Adopt orphans too? in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | अनाथांनाही दत्तक घ्यावे?

Featured Books
Categories
Share

अनाथांनाही दत्तक घ्यावे?

दत्तक वारस नामंजूर:अनाथांनाही दत्तक घ्याहो

*अलिकडे काही लोकांची मानसिकता असते की दत्तक मुल घेतांना एवढे पैसे पडतात. एवढे पैसे अनाथ संस्थेंनी मागायला नको. परंतू का नाही मागायचे? तुम्ही त्या दत्तक वारसांना आयुष्यभर चांगलंच सांभाळाल. याचा का भरोसा. त्यामुळंच तसं लिहून घेतलं जातं. कारण हे जीवन आहे. या जीवनात कधी उतार चढाव येतोच. त्याची शिक्षा या अनाथ मुलांना भोगावी लागू नये. म्हणून हे प्रावधान. हे प्रावधान कठीण समयी दत्तक वारस नामंजूर करण्यासाठी नाही.*
"मी सुईच्या टोकावर मावेल एवढीही जमीन पांडवांना देणार नाही." अज्ञातवास पूर्ण करुन आलेल्या पांडवांना दुर्योधन म्हणाला. त्याचं क्रिष्णानं कारण विचारलं. तेव्हा दुर्योधन म्हणाला,
"ही माझ्याच काकांची मुलं असतील कशावरुन? माझ्या काकाला मुनी किंदमचा शाप होता की तो जेव्हा एखाद्या स्रिला स्पर्श करेल. त्यावेळीच तो मृत्यू पावेल. मग माझ्या काकाला मुलं झालीच कशी? ही माझ्या काकाची मुलं नाहीत. मग यांना हस्तीनापूरचं राज्य कसं देता येईल. अगदी सुईच्या टोकावरही मावेल एवढीही जमीन देता येणार नाही. प्रसंगी युद्ध करावं लागलं तरी चालेल."
दुर्योधनाचं तसं पाहिलं तर बरोबरच होतं. परंतू क्रिष्णाचं म्हणणं होतं की साधारण दत्तक घेतलेल्या मुलालाही राज्याचा अधिकार मिळतो. ही गोष्ट पुरातन काळापासून चालत आलेली आहे. त्रेता काळात याच अंग देशाचं राज्य राजा रोमपदानं आपली दत्तक कन्या शांताला दिली होती. मग आता हा काळ म्हणजे द्वापर काळ. याच काळात नियम कसा बदलवायचा. तसा क्रिष्ण म्हणाला,
"दुर्योधना, केवळ बोलण्यानं चालत नाही. इतिहास बघ. इतिहासात तू जे राज्य कर्णाला दान दिलंय ना. त्याच राज्याचा अधिपती राजा रोमपदनं आपलं राज्य आपली दत्तक पुत्री शांताला दिलं होतं. ही तर पांडवाची मुलं आहेत. कुंती सांगतेय ना. मुलं कोणाची हे एका मातेलाच माहित असतं. पुरूषांना नाही."
दुर्योधनानं ते सगळं ऐकलं. तसा तो म्हणाला,
"क्रिष्णा, मला ज्ञानाच्या गोष्टी शिकवू नकोस. उद्या माझी काकी गावातील मुलं गोळा करुन आणेल व मला म्हणेल की ही मुलं माझीच आहे तर मी कोणाकोणाला राज्य द्यायचं."
दुर्योधनाचं ते अक्राळ विक्राळ बोलणं. क्रिष्णाला वाटलं की या मुर्ख माणसाशी काहीही बोलण्यात अर्थ नाही. म्हणून तो चूप बसला व आल्यापावली निघून गेला.
अलिकडे दत्तक वारसालाही हक्कदार बनविण्याची तरतूूद संविधानात आहे. मुल दत्तक म्हणून घेतांना कायद्यानुसार ते मुल दत्तक देणा-या संस्था त्या दत्तक घेणा-या परिवारांकडून त्या मुलांना काय काय देणार. हे सगळं लिहून घेत असतात. कारण त्यांना भीती असते की पुढं जावून या परिवारांना त्यांचं स्वतःचं मुल झालं की त्यांचा स्वभाव बदलेल व ते त्या दत्तक वारसपुत्रांना काहीही देणार नाहीत. म्हणून हे प्रावधान. तसं स्वतःचं मुल झालंच की माणसांंचा स्वभाव बदलतो व ते त्या दत्तक मुलांना त्रास देवू लागतात. कारण ते मुल त्यांचं नसतं. त्यांच्या रक्ताचंही नसत.
आपण पारतंत्र्यात असतांना दत्तक वारस नामंजूर करीत इंग्रजांनी राज्यच्या राज्य खालसा केलीत. त्यांनी हाच दुर्योधनाचा नियम लावला. म्हणून अलिकडे हे सगळं कायद्यानुसार लिहून घेतलंं जातं.
यामध्ये मुख्य गोष्ट आहे. ती म्हणजे मुल अनाथ होणं. मुल अनाथ का होतं? त्याची बरीच कारणं आहेत. काही मुलांचे मायबाप अकाली निधन पावतात. अपघात, अकस्मात वैगेरे वैगेरे कारणांनी तर काहींचे मायबाप अफेअर करतात. त्यातून जेव्हा संतती जन्मास येते. तेव्हा ती संतती विवाहापुर्वीची असल्याने बदनामी होवू नये म्हणून बेवारस कुठंही अक्षरशः फेकली जाते. ही देखील मुलं अनाथ होतात आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे विवाह झाल्यानंतरही पती पत्नींचे खटके उडत असल्याने ते एकत्र राहात नाहीत. कधीकधी विवाहबाह्य संबंध ठेवून पळूनही जातात ते. अशीही मुलं अनाथ होतात. यामध्ये त्या मुलांचा दोष नसतो. अलिकडे काही लोकांना मुलं होत नाहीत. नशिबातच नसतात मुलं असं म्हणायला काही हरकत नाही. ती मंडळी मुलं अनाथालयातून दत्तक घेतात. मग कोणीतरी सांगतं की टेस्ट ट्यूब बेबी करा. मुल होईल.
अनाथालयातून घेतलेली मुलं. त्यानंतरच टेस्ट ट्यूब बेबीचा सल्ला. त्यानंतर समजा मुल जर झालं तर अशावेळी त्या अनाथ मुलांकडे दुर्लक्ष होतं. त्यांची हेळसांड होते. मग त्या अनाथ मुलानं जावं कुणाकडे? पाहावं कुणाकडे? हा प्रश्न उभा राहतो. म्हणून अनाथाश्रमं अशा दत्तक घेणा-या परिवारांकडून कायद्यानुसार त्याला सांभाळण्याचं परीपत्रक भरुन घेतात नव्हे तर काही मालमत्ताही त्याच्या नावावर लिहून घेतात. जेणेकरुन त्या मुलांना कोणीही केव्हाही दगा देणार नाही वा इंग्रजासारखी निती वापरून कोणीही दत्तक वारस नामंजूर म्हणणार नाही.
काही लोकं म्हणतात की अनाथ मुलं घेतो. परंतू जाचक अटी आहेत. कोण घेणार. त्यांना माझं म्हणणं हेच असेल की का विश्वास ठेवावा की तुम्ही त्या मुलाला तुमच्या संपूर्ण जीवनात प्रथमच स्थान द्याल? इथे आपल्याच जीवनाचा काही भरवसा नाही. तिथे ती अनाथ मुलं आहेत. आज तुमचे दिवस चांगले आहेत. उद्याही असतील असे नाही. त्या काळात मुलांनी कसं जगायचं. यासाठी हे प्रावधान. आपली साधारण स्वतःची मुलं असली की आपण आपल्याला सूख येवो की दुःख येवो, आपण त्यांना दुःखात ठेवत नाहीत. मग ही अनाथ मुलं झाली म्हणून काय झाले. तुम्हीच दत्तक घेतली ना. त्यानुसार ती तुमचीच मुलं झाली ना. मग ह्या देण्याघेण्याच्या व्यवहारात असा बदल आणि भेदभाव का?
प्रश्न मोठा भयावह आहे. अनाथ मुलं दत्तक घेतांनाही विचार. मोठा विचार. त्यांना सुख देतांनाही विचार. मोठा विचार.
महत्वपूर्ण गोष्ट सांगायची ही की कशाचीही किंतू परंतू मनात न ठेवता मुलं दत्तक घ्यावीत. त्याही मुलांना आपलीच मुलं समजावे. कारण अनाथ होण्यामागे त्या मुलांचा दोष नसतो. त्यांच्या मातापित्यांचा दोष असतो आणि प्रारब्धाचाही दोष असतो. त्याची शिक्षा त्या मुलांना देवू नये म्हणजे झालं. नाहीतर त्या इंग्रजात तसेच त्या दुर्योधनात आणि तुमच्यात काहीही फरक असणार नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०