Will the country really develop? in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | खरंच देशाचा विकास होईल काय

Featured Books
Categories
Share

खरंच देशाचा विकास होईल काय

*महत्वाचे नातेसंबंध व महत्वाचा पैसा*
खरंच देशाचा विकास शक्य आहे काय?

आजची परिस्थिती पाहता नातेसंबंध आणि पैसा जिथे आहे. तिथे नातेसंबंध आणि पैशाचा विजय होतो. त्यातूनच सक्षम व्यक्ती पदावर बसत नाही व कालांतरानं त्या संस्थेची वा देशाची अधोगती होते.
पुर्वी असेही काही राजे होवून गेले की त्या राजांच्या कारकिर्दीत त्या राज्यांची अधोगती झाली तर असेही काही राजे झाले की त्या राज्यांचा विकास झाला. त्यांनी शिक्षणासोबतच राज्याचा दर्जाही वाढवला. आजही नालंदा आणि तक्षशिलेचं नाव विचारात घेतलं जातं.
कारण त्या राज्यांची कारकिर्द. त्यांनी नातेवाईकांना जवळ केलं नव्हतं. परंतू काही राज्य बुडाले. कारण ते राजे नातेवाईक संबंध जोपासत त्यांच्यासोबत भोगविलासात रंगून जायचे नव्हे तर नशापाणी आणि द्यूतक्रिडा खेळत बसायचे. यातच शेजारी राज्य त्यांना असे पाहून त्यांच्यावर आक्रमण करायचे. त्यातच त्यांचा पराभव करुन ते,राज्य मांडलिक बनवलं जायचं.
आजही तीच परिस्थिती आहे. राजकारणात, राष्ट्रात आणि गल्लीगल्लीत. याबद्दल एक कथा सांगतो.
कथा अशी की ती एक शाळा होती. नातेवाईकांचा भरणा असलेली. त्या शाळेत एक संस्थाचालक होता व एक मुख्याध्यापक होता. तोही नातेवाईकच होता. तसेच ते दोघंही दुरदर्शी स्वभावाचे होते.
त्यांनी शाळेत शिक्षकांची भरती केली होती. त्यामध्ये काही शिक्षक नातेवाईक नसलेलेही होते. परंतू ते हुशार होते. त्यामानानं नातेवाईक तेवढे हुशार नव्हते.
संस्थाचालकानं शिक्षकांची भरती केली होती. परंतू ते शिक्षक त्याच्यापेक्षा वरचढ बनू नये म्हणून त्यांनी सर्वांचेच गोपनीय अहवाल रंगवले होते. तसेच सर्वांनाच बदनाम करुन ठेवलं होतं. त्यातच त्यांची वर्तणूक खराब करुन ठेवली होती. अशाच शाळेत एक शंकर नावाचाही शिक्षक होता. जो इमानदार व कर्तव्यपरायण होता.
शंकर इमानीइतबारे शाळेत जात असे व शाळेची सेवा करीत असे. तो हुशार होता. परंतू संस्थाचालकाला त्याच्याहीबद्दल वाटलं होतं की हा व्यक्ती पुढे आपल्यावर वरचढ होवू नये. म्हणून त्याचीही जाणूनबुजून वर्तणूक खराब केली होती.
काही दिवस गेले व काळ बदलला. बदलत्या काळानुसार नातेवाईक असलेला मुख्याध्यापक मरण पावला व नियमानुसार वरच्या जेष्ठ चार शिक्षकांनी मुख्याध्यापक पद नाकारल्यानं साहजीकच शंकरकडे ते पद आले व तो प्रभारी मुख्याध्यापक बनला.
शंकर प्रभारी मुख्याध्यापक बनला खरा. परंतू त्याला संस्थाचालकाचा विरोध होता. तो काही त्याला मुख्याध्यापक मानत नव्हता. त्यातच तो त्याच्याविरोधात कुरघोडी करीत होता. शेवटी तो न्यायालयात गेला व न्यायालयातील आदेशानुसार त्या शाळेतील सर्व शिक्षकांची शिक्षणाधिकारी साहेबासमोर सुनावणी लागली. सुनावणीला तो कुरघोडी संस्थाचालकही उपस्थीत होता.
तो कुरघोडी संस्थाचालक. त्यातच ते सर्व शिक्षक. शिक्षणाधिकारी महोदयानं एकएकाला विचारलं,
"आपण पद का घेत नाही?"
तो प्रश्न...... त्या प्रश्नावर सर्वांनी संस्थाचालकाचं कारण सांगीतलं व नकार दिला. त्यानंतर शंकरला विचारलं. तेव्हा शंकरनं त्यावर होकार दिला.
शंकरनं होकार दिला. ते नियमातही बसत होते. कारण तो त्यामानानं जेष्ठ शिक्षक होता. वरुन इमानदार आणि कर्तव्यदक्ष. परंतू तो काही संस्थाचालकाला पटत नसल्यानं त्याला शंकरबद्दल विचारताच त्यानं सर्रासपणे त्याची वर्तणूक अतिशय खराब असल्याचा दाखला दिला. जी वर्तणूक त्यानं व दिवंगत मुख्याध्यापकानं खराब केली होती. त्यावर शिक्षणाधिकारी साहेबानं ती बाब विचारात न घेता व त्या गोष्टीची प्रत्यक्ष शहानिशा न करता त्याच्यानंतरच्या संस्थालकाच्या नातेवाईकाला ते पद देवू केलं. तेव्हा संस्थाचालक आपोआपच मानला. परंतू ते शिक्षकांना मान्य नव्हते. शिक्षकांनी शिक्षणाधिकारी महोदयांनाही विनंती करीत म्हटलं की ते पद त्यांनाच द्या. जे त्या पदाच्या लायक आहेत. आम्ही त्या संस्थाचालकाच्या नातेवाईक असलेल्या व्यक्तीसोबत काम करु शकत नाहीत. परंतू त्यावरही शिक्षणाधिकारी मानला नाही. शेवटी पर्याय म्हणून नाईलाजानं शंकरपेक्षा जेष्ठ असलेल्या शिक्षकांनी ते पद घ्यावं असं ठरलं. परंतू त्यावर योग्य निर्णय न घेतला गेल्यानं ते पद शंकरनंतरच्या नातेवाईक अससेल्या शिक्षकांना गेलं व तिथंच सारं गणित चुकलं. त्या नातेवाईक पणानं व पैशानं आज पूर्ण शाळाच बुडीस निघाली होती.
महत्वाची बाब अशी की आज
अशी पदाची रस्सीखेच सुरु आहे. आजच्या काळात पदासाठी लायक व्यक्ती नको. फक्त नातेसंबंध हवा आणि पैसा. ज्यांच्याकडे पैसा अमाप आहे व जो जवळचा नातेवाईक आहे. त्यालाच पद मिळतं व त्यालाच नोकरीही मिळते. या पैशामुळे व नातेवाईक संबंधामुळे जवळचे दूर जातात नव्हे तर दूरचे जवळ येत असतात. शाळेतील संस्थाचालक हे दुरदर्शी स्वभावाचे असतात. ते संस्थाचालक आधीपासूनच मुख्याध्यापक पद पुढे कोणाला देता येवू शकेल. याची बांधणी करीत असतात. ते आधी शाळेत भरती होणा-या शिक्षकांना कनिष्ठ दाखवतात व जे नंतर शाळेत भरती होतात. ते जर नातेवाईक असले तर त्यांना जेष्ठ दाखवतात. तसेच जे मर्जीतील शिक्षक असतात. त्यांना सर्व वेतनाचे लाभ मिळतात व जे मर्जीत नसतात. त्यांना कोणतेच लाभ मिळत नाहीत. हा गोंधळ जर पाहिला तर कोणत्याच नोक-या कराव्याशा वाटत नाहीत. परंतू पर्याय नसल्यानं नाईलाजानं का होईना, नोक-या कराव्या लागतात. राजकारणातही असंच आहे. प्रतिपक्षाचा उमेदवार निवडून येवू नये म्हणून तो उमेदवार सक्षम आणि इमानदार असतांनाही त्याला जाणूनबुजून बदनाम केलं जातं. त्यातच जे उमेदवार सक्षम नसतात, ते निवडून येतात.
शंकरच्याबाबतीत असंच घडलं होतं. त्याचेवर अन्याय झाला होता. परंतू त्याला कोणताच न्याय मिळाला नाही. तो पुढे आपल्यावरील अन्यायाविरोधात न्यायालयातही गेला. परंतू तिथंही त्याला न्याय मिळाला नाही. शेवटी नातेसंबंधचाच विजय झाला आणि पैशाचाही. ज्या शाळेतील वर्गखोल्यातून उद्या चालून देशाचं नेतृत्व करणारं भवितव्य तयार होत असतं. त्याच शाळेतील विद्यार्थ्यांचं भवितव्य घडविण्यासाठी सक्षम असा मुख्याध्यापक हवा असतो. असा मुख्याध्यापक त्या शाळेला न मिळाल्याने ती शाळा बुडीस निघाली होती.
खरं तर देश असो, राज्य असो की गल्ली असो की संस्था. त्याला योग्य असा चालक मिळायला हवा. तसा जर चालक मिळत नसेल तर ते सरकार बुडतं. तो देशही नेस्तनाबूत होतो आणि ती शिक्षणसंस्थाही बुडते. त्यामुळं ज्या देशाला वाटतं की आमच्या देशाचा विकास व्हावा. त्यासाठी त्या देशानं आधी शाळेच्या वर्गखोल्यावर लक्ष द्यावं. त्या शाळेत योग्य व सक्षम मुख्याध्यापक बसवावा. तो संस्थाचालकाचा नातेवाईक नसावा. तरंच त्या शाळा विद्यार्थ्यांचे भवितव्य यथायोग्य बनवतील. विद्यार्थी सुधरतील. नेतृत्व सुधरेल. त्यासोबतच देशही सुधरेल. देशाचा विकास होईल. एवढंच नाही तर देश विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर जाईल हे तेवढंच खरं आहे. त्या शिक्षणसंस्थेची तक्षशिला व नालंदासारखी स्थिती होेणार नाही व त्या देशाचीही मगधसारखी स्थिती होणार नाही हेही तेवढेच खरे आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०