Sanjivan in Marathi Short Stories by Anjali J books and stories PDF | संजीवन

Featured Books
Categories
Share

संजीवन

' स्वीट जंक्शन ' मधून केशरी पेढ्यांचा बाॕक्स घेतला आणि आभा शिरीन मॕमकडे निघाली. नंदिता प्रशांत तिला थेट दादर स्टेशनवर भेटणार होते. तिथून सिंहगड एक्सप्रेसने ते चौघेही पुण्यातल्या प्रयोगासाठी निघाले होते. जायच्या आधी मॕमना भेटून आशिर्वाद घेणं तिच्यासाठी महत्वाचं होतं. मॕमच्या क्लिनीकमधे येऊन ती बसली. आतमधे कोणी क्लायंट होता. आता कमीत कमी चाळीस मिनीटांची निश्चिंती. ती बाहेरच्या वेटींग हाॕलमधे वाट पहात बसली. वर्षभरापूर्वी आपणही तर त्यांच्या क्लायंटच होतो की, तिच्या मनात विचार आला. मागे वळून पाहीलं तर या वर्षात आपले पाय चांगलेच स्थिरावलेत. याचं पूर्ण श्रेय मात्र तिला शिरीन मॕमनाच द्यायचं होतं. त्यांनी सावरले नसते तर निराशेच्या खोल गर्तेत आपण कुठे हरवून गेलो असतो कोण जाणे. त्या दिवसांचीआठवण आली आणि झरकन तिच्या डोळ्यासमोर तिचं गाव उभं राहीलं.


सांगलीजवळचे भिलवडी हे तिचं गाव. गावातून कृष्णा नदी वाहत होती. जवळच दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर होते. अनेकदा आभा मैत्रीणींबरोबर चालत औदुंबरला जायची. दत्ताचं दर्शन घ्यायचं आणि मग कृष्णेच्या भव्य घाटावर पाण्याकडे पहात बसायचं किंवा नावेने पल्याड जाऊन देवीचं दर्शन घेऊन यायचं हे तिचं फार आवडीचं काम.वडील चितळ्यांच्या कारखान्यात कामाला होते. खाऊन पिऊन सुखी कुटुंब होतं तिचं. एकुलती एक असल्याने जरा लाडकीच होती ती दोघांची. आईपण दिवसातले चारपाच तास चितळे वहिनींनी सुरु केलेल्या बचतगटात जायची. आभाला लहानपणीपासूनच अभिनयाची आवड. शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धेतही कायम पहिला नंबर असायचा तिचा. तिचे हे गुण पाहून प्रभुणेबाईंनी तिला स्नेहसंमेलनातल्या नाटकात काम दिलं. ते करताना तिला खूप मजा वाटलेली. तेव्हापासून दर वर्षी तिचा नाटकातला सहभाग निश्चित झाला. ती नववीत असताना तिच्या शाळेने आंतरशालेय संस्कृत नाटक स्पर्धेत भाग घेतला. त्यात एकच प्याला नाटकातील एक प्रवेश सादर करायचा होता. प्रभुणे बाईंनी विश्वासाने तिला सिंधुचे काम दिले. त्या वर्षी उत्कृष्ट अभिनयाचे पहिले बक्षीस तिला मिळाले . ती नमस्कार करायला गेली तेव्हा प्रभुणे बाई तिला म्हणाल्या ," आभा, खूप सुंदर अभिनय केलास. संस्कृत भाषेचं पाठांतर आणि चेहर्यावरचे हावभाव दोन्ही एका वेळेस निभावणं अवघडच. हे शिवधनुष्य छान पेललंस . शाब्बास. खूप मोठी हो, माझे आशिर्वाद आहेत तुला बाळा,". दहावीचं वर्ष मात्रं नाटकाविना गेलं. या वर्षी खूप अभ्यास करायचा, नाटकबिटक काही नाही अशी बाबांनी तंबी दिली होती. ऐंशी टक्के मार्क मिळवून तिने सांगलीत विलींग्डन काॕलेजला प्रवेश घेतला. या काॕलेजला प्रवेश घेण्यामागे त्यांचं दरवर्षी नाट्यस्पर्धेतलं यश हे मुख्य कारण ही होतंच. विज्ञान शाखेत शिकत असताना अभिनयाची आवड असल्याने नाटकासाठी तिने आपले नाव नोंदवले. पहिल्याच प्रयत्नात तिची निवड झाली. आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत अभिनयाचं दुसरं बक्षीस तिने पहिल्याच वर्षी मिळवलं. पुरुषोत्तम करंडक या मानाच्या स्पर्धेसाठी त्यांच्या नाटकाची निवड झाली. यासाठी तासनतास चालणार्या तालमींमधे ती रमून जात असे.नवीन मित्रमैत्रीणी मिळाल्या होत्या. त्यांच्यबरोबर नाटकातले संवाद, उतारे यांची प्रॕक्टीस करताना खाण्यापिण्याची शुध्दही तिला रहात नसे. पुण्यात त्यांना बक्षीस मिळालं नाही पण या निमीत्ताने या क्षेत्रात आपण किती पाण्यात उभे आहोत हे सर्वांच्याच लक्षात आले. त्यानंतरही प्रत्येक वर्षी अभिनयाचे पारीतोषिक तिलाच मिळत होतं.तोपर्यंत अभिनयातच करीयर करायचं हे तिने मनाशी पक्के ठरवलं. पुढे महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धाही तिने गाजवली. त्यानिमीत्ताने मुंबई ला जायची संधी तिला मिळाली. पहिल्याच भेटीत मुंबई तिला खूप आवडून गेली.. आपलं स्वप्नं पुरं करायचं असेल तर इथेच यायला हवं ही खुणगाठ तिने मनाशी बांधली. सलग दुसर्या वर्षी अभिनयाचं बक्षीस सिनेसृष्टीतील प्रतिथयश दिग्दर्शकाकडून घेताना तिचं अंग थरथर कापत होतं .बक्षीस देताना ते म्हणाले," उत्कृष्ट अभिनय करतेस. ऐकलं होतं मी तुझ्याबद्दल पण आज प्रत्यक्ष पाहीलं तुला अभिनय करताना. मुंबईला ये, खूप संधी मिळतील, माझ्याशी संपर्क कर आलीस की". हे ऐकून आभा नाचायचीच राहीली होती. शिक्षण पूर्ण झालं की मुंबईत जाऊन अभिनयक्षेत्रात नाव कमवणं हेच आता तिचं लक्ष्य बनलं.

विज्ञानशाखेतली पदवी मिळाली आणि तिची मुंबई ला जायची तयारी सुरु झाली. इतके दिवस आईबाबांनी नाटकात काम करण्यासाठी कसलीही आडकाठी केली नव्हती. पण आता मात्रं ते विरोध करु लागले. पण आभा ऐकायला तयार नव्हती. तिचे बाबा तिला म्हणाले,
" आभा, एवढया मोठ्या शहरात कशी राहणारेस तु? अगं , तुझा काय निभाव लागणार तिकडे. हे आपल्यासारख्यांचं काम नाही . तिथं जायचं असेल तर पैसा किंवा ओळख दोन्हीपैकी एक काहीतरी हवं. आपण पडलो मध्यमवर्गीय. शिवाय ते क्षेत्र चांगलं नाही पोरी. ऐक माझं, जाऊ नको". पण आभा कोणाचच ऐकायला तयार नव्हती.तिने जेवणखाण बंद केलं. आई बाबांना समोर बसवून ती म्हणाली,
" आई बाबा, मला मुंबईला जाऊ दे. हे क्षेत्र वाईट आहे असं म्हणताय तुम्ही, पण कुठलं क्षेत्रं चांगलं आहे? सगळं आपल्यावर असतं, आपण नीट राहीलो तर बाकीचेही नीट वागतात आपल्याशी. मला प्रयत्न तर करु दे".
आईला तयार करणं फारच अवघड गेलं तिला.एकच वर्ष राहून प्रयत्न करायचा, रोज फोनवर बोलायचं, मुंबईत जाऊन आधी २/३ महिने मावशीकडे रहायचं, वर्षात काही जमलं नाही तर परत यायचं आणि लग्नं करायचं या अटींवर तिला जायची परवानगी मिळाली. वर्षभर वडील पैसे पाठवणार हे मात्र तिला कबुल करावं लागलं. आईची एक चुलत बहीण मुंबईत होती. सुरवातीला तीन महिने अनुमावशीकडे रहायचं आणि मग वेगळी खोली घ्यायची असं ठरलं. या आधी स्पर्धेच्या निमीत्ताने ती अनेक वेळा मुंबई ला जाउन आली होती. वर्षभर जर काही जमलं नाही तर मात्र परत यायचं या अटीवरच तिला मुंबईत यायला मिळालं होतं .

मुंबईत तिची अनुमावशी गोरेगावला रहात होती. घरात अनुमावशी आणि काका असे दोघेच रहायचे. आभाला काही ओळखीचे दिग्दर्शक , अभिनेते यांचे नंबर तिच्या काॕलेजमधल्या सरांनी दिले होते. सांगलीहून तिच्या ग्रुपमधले तिघेजण आले होते.आल्याआल्यायाच तिने दिग्दर्शकांना फोन करायला सुरवात केली.ज्या उत्साहात तिने सुरवात केली तो हळूहळू अगदी महीनाभरातच ओसरायला लागला. बर्याच वेळा ," वो सेट पर है., अभी नही बात कर सकते, बाद में काॕल करो किंवा सर अभी आउटडोअर पर है " या सारखी उत्तरे मिळायची. ज्या दिग्दर्शकांच्या हस्ते तिला पुरस्कार मिळाला होता त्यांच्याशी तर तिचा संपर्कही होऊ शकला नव्हता. महिना म्हणता म्हणता मावशीकडे दोन महिने होऊन गेले. आभा सकाळी डबा घेऊन बाहेर पडायची. तिला परत यायला रात्र व्हायची. मावशी आणि काकांना याचा त्रास व्हायचा. इतका उशीर का होतो यायला असं सारखं विचारत रहायचे. कांदीवलीला माफक दरात एका सोसायटीमधे सांगलीच्याच मैत्रीणीसोबतची काॕट रिकामी होती. शेवटी तिने त्या रुमवर जायचा निर्णय घेतला. भिलवडीला आईला फोन करुन सांगीतलं. ती मैत्रीण , श्रुती दादरला नोकरी करत होती. श्रुतीही आईशी बोलली. मावशीकडून सामान तिने रुमवर आणून टाकलं. खोली जरा छोटी होती पण तिच्या बजेटमधे बसणारी होती. वडीलांकडे पैसे मागायला लागु नयेत म्हणून मग तिने आता स्वतःच प्राॕडक्शन हाउसमधे जायचा निर्णय घेतला. अनेक खेटे घालूनही काहीच उपयोग होत नव्हता. तिच्यासारख्याच या क्षेत्रात काम मिळावं म्हणून धडपडणार्या काही मुलींशी तिची ओळख झाली होती. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तिनेही आता आॕडीशन्स द्यायला सुरवात केली.मुंबईत रहायचं तर पैसा पाहीजे, पैसा हवा असेल तर सिरीयलमधे छोटीमोठी भुमिका करायला हवी. तिला वाटलं होतं तसं स्वतःच्या अभिनयसामर्थ्यावर भुमिका मिळत नव्हत्या , इथे काम मिळवायचं तर बक्षीसं नाही तर ओळख हवी हे या सहा महीन्यात तिच्या लक्षात येत चाललं होतं. एकदा एका आॕडीशनमधे ती निवडली गेली असं तिला प्राॕडक्शन हाउसने कळवलं आणि ती आनंदाने रडायलाच लागली. तिचा विश्वासच बसेना.भुमिकेबाबत सर्व ठरवण्याकरता दुसर्या दिवशी तिला त्यांच्या आॕफीसवर बोलवले होते.ती खूप उत्साहाने गेली तेव्हा त्या भुमिकेसाठी दुसर्या कोणाची तरी निवड झालेली समजलं .यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे तिला समजेना. निराश होऊन ती परतली. दोन दिवस कुठेच गेली नाही ती. तिसर्या दिवशीपासून परत जिद्दीने प्रयत्न करायला सुरवात केली. पण कुठेच काही जमेना. दोन ठिकाणी निवड झाली असं सांगीतलं पण नंतर या भुमिकेसाठी तुझं वजन जास्त आहे तर कधी वय जास्तं वाटतंय अशी कारणं दिली गेली.असं किती वेळा झालं हे मोजणं सोडून दिलं तिने. स्वतःच्या अभिनयसामर्थ्यावर विश्वास असणार्या तिचा आत्मविश्वास हळूहळू डळमळायला लागला, खच्चीकरण व्हायला लागलं. पैसे जास्त खर्च व्हायला नको म्हणून एका वेळेसच जेवायला तिने सुरवात केली. तिचं वजनही कमी व्हायला लागलं, चेहरा ओढल्यासारखा दिसायला लागला. मला काही जमतच नाहीये असं वाटायला लागलं. पण भिलवडीला परत जायचीही तिची इच्छा नव्हती. परत जाणं म्हणजे हार मानणं असं तिच्या मनाने घेतलं. काय करावं ते समजत नव्हतं. इतके हातपाय मारुनही काम मिळत नव्हतं. सांगली सोडून जवळजवळ आठ महिने झाले होते . ती इतकी निराश झाली की तिने आता बाहेर जाणं बंद करुन टाकलं. दिवसच्या दिवस अंथरुणात लोळत पडायची, सारखं रडायला यायचं. गेल्या चार दिवसात तर तिने घरीही फोन केला नव्हता. श्रुतीचं तिच्याकडे लक्ष होतं. आभाच्या आईचा तिला फोन आला तेव्हा ,
"मी आहे काकु, तुम्ही काळजी करु नका. तिला जरा ताप आहे म्हणून तुमच्याशी बोलू शकली नाही. मी तिला डाॕक्टरकडे नेऊन आणते. ती उद्या फोन करेल तुम्हाला",
असं सांगीतलं. संध्याकाळी ती आॕफीसमधून घरी आली आणि आभाजवळ जाउन बसली.
"काय होतंय आभा? बरं वाटत नाहीये का"
श्रुतीचे शब्द ऐकले आणि आभा तिच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडायला लागली. तिला शांत करत श्रुती म्हणाली,
"आभा एक सुचवू का. मला माहीतीये तुझ्या मनात खूप काही चालू आहे, ते तु कोणाशीच बोलू शकत नाहीयेस. शिरीन नावाच्या एक समुपदेशक आहेत त्यांची मदत तु घेऊ शकतेस. येतेस का माझ्याबरोबर त्यांच्याकडे?"
"मी काही वेडी नाहीये counsellor कडे जायला," आभा संतापाने म्हणाली.
" मी वेडी वाटतीया का तुला. अगं मी पण इथे आले तेव्हा एका मुलाने मला फसवलं, माझ्याकडचे पैसे काढून घेतले, प्रेमाचं नाटक केलं, मी तर पूर्ण तुटून गेले होते. तेव्हा
समुपदेशनासाठी त्यांच्याकडे गेले आणि पूर्ण बाहेर पडले यातून. तु विचार कर. त्यांच्या मदतीने तु यातून बाहेर पडु शकतेस. आत्ता शांतपणे झोप, आपण उद्या सकाळी बोलू."
दुसर्या दिवशी सकाळी आभा आपणहूनच श्रुतीकडे आली "कधी जायचं आपण शिरीन मॕमकडे"

शिरीन मॕमच्या क्लिनीकमधे तिला सोडून श्रुती आॕफीसला गेली. शिरीन मॕमच्या समोर आभा येऊन बसली . मॕमचा चेहरा खूप शांत व आश्वासक वाटला.
" काय नाव म्हणालीस? आभा, व्वा किती सुंदर नाव आहे. नावासारखीच दिसतीयेस..चमकदार."
मॕम प्रसन्न हसून म्हणाल्या. गेल्या कित्येक दिवसात स्वतःबद्दल चांगलं ऐकायची सवय नसलेली आभा अचानकपणे टेबलवर डोकं ठेवून रडायला लागली. तिला तसेच रडून दिल्यानंतर शिरीन मॕमने पाण्याचा ग्लास पुढे केला तेव्हा गटागट तिने ते पिऊन टाकलं. पुढचा तासभर ती नुसती बोलतच होती. मॕमने तिला दुसर्या दिवशी संध्याकाळची वेळ दिली. त्यांच्याकडून घरी परतताना आभा खूप शांत झाली होती. ती आईशी पण बोलली आणि कित्येक दिवसांनंतर शांत झोपली. काही सिटींग्जनंतर शिरीन मॕम तिला म्हणाल्या
"आभा माझ्याकडे यायचा निर्णय घेऊन अर्धी लढाई तु जिंकली आहेस.यायला अजून थोडा वेळ जरी लावला असतास ना तर कदाचित तुला नैराश्य आलं असतं. खरं तर समुपदेशकाची मदत घेणं म्हणजे एखाद्या आजारासाठी आपण डाॕक्टरकडे जातो ना इतकं सहज आहे. पण समुपदेशन मात्र डाॕक्टरांनी दिलेली गोळी घेतली आणि बरं वाटलं इतकं सोप्प नाही. थोडा वेळ लागतो पण समस्येचं पूर्ण निराकरण होतं. समस्या छोटी असो वा मोठी समुपदेशकाची मदत प्रत्येकाने घेतली पाहीजे. यामुळे खूप मोठा प्रश्न निर्माण व्हायच्या आधीच तो वेळेवर सुटतो.असो, तु मात्र योग्य निर्णय घेतला आहेस".

पुढच्या महिन्याभरात मॕमनी काही टास्क दिले, लिहायला सांगीतले तर उदासी दूर करण्याचे मार्ग, काही ट्रिक्स सांगीतल्या. आभा हळूहळू पूर्वपदावर येत होती. पहिल्यासारखाच उत्साह आता तिला जाणवत होता. आपल्याला अभिनय करायचाय हा निर्णय बरोबर आहे पण त्याकरता सिरीयल्स हा एकच मार्ग नाहीये हे शिरीन मॕमच्या मदतीने तिच्या लक्षात आलं. सिरीयलसाठी आपण योग्य नाही याचा अर्थ आपल्याला अभिनय येत नाही असा नाही हे तिच्या लक्षात आलं. तिने आपल्या सांगलीच्या इकडे आलेल्या तिघांशी परत एकदा संपर्क केला. त्यातले प्रशांत, नंदिता आणि संजय मुंबईतच होते. नाटक व अभिनयाची आवड असलेली पुण्याची प्रतिक्षाही त्यांच्याबरोबर जोडली गेली. नाटक या विषयात काहीतरी सगळे मिळून करायचं असं त्यांनी ठरवलं. अनेक चर्चा, त्यांच्या सांगलीच्या सरांशी विचारविनीमय केल्यावर त्यांनी एक नाट्यसंस्था ,अगदी छोट्या प्रमाणात, सुरु करण्याचा निर्णय घेतला. चांगल्या एकांकिका बसवून त्या लहान रंगमंचावर सादर करायच्या असं सर्वानुमते ठरलं.नेपथ्य, कपडे, ध्वनी यावर जास्त खर्च न करता दर्जेदार कथा उत्तम अभिनयाने लोकांपर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश ठेवायचा असं त्यांनी ठरवलं. यासाठी ' संजीवन ' हे नाव आभाने सुचवलं. ही एक अभिनव कल्पना होती आणि यासाठी भांडवलही जास्त लागणार नव्हतं. लहान रंगमंचामुळे कमी तिकीटात प्रेक्षकही जास्त मिळणार होते. ' संजीवन ' कडून कामाला सुरवात झाली. सुरवातीला काही एकांकिका आभाने लिहील्या.तालमींना सुरवात झाली. हळूहळू ह्या एकांकिका प्रसिध्द होऊ लागल्या . या तरुण मुलांच्या अभिनव कल्पनेची वर्तमानपत्रांनीही दखल घेतली. ' संजीवन' चे नाव प्रसिध्द होऊ लागले. त्यांच्या ' तडा ' या एकांकिकेचा एक प्रयोग पहायला दादा वाघ आले होते दादा वाघ म्हणजे प्रसिध्द नाट्यनिर्माते.प्रयोग संपल्यावर ते भेटायला आले. त्यांना सगळ्यांचा अभिनय आणि संकल्पना खूप आवडली होती. या एकांकिकेचं दोन अंकी नाटक बसवा, मी आर्थिक मदत करतो असं त्यांनी या चौघांना सांगीतलं तेव्हा काही क्षण तर त्यांचा विश्वासच बसेना. गेले तीन महिने दोन अंकी नाटक त्यांनी लिहून काढलं, दिवस रात्र त्याच्या तालमी केल्या आणि आता उद्या त्याचा पहिला प्रयोग बालगंधर्वला आहे. हे सगळं शक्य झालं शिरीन मॕममुळे. इतक्यात शिरीन मॕमने तिला आत बोलवले. पेढ्यांचा बाॕक्स घेउन आभा शिरीन मॕमच्या पाया पडली. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. शिरीन मॕम आनंदाने तिला म्हणाल्या ,
" तुझ्या स्वप्नांचा खरोखर वेध घेतलास आभा , जिंकलीस तु "
" नाही मॕम, तुम्ही मला ' संजीवन ' दिलंय...अगदी खर्या अर्थाने.."

@ अंजली जोगळेकर