Bhatkanti - Aathvanichya gard ranatali - 27 in Marathi Fiction Stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २७

Featured Books
Categories
Share

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २७

आजोबांचा वाडा .... आजोबा सांगत, वाड्या पुढे मोठे अंगण.... त्यात विविध प्रकारची झाडं... फुलझाडे, फळझाडे... होती तिथे झाडं... आजोबांच्या काळातली नसतील तरी अंगण आता झाडा-झुडुपांनी , वेलींनी भरलेलं होते. केवड्याचे एक मोठ्ठ झाडं होते. त्याचा सुगंध वातावरण मोहवून टाकत होता. वाडा तर नजरेत सामावत नव्हता. इतका मोठा. वाड्याचा दरवाजा लाकडी. तो तर कधीच नाहीसा झाला होता. राहिल्या होत्या त्या फक्त त्याच्या आठवणी. पूजासहित सर्वंच वाड्यात शिरले. वाड्याला वेलींचे मोठे जाळे... कुठून कुठून येऊन त्यांनी वाड्याला वेढले होते. भरीसभर पावसाने सुरुवात केली. पूजा पूर्ण वाडा फिरत होती. हाताने स्पर्श करत होती. वाड्यातल्या लाकडी वस्तू निसर्गात मिसळून गेल्या होत्या. आजोबांचा लोखंडी पाळणा दिसतं होता. तोही जीर्ण झालेला. काही लोखंडी कपाट , खुर्च्या... आपलं अस्तित्व टिकवून होत्या. आजोबांच्या आठवणींनी पूजाला भरून आलेलं. एका खिडकीपाशी उभी राहून डोळ्यातल्या आसवांना वाट मोकळी करून दिली तिने. कादंबरी पाहत होती तिला.


कादंबरी बाहेर व्हरांड्यात येऊन उभी राहिली. रिमझिम पाऊस.... हात बाहेर करून ओंजळीत झेलला पाऊस तिने. तिथून ... शेजारी ... समोर असलेल्या डोंगररांगा दिसत होत्या. त्यांची शिखरे ढगांत बुडून गेलेली. पांढरे शुभ्र झरे.... अगदी पांढरी शाल परिधान करून चार ऋषीमुनी ध्यानस्त बसलेले जणू. अंगणातल्या पायऱ्यांवर सुप्री एकटीच बसलेली. तिची नजर आकाशकडे लागून राहिलेले. आकाश त्या केवड्याच्या झाडाखाली बसून... पावसात भिजत होता. त्याच लक्ष त्या आभाळातून कोसळणाऱ्या पावसाकडे. अधून - मधून केवड्याची फुले... आकाशच्या अंगावर पडत होती. कादंबरी हे सर्व पाहत होती. तिलाही भरून आलं. आज किती भावना तिला समोर दिसतं होत्या. थोडावेळ आराम केला सर्वांनी. आकाश पूजाजवळ आला.
" काळजी घे निरू .... माझी निघायची वेळ झाली.... भेटू पुन्हा.... आडवळणावर... !! " पूजाने पुन्हा आकाशला मिठी मारली.
" डब्बू !! भेटत रहा असाच.... वाट बघीन पुन्हा .... " पूजाकडून आकाश कादंबरीकडे आला.
" Bye !! ... जमलं आणि निसर्गाने मनात आणलं तर होईल भेट पुन्हा .... " तिनेही आकाशला मिठी मारली. सुप्री- संजनाने सर्वांचा निरोप घेतला. बाहेर पाऊस तसाच होता. आकाश- सुप्री - संजना..... तिघे निघाले. आकाशने आधीच एक वाट बघून ठेवलेली, त्याचं वाटेच्या दिशेने निघाले. कादंबरी या तिघांना जाताना पाहत होती. पूजाकडे पाहिलं तिने. ती अजूनही आठवणीत गुंतलेली. कादंबरीने पूजाच्या बॅग मधून तिची डायरी बाहेर काढली. दरवेळेस ती फोटोग्राफी करायची आणि पूजा लिखाण करायची. आज कादंबरीला काही लिहावेसे वाटले. हा प्रवास खूप काही शिकवून गेला तिला. तिथेच दारात येऊन बसली. पाऊस आता थांबला होता. कादंबरीने पुन्हा त्या तिघांकडे पाहिलं. ते बरेच दूर गेलेले. मानवसदृश्य आकृती तेवढ्या दिसत होत्या. तिने लिहायला घेतले.

" ठिकाण : आठवणींचं गर्द रानं ...

" Bye ..... किती विचित्र शब्द आहे हा ... कधी कधी यावर गोष्टी संपतात आणि कधी .... यावरच नव्या गोष्टी सुरु होतात. अशीच एक नवीन गोष्ट सुरु होते ती आठवणींच्या गर्द रानात ... झाडं - झुडूप तर असतात तिथे... त्याचबरोबर... असतात त्या आपल्या आठवणी.... थोड्या कडू .... थोड्या गोड.... एका मागोमाग एक येतात आणि आपल्याला अलगद गुंतवून ठेवतात. इतकं कि आपण त्यातून बाहेर पडणं विसरून जातो.... किंबहुना आपल्याला त्यातून बाहेर पडणं नकोस असते... यात असतात ते जुने वाडे ... आठवणीचे... एक जुनं गाव .... एक मोठी डोंगररांग .. आणि त्यातून वाहणारी स्वप्नांची नदी... आठवणींचे झरे कोसळत असतात, अपेक्षांचे पक्षी उंच आकाशात उडत असतात. तारुण्याने मोहरलेला निसर्ग साद घालत असतो. आळसावलेली रात्र उशीजवळच पडून असते. बंद दरवाजा बघून पहाटही निघून जाते आल्यापावली. भिंती सुद्धा तश्या बंद... त्यांना आपटून आपल्याच हृदयाची साद आपल्या कानात गुंजू लागते. अश्यावेळी डोळे बंद करून निपचित पडून राहावे... पापण्यांना सुद्धा कळत नाही, डोळ्यातून अश्रू कधी ओघळले ते... अश्या ठिकाणी एकदा तरी यावे... मी इतकी वर्ष काय होती माहित नाही.... माझा प्रवास तर आता सुरु झाला.... आठवणींच्या गर्द रानातला.... !! "

====================================================================


पूजा - कादंबरीचा निरोप घेऊन आकाश सुप्रीच्या साथीने पुढे निघाला. संजनाही होती सोबतच. आलेलं वादळही ओसरले होते. इतक्या दिवसांनी आज जरा आभाळ उघडलं होते. आकाश मात्र त्याच्याच विचारात चालत होता, न बोलता..... एक विलक्षण शांतता घेऊन. परंतु सुप्री थोडी मोकळी वाटत होती आज, बऱ्याच दिवसानंतर. कदाचीत हा दोघांमधील फरक संजनाला आधीच समजला होता म्हणून तिनेही या दोघांपासून चालताना एक विशिष्ट अंतर ठेवले होते. तिघे चालता चालता एका वळणावर आले. तिथून पुढे २ वाटा निघत होत्या. एक डांबरी रस्ता.... बहुदा याच रस्त्याने पुढे चालत गेलो तर शहरात जाणारी गाडी मिळेल , असा अंदाज सुप्रीने लावला. आणि दुसरी पायवाट, कच्चा रस्ता म्हणावा असा.... ती पायवाट जात होती पुन्हा एका नवीन गावाकडे. थांबले तिघेही त्या ठिकाणी. सुप्रीने आकाशला हात पकडून एका मोठ्या दगडावर बसवलं. तीही शेजारी बसली त्याच्या. संजना काही अंतरावर थांबली.

आकाश अजूनही भांबावल्यागत होता. सुप्रीने त्याचा हात हातात घेतला. " काय झालं आकाश... शांत हो... सगळं ठीक होईल. " आकाशला काही समजत नव्हते. काय बोलावं ते.
" सुप्री.... मी ..... मला हे नाही जमत असं... माझं मन कळते ना तुला... एकाच वेळी दोन दगडांवर पाय नाही ठेवू शकत मी...... सॉरी सुप्री !! " आकाश भावुक झालेला. आणि जराशी काळोखी हि दाटून आली लगेच. आकाशचं मन या पावसालाही कळते वाटते, सुप्रीचे लक्ष वर आभाळात गेलं.
" शांत हो आकाश... हे बघ , सॉरी बोलायची काय गरज. तुझं मन कळते मला म्हणूनच हा निर्णय घेतला मी. आणि मी स्वतःलाही तयार केले त्या निर्णयासाठी. " .... सुप्री..... आकाशने सुप्रीचा हात त्याच्या छातीजवळ नेला.
" बघ ... किती जोराने धडधडते आहे हृदय माझं. ... बाहेर येईल असं वाटते मला... " सुप्री छान हसली.
" आकाश... बोलली ना .. शांत हो... सर्व ठीक होईल... आणि आपण काही ब्रेकअप नाही करत आहोत. तुझी space देते आहे तुला..... या तुझ्या आठवणींच्या प्रवासात जाणवलं मला, कि मीच किती स्वार्थी होते ते. प्रत्येक वेळेला मी माझाच विचार केला. ",
" सुप्री .... तस काही नाही... " आकाश बोलत होता तर सुप्रीने त्याला थांबवल.
" बोलू दे मला .... तूच बोललास ना ... आभाळ होऊन पाहावे कधी स्वतः .... मग कळते त्याचं दुःख... बस्स ... झाले ना ... ' आकाश ' होऊन बघितलं...... कळतात तुझ्या feelings मला... किती जणांसाठी धडपडतो तू ... तुझ्यासारखा तूच... तस कोणाला जमणारही नाही.. "

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: