Himachal Pradesh - n visarta yenyasarkhi jaga - 2 in Marathi Travel stories by Anuja Kulkarni books and stories PDF | हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग २

Featured Books
Categories
Share

हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग २

हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग २

प्रेक्षणीय स्थळे : राज्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून या व्यवसायाचा येथे बऱ्यापैकी विकास झालेला आहे. त्या दृष्टीने शासनाने विविध पायाभूत सुविधा, सार्वजनिक उपयोगांच्या सेवा, वेगवेगळ्या वाहतूक सुविधा, रस्ते, विमानतळ, संदेशवहन, पाणीपुरवठा, पुरेसा वीजपुरवठा, नागरी सुखसोयी, मनोरंजनाची साधने इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अजूनही या व्यवसायाच्या विकासास फार मोठा वाव आहे. बारमाही पर्यटन चालू राहण्याच्या दृष्टीने राज्यशासन प्रयत्नशील आहे. पर्यटन व्यवसायाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने पर्यावरणाला हानी न पोहोचता पर्यटनाशी निगडित पायाभूत सुविधा उभारण्यास खाजगी क्षेत्राला परवानगी देण्याविषयी राज्यशासन सकारात्मक विचार करीत आहे. हिमाच्छादित हिमालयीन शिखरे, उष्ण पाण्याचे झरे, नैसर्गिक व मानवनिर्मित सरोवरे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक व मानवशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाची स्थळे इ. पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक हिमाचल प्रदेशातील पर्यटन स्थळांना भेट देतात. इतिहासाशी निगडित पर्यटन, ग्राम पर्यटन, तीर्थयात्रा पर्यटन, क्षेत्र पर्यटन, पर्यावरणीय पर्यटन, आरोग्य पर्यटन, वन्यजीव पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटनाच्या विकासावर शासनाचा भर आहे.

येथील सिमला, कुलू, धरमशाला, डलहौसी, कांग्रा, पालमपूर, मनाली, नग्गर, मलाना ही गावे तेथील काही ना काही वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. यांपैकी डलहौसी, सिमला व मनाली ही थंड हवेची गिरिस्थाने असून उन्हाळ्यात अनेक पर्यटक त्यांना भेट देतात. सिमला या राजधानीत वस्तुसंग्रहालय, वनस्पतीउद्यान, हिमालयन पक्षी उद्यान, जुने चर्च, श्री गुरुसिंग सभा, गुरुद्वार इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथील बाजारपेठ शाली, रजया, पट्टू, गालिचे नमदा, गुदमा, थोबी गालिचे (मेंढीच्या केसांचे), पुल्ला पादत्राणे (स्ट्रॉ शूज) इत्यादी वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. पालमपूर हे चीड वृक्षाची जंगले व चहाच्या मळ्यांसाठी ख्यातनाम आहे. नग्गर येथे जुना राजवाडा व प्राचीन मंदिरे आहेत. मलाना येथे रंगीबेरंगी नैसर्गिक फुलांचे ताटवे असून औषधी वनस्पतींसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. धरमशाला हे दलाई लामांचे निवासस्थान होय. यांशिवाय राज्यात रोहतांग खिंड, कुफ्री-हिमालयन नेचर पार्क, रेणुका सरोवर, रेवल्सर-मण्डी धरण, गोविंद सागर इत्यादी निसर्गसुंदर ठिकाणे आहेत.

राज्यातील बहुतेक लोक शेती करतात. काही पशुपालन, उद्यानविज्ञानात आणि वनविद्येत कार्यरत असलेले आढळतात. शिवालिक पर्वतश्रेणीतील जमिनीची धूप आणि डोंगरी कड्यांची पडझड यांच्याशी मुकाबला करण्यासाठी आणि विकासासाठी राज्यशासन पुनर्वृक्षारोपण करून हा भूभाग वनाच्छादित करण्याचा कार्यक्रम राबवीत आहे. गाडी (गद्दी) पशुपालक ऋतुपरत्वे गवताळ प्रदेशातून भ्रमंती करतात. येथील जमीन बऱ्यापैकी सुपीक असून पाण्याची सोय असल्यास तिच्यात चांगली पिके येतात. कांग्रा खोऱ्यात गहू, जव, चणा, मटार, मका, धान व सर्व प्रकारच्या डाळी पिकतात. उंच पहाडी प्रदेशतील शेती ही पायऱ्यापायऱ्यांची असल्याने सोपी नसून अत्यंत कष्टमय असते.

त्यात धान, मका, गहू, उडीद, राजमा, बटाटे, आले, ओगला, फाफर ही बारीक धान्ये, तसेच राई, सरसू इ. पिके होतात. स्थलांतरित (झूम) शेतीही येथे केली जाते. येथील राजमा आकाराने मोठा व स्वादिष्ट असतो. बियाणे म्हणून त्याची निर्यात होते. शेतीपेक्षा फळबागांना येथील हवामान अनुकूल असून मेहनत कमी लागते. सांप्रत राज्यात वीस निरनिराळ्या जातीची सफरचंदे होतात. कोटगढ हे सफरचंदाचे आगर असून कुलूखोरेही सफरचंदासाठी प्रसिद्ध आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर-मध्ये सफरचंदे पिकून तयार होतात; पण उंच पहाडी प्रदेशातील थंड हवेमुळे ती अनेक दिवस टिकतात. किन्नौर जिल्ह्यात उत्तम प्रकारची द्राक्षे, अंजीर, पीच (सप्ताळू), अलुबुखार,अक्रोड, चिलगोझे इत्यादी फळे होतात. कांग्रा जिल्ह्यात आंबे, पेरू, केळी, पेअर, संत्री इ. फळे खूप होतात. यांशिवाय येथे आडू, अलूचा, चेरी, चूली, जरदाळू, लिंबू जातीची फळे, लिटशी, स्ट्रॉबेरी, बेशमी इ. फळे तयार होतात. राज्यशासन फळबागांना सर्वतोपरी मदत करत असून ती टिकण्यासाठी शीतगृहाची व्यवस्था करीत असते. फळांवर प्रक्रिया करण्याचा उद्योगही चालतो. सफरचंदांची अन्य राज्यांत निर्यात होते. राज्यातील उद्यान शेतीच्या एकात्मिक विकासासाठी उद्यानविज्ञान तंत्रविद्या मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या कृषी-जलवायुमानीय विभागांत चार प्रकर्ष केंद्रे निर्माण करण्यात आली असून तेथे पर्जन्यजल साठवण, गांडूळ खत, हरितगृहे, सेंद्रिय शेती व कृषी यांत्रिकीकरण इत्यादी सर्वसाधारण सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेत मागास आणि प्रगत विभागांचा योग्य तो समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे. येथे अनेक प्रकारचे कुटीरउद्योग चालतात. त्यांपैकी जंगलातील मध गोळा करण्याचा व्यवसायसुद्धा येथे वाढत आहे. लोकर काढून त्याचे कापड विणणे, हा येथील व्यापक कुटीरउद्योग असून घराघरांतून तो चालतो. जंगलातील लाकूड तोडणे, त्याचे ओंडके कापणे आणि ते नद्यांतून वाहून वखारीत नेणे या कामातही अनेक लोक गुंतलेले आढळतात. चीडाच्या वृक्षापासून डिंकासारखा गंदा बरोजा नावाचा एक पदार्थ निघतो. तो विकण्याचाही धंदा चालतो. प्रदूषण विरहित पर्यावरण, मुबलक वीज पुरवठा, वेगाने विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधा, शांततामय वातावरण, शासनाचा अनुकूल प्रतिसाद आणि सकारात्मक प्रशासकीय धोरण यांमुळे राज्याकडे उद्योगधंदे आकर्षित होतांना दिसतात.

* प्रेक्षणीय स्थळे-

१. शिमला-

शिमला भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी व शिमला जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. १८६४ साली ब्रिटिशांनी शिमला उन्हाळी राजधानी घोषीत केली. एक प्रसिद्ध, लोकप्रिय पर्यटन स्थळ असून 'पर्वतांची राणी' म्हणून उल्लेखले जाते. ब्रिटिशांच्या आधी शिमला नेपाळ राष्ट्राच्या अधीन होते. ब्रिटिशानी नेपाळच्या राजा बरोबर झालेल्या युद्धात नेपाळला हरवून शिमला काबीज केले होते. वर्ष १९४७ ते १९५३ पर्यंत शिमला पूर्व पंजाबचे मुख्यालय राहिले. १९६६ मध्ये पंजाब आणि हरियाणाच्या विभाजना नंतर शिमला हिमाचल प्रदेश ची राजधानी म्हणून विकसित झाले. येथे वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. शिमला समर फेस्टिवल दर वर्षी पिक-सिजन मध्ये आयोजित केला जातो. भारतातल अत्यंत आवडीच ठिकाण म्हणून शिमला ओळ्खल जात. हनिमून साठी सुद्धा शिमला ला पसंती देण्यात येते. आपल्याकडे नाताळची सुटी मध्ये बर्फाच्छादित प्रदेशात पर्यटनासाठी जाण्याचा कल वाढत आहे. त्यामुळे ‘व्हाइट ख्रिसमस’ साजरा करण्याकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे काश्‍मीर, नैनिताल, सिमला, कुलू, मनाली येथे पर्यटक गेले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतदेखील या हिमवर्षावात करण्याकडे पर्यटकांचा कल आहे.

* पर्यटन आकर्षण

१. रिज-

शहराच्या मधोमध एक मोठी मैदानासारखी जागा आहे जेथून पर्वतरांगा पाहू शकतो. येथे शिमल्याची ओळख बनलेले आणि न्यू-गॉथिक वास्तुकलेचे उदाहरण असलेले क्राइस्ट चर्च तसेच न्यू-ट्यूडर पुस्तकालय पाहण्याजोगे आहे. शिमला समर फेस्टिवल रिज मध्ये आयोजीत केल जात.

२. मॉल-

शिमाल्याचे मुख्य व्यापारी केंद्र म्हणून मॉल ओळ्खल जात. गेयटी थियेटर हे प्राचीन ब्रिटीश थियेटरचेच एक रूप आहे,आत्ता सांस्कृतिक दळणवळणाचे मुख्य केंद्र आहे. कार्ट रोडहून मॉलकरीता लिफ्ट/रोपवेने सुद्धा जाता येते. रिजच्या जवळील लक्कड बाजार, लाकडी वस्तू आणि स्मृती चिन्हांसाठी प्रसिद्ध आहे. इथे शॉपिंग व्यतिरिक्त द क्रिस्ट चर्च, जाखू मंदिर, तारा देवी टेंपल, संकटमोचन टेंपल, कामना देवी मंदिर, काली बाड़ी मंदिर पाहता येत.

३. काली बारी मंदिर-

हे मंदिर स्कँडल पॉइंट पासून जनरल पोस्ट ऑफिस कडे जाताना जवळच आहे.

४. जाखू मंदिर

(2.5 कि.मी.) 2455 मी. : शिमल्यातिल सर्वात उंच ठिकाणाहून शहराचे सुंदर दृश्य दिसते. येथे हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे.

५. राज्य संग्रहालय

(3 कि.मी.): हिमाचल प्रदेशची ऐतिहासिक वास्तुकला आणि चित्रांचा संग्रह. संग्रहालय सकाळी १० वाजता ते संध्याकाळी ५ वाजे पर्यंत चालू असते. सोमवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी ते बंद असते.

६. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ऍड्व्हान्स स्टडी

(4 कि.मी.) 1983 मी. : हे ब्रिटिशकालीन भवन पूर्वी वॉईसरायचे राहण्याचे ठिकाण होते.

७. प्रॉस्पेट हिल

(5 कि.मी.) 2155 मी. : शिमला - बिलासपुर मार्गावरील हे ठिकाण बालुगंज पासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे कामना देवीचे मंदिर आहे. येथून पर्वतरांगेचे सुंदर दृश्य दिसते.

८. समर हिल

(7 कि.मी.) 1983 मी. : शिमला - कालका मार्गावरील एक सुंदर ठिकाण आहे. येथील वातावरण शांत असून रस्ते झाडांनी व्यापले आहेत. आपल्या शिमला दौऱ्यादरम्यान महात्मा गांधी राजकुमारी अमृत कौर यांच्या जॉर्जियन हाउस मध्ये राहिले होते. येथे हिमाचल प्रदेश विश्वविद्यालय आहे.

९. चाडविक धबधबा

(7 कि.मी.) 1586 मी. : दाट जंगलातील हे स्थान समर हिल चौकापासून ४५ मिनिटाच्या अंतरावर आहे.

१०. संकट मोचन

(7 कि.मी.) 1975 मी. : शिमला कालका मार्गावरील हनुमानाचे प्रसिद्ध मंदिर.

११. तारादेवी

(11 कि.मी.) 1851 मी. : शिमला कालका मार्गावरील प्रसिद्ध मंदिर.