Uddhav Gita in Marathi Spiritual Stories by गिरीश books and stories PDF | उद्धव गीता

Featured Books
Categories
Share

उद्धव गीता

उद्धव गीता.
उद्धव हे श्रीकृष्णांचा लहानपणापासूनचे मित्र व चुलत भाऊ होते. त्यानी भगवानांकडून कोणतीही अपेक्षा, मागणी केली नाही. भगवान गोलोकाला जाण्यास निघाले तेव्हा ते उद्धवाना म्हणाले तू आजपर्यंत कधीच काही मागितलं नाहीस , मी तुला काही तरी देऊ इच्छितो तुला हवे ते माग , ते तुला देऊन मला समाधान वाटेल.
उद्धवानी स्वतःसाठी काही मागितले नाही पण श्रीकृष्णाच्या काही उपदेश व कृतींबद्दल त्यांच्या मनात शंका होत्या.
उद्धव म्हणाले, मला महाभारतातील घटनांमधील काही गोष्टींचा उलगडा झालेला नाही. तुम्ही केलेले उपदेश व तुमचे व्यक्तिगत जीवन यामध्ये मला काही गोष्टी लक्षात आल्या नाहीत त्यांचे उत्तर देऊन माझ्या ज्ञानात भर टाकाल का?. श्रीकृष्ण म्हणाले मी अर्जुनाला केलेला उपदेश भगवद् गीता म्हणून ओळखला जातो. तुझ्या बरोबर चा संवाद उद्धव गीता म्हणून ओळखला जाईल. तू तुझे प्रश्न निःसंकोचपणे पणे विचार , मी त्यासाठीच तुला ही संधी दिली आहे.
उद्धवानी पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे खरा मित्र कोण ? श्रीकृष्ण म्हणाले जो न मागताही आवश्यकता असेल तेव्हा मदत करतो तो खरा मित्र. उद्वव म्हणाले, पांडव तर आपल्याला बंधु मानत असतं व त्यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास होता. आपल्याला वर्तमान, भुत, भविष्याचे पूर्ण ज्ञान आहे. आपण महान ज्ञानी आहात, असे असूनही आपण युधिष्ठिराला द्युत खेळण्यापासून थांबवले नाही, थांबवले नाही ते एक ठिक पण आपण त्याला सर्व हारण्यापासून थांबवू शकला असतात.
जेव्हा द्रौपदीला पणाला लावण्यास दुर्योधनाने युधिष्ठिराला उद्युक्त केले तेव्हा आपल्या दिव्य शक्तिचा वापर करून फासे युधिष्ठिराच्या बाजूने पाडले असते तर? आपण तेंव्हाच पुढे आलात जेव्हा द्रौपदीच्या शील रक्षणाचा प्रश्न उभा राहिला व तेव्हा तीला वस्र देऊन तीला वाचवल्याचा दावा केला. उद्धव म्हणाले, आपण संकटात मदत कां केली नाही. हाच धर्म आहे कां?.
श्रीकृष्ण म्हणाले, विवेकाचा विजय होत असतो. धर्मराज विवेक सोडून लागल्यामुळे पराजित झाला. दुर्योधनाकडे द्यूत खेळण्यासाठी धन विपुल प्रमाणात होते पण त्याला खेळ येत नव्हता म्हणून त्याने त्या कामासाठी शकुनिमामांची निवड केली. धर्मराजाने पण असाच विचार करून पांडवांच्या बाजूने मी खेळणार [श्रीकृष्ण खेळतील ) असे सांगितले
असते तर फासे कुणाच्या बाजुने पडले असते?.
धर्मराजाला द्यूत मला न सांगता खेळायचे होते, त्याने मला सभागृहात बोलावल्याशिवाय येऊ नये असे सांगितले, मी वाट पहात होतो पण सर्व भाऊ मला विसरले, दुःशासन द्रौपदीला घेऊन आल्यावर मला बोलावले तेव्हा मी लगेच आलो.
उद्धव म्हणाले, म्हणजेच तुम्ही संकटात असलेल्या भक्ताला त्याने बोलावले तर मदत करणार.
श्रीकृष्ण म्हणाले, सगळ्यांचे जीवन कर्मफलावर आधारित आहे, मी ते चालवत नाही, त्यात हस्तक्षेप करित नाही, तुम्ही काय करित आहात ते पाहतो..
उद्धव म्हणाले, म्हणजे आम्ही पापे करित असता तुम्ही पाहणार व भोगायला लावणार. श्रीकृष्ण म्हणाले, तुला जेव्हा माहित असेल व विश्वास असेल की मी तुझ्या जवळ आहे तेव्हा तूं चुकीचे काही करणारच नाहीस. जेव्हा तुम्हाला असे वाटते की, मला न कळता तुम्ही काही करू शकता तेव्हा तुम्ही संकटात सापडता. धर्मराजाला वाटले की तो माझ्यापासून लपवून द्यूत खेळू शकेल तेव्हाच तो संकटात सापडला, मी त्याच्याजवळ साक्षीरूपात आहे असे समजून वागला असता तर चित्र वेगळे दिसले असते.उद्धव म्हणाले की, किती सुंदर विवेचन आहे. प्रार्थना करून बोलावणे ही एक भावना आहे पण आपण जेव्हा ईश्र्वरी इच्छेशिवाय पानही हलत नाही असा विश्वास ठेवून साक्षीभाव ठेवतो तेव्हा आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवते.
ईश्वर आहे आणि त्याच्या इच्छेनुसार सर्व घडते आपण निमित्त मात्र आहोत. तो सर्व काही पाहतो आहे, आपण करत असलेलं प्रत्येक कृत्य त्याच्या साक्षीने होत आहे असे लक्षात ठेवले पाहिजे.
जय श्रीकृष्ण