसा मिळेल? तो वेळ हवा असेल तर ऋषीला तुझ्या आईकडे ठेवून जाणे योग्य आहे. ऋषी राहतो आणि तू ऋषीला का ठेवून जातेस हे जेव्हा कळेल तेव्हा मला नाही वाटत अक्षय प्रणाली तुझ्या आई बाबा कोणी याला विरोध करतील.”
‘विरोध नाही करणार पण मलाच कसंतरी होईल.”

“ हे बघ नेहा काहीतरी तुला सोडावं लागेल सध्या तू आई आहे हे विसरून जा आणि आपण हनिमूनला चाललोय हे लक्षात ठेव तेव्हा जसं आपण फिरलोय गप्पा मारल्या तसा आपण या वेळेला करू आणि आपल्या दोघांमधलं ताण घालवूनच परत येऊ. मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय. तू बोलशील की नाही गप्प का आहेस?”


“ मी गप्प नाही विचार करते. मग सांगते.”

‘ बर ठीक आहे तू विचार कर घरी आल्यावर मला सांग”

नेहा फोन ठेवते.ती स्वतः च्याच विचारात हरवते.
__________________________________